एकरी १००क्विंटल अळूचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा
अळूच्या शेतीतुन एकरी १००क्विंटल उत्पादन घेणारे तातेराव बळीराम वाडेकर गेल्या काही वर्षांपासून अळू या पिकाकडे वळले आहेत. मध्यप्रदेशात क्षेत्र भेट देण्यासाठी गेले असता त्यांना अळूच्या शेताची माहिती मिळाली. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील किन्ही येथील तातेराव बळीराम वाडेकर यांच्याकडे सुमारे तीन ते पाच एकरांवर अळूचे क्षेत्र असते.
शेतकरी कंदांची विक्री व त्यायोगे उत्पन्न मिळविण्यासाठी अळूच्या शेतीकडे वळले आहेत. साधारण सहा महिन्यांचे हे पीक एकरी १०० क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांना मिळवून देत आहे. कमी उत्पादन खर्चात क्विंटलला १५०० रुपयांपासून ते २४०० रुपये दर त्यांना मिळतो आहे. हळद, आले किंवा अन्य नगदी फळपिकांच्या तुलनेत हे पीक फायदेशीर ठरत असल्याचे त्यांचे अनुभव आहेत.
मध्यप्रदेशात या पिकाला आरवी या नावाने संबोधले जाते. त्याचे अर्थकारण, बाजारपेठ याविषयी अभ्यास केला. त्यानंतर त्याचा प्रयोग करायचा ठरवले. हे पीक आर्थिकदृष्ट्या परवडते असे लक्षात आले आहे. सुमारे सहा महिन्यांचे हे पीक आहे. साडेआठ क्विंटल बेणे एका एकरसाठी लागते. एकरी सुमारे १०० क्विंटलपर्यंत त्याचे उत्पादन मिळते.
विक्री व बाजारपेठ
वाडेकर यांच्या गावात सुमारे ५० शेतकरी या पिकाची शेती करत आहेत. या पिकाच्या कंदांची विक्री केली जाते. क्विंटलला ७०० रुपयांपासून ते १५००, २३००, कमाल २८०० रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत. यासाठी स्थानिक व्यापारी आहेत. ते दरवर्षी कंद खरेदी करतात. मुंबई- वाशी मार्केटलाही या कंदांना चांगली मागणी आहे. तेथेही एकेवेळी क्विंटलला १६०० रुपये दराने कंदांची विक्री केल्याचे त्यांनी सांगितले. वाडेकर व पवार यांच्या म्हणण्यानुसार या पिकाचा उत्पादन खर्च एकरी ४० हजार रुपयांपर्यंत असतो. बेणे म्हणून याच्या कंदांचा दर क्विंटलला साधारण २२०० रुपये असतो. आले, हळद आदी नगदी पिकांचा कालावधी, त्यांचे दर आदींचा विचार केल्यास हे पीक किफायतशीर होत असल्याचे हे शेतकरी सांगतात. य पिकाला किडी-रोगांच्या समस्याही कमी आहेत. शेणखताचा वापर केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते, असेही शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.
पवार यांचा अनुभव
सोयगाव तालुक्यातील दस्तापूर येथील किशोर पवार हे स्वतः शेतकरी व व्यापारीदेखील आहेत. व्यापाराच्या निमित्ताने मध्य प्रदेशातील खांडवा या शहराशी पवार सारखा संपर्क असतो. या परिसरातच त्यांना अळूचे पीक दिसून आले. उत्तर भारतात त्याचे कंद आवडीने खाल्ले जातात. तेथील शेतकऱ्यासाठी हे पीक उत्पन्नाचे चांगले साधन आहे ते त्यांना उमगले. ते स्वतः अळू घेतातच. शिवाय ते स्थानिक शेतकऱ्यांकडूनही कंद खरेदी करतात व पुढे अन्य व्यापाऱ्यांना विकतात. मध्य प्रदेशात याची शेती होत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या गावात सुमारे १० ते १२ शेतकरी या पिकाच्या शेतीत गुंतल्याचे ते म्हणाले.
मुबलक पाणी असते महत्वाचे
या पिकाच्या वाढीसाठी मुबलक पाणी असणे महत्वाचे असते असे वाडेकर यांनी सांगितले. एक दिवसाआड त्याला पाणी द्यावे लागते. पाण्याचा खंड पडला तर पाने सुकण्यास सुरवात होत. याचा प्रत्यक्ष उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. जूनमध्ये हे पीक घेतले जात असल्याने पावसाळ्यात पाण्याची तशी समस्या येत नाही.
अळूविषयी विशेष माहिती
कंदाचा गर पिठूळ असून त्याला चांगला स्वाद असतो.
पीक कसे तणमुक्त राहील याची काळजी सुरुवातीच्या काळात घ्यावी लागते. झाड वाढू लागले की सावलीमुळे पुढे तणांची वाढ होत नाही. पक्वतेवेळी सर्व पाने सुकून जातात. कंदाला कोणतीही इजा न होता कुदळीने कंदांची काढणी होते. मजुरामार्फत वेचून हे कंद पोत्यात भरले जातात. पाणी लागल्यानंतर कंद सडतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे ते पाण्याने धुतले जात नाहीत.अळूची पाने व कंदांपासून विविध अन्नपदार्थ तयार केले जातात.खांडवा भागात ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये आरवीची लागवड होते. काढणी मे-जूनच्या दरम्यान होते.
Comments
Post a Comment