Skip to main content

#दुग्ध व्यवसाय:-



दुग्ध व्यवसाय:-
शेतीपूरक परंपरागत व्यवसाय
शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो.
आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात.
संगोपन
ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी असाव्यात. त्यांच्या संगोपनासाठी सर्व सोयी उपलब्ध असाव्यात. उदा. पिण्याचे पाणी, लाइट, वाहतुकीचा रस्ता, गोठा, शहर १०-२० कि.मी अंतरावर असावं. उपलब्ध क्षेत्राला हुकमी पाणी पुरवठयाची सोय असावी. नजीक पशुवैद्यकीय दवाखाना असावा. या किमान बाबी दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक आहेत.
दुधाळ गाई आणि म्हशीं
फायदेशीर दुग्धव्यवसायासाठी दुधाळ गाईची आणि म्हशींची निवड करावी. दुधाळ गायींची खास वैशिष्टये असतात. त्या वैशिष्ट्यांच्या गाई खरेदी कराव्या. त्याचप्रमाणे म्हशीही निवडाव्यात. दुग्ध्व्याव्सायाच्या दृष्टीने एका वितात गाईने साधारणपणे ३६०० लिटर दुध दिलं पाहिजे. म्हशीने २५०० लिटर दुध दिलं तर दुग्ध व्यवसाय फायदेशीर होतो. दुग्धव्यवसायासाठी नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या विटाच्या गाई किंवा म्हशी निवडाव्या. त्यांचं वय ३ ते ४ वर्षाच असावं. त्या वर्षाला एक वेत देणाऱ्या असाव्यात. निरोगी असाव्यात. गुग्ध व्याव्सायासाठी जर्सी, होल्स्तीन-फ्रिजीयन, देवणी, गिर, सिंधी, थारपारकर, या गाई पाळाव्यात. तर दिल्ली, मुऱ्हा, पंढरपुरी, जाफराबादी, या म्हशी पाळाव्यात.
आदर्श गोठा
गाई-म्हशीसाठीचा गोठा आदर्श असावा. गाई-म्हशींची संख्या १६ पर्यंत असेल तर एकेरी पद्धतीचा गोठा असावा. आणि १६ पेक्षा जास्त संख्या असेल तर दुहेरी गोठा असावा. तोंडाकडे तोंड,अगर शेपटीकडे शेपटी आणि मध्ये दोन मीटर रुंदीचा रस्ता अशी रचना असावी. शेपटीकडे शेपटी म्हणजे tail to tail हि रचना चांगली असते. तोंड खिडकी कडे असल्याने हवा मिळते. संसर्गजण्य रोग होण्याचा धोका नसतो. दुध काढणं सोयीचं होतं. गोठ्याची जमीन सिमेंटकोब्याची असावी. मुत्र वाहण्यासाठी शेपटीच्या दिशेने नाळी असावी. गोठ्याची उंची १४ ते १५ फुट असावी.  ८ फुट भिंत आणि ४ फुट खिडकी ठेवावी. गाई-म्हशीला १.५ ते १.७ मीटर लांब आणि १ ते १.२ मीटर रुंद अशी गोठ्यात जागा असावी. भरपूर आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा हौद मोकळ्या जागेत असावा. गाई-म्हशींना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या रोज ३% वाळलेला आणि हिरवा चार असावा. प्रत्येक लिटर दुधापाठीमागे ३०० ते ४०० ग्राम पशुखाद्य, तर ५० ते १०० ग्राम क्षारमिश्रण देणे महत्वाचं आहे. अ, ब, क, आणि ई जीवनसत्वासाठी हिरवा चारा दिलं गेलाच पाहिजे. म्हणजे दुधात घनपदार्थ (एसएनएफ) म्हणजेच जास्त फॅट मिळते. अलीकडे जैविक दुधनिर्मितीला महत्व प्राप्त झालेले आहे.
गाई-म्हशींना घटसर्प, फऱ्या, फाशी, ब्रुसेलोसीस हे जीवाणूजन्य आजार, तर देवी, बुळकांडी, लाल्याखुरकूत, रेबीज, डेंग्यू, हे विषानुजान्य रोग, गोचीड आणि जंत हे परोपजीवी रोग आढळतात. त्यासाठी लसीकरण करून घ्यावे म्हणजे जनावराचं आरोग्य चांगलं राहतं.
तंत्र दूधविक्रीचे…
एखाद्या दुग्ध प्रक्रियादाराचे यशस्वी होणे किंवा टिकून राहणे, हे सर्वस्वी ग्राहकांच्या त्या उत्पादनातील असणाऱ्या विश्‍वासावर अवलंबून आहे. यासाठी उत्पादकाने विक्री तंत्र, ज्ञान आणि कौशल्याची आवश्‍यकता आहे.
आपला विभाग आणि बाजारपेठेनुसार दूधविक्रीचे नियोजन करावे लागते; परंतु सर्वसाधारणपणे व्यवसाय पूर्ण क्षमतेने तग धरण्यासाठी; तसेच भविष्यातील वृद्धीसाठी काही गोष्टींचा विचार, अभ्यास आवश्‍यक आहे. बहुतेक वेळा नवीन लहान व मध्यम प्रक्रियादारांना विपणासंबंधी खूप कमी किंवा अजिबात अनुभव नसतो. व्यवसाय सुरू करताना काही प्राथमिक गोष्टींची प्रत्येकाला माहिती असणे आवश्‍यक आहे.
पदार्थ वितरण व्यवस्था
वितरण व्यवस्था ——— मध्यस्थ
1) उत्पादक – ग्राहक ———— 0
2) उत्पादक – फेरीवाले- ग्राहक — 1
3) उत्पादक – प्रक्रियादार – ग्राहक – 1
4) उत्पादक – प्रक्रिया करणारा
किरकोळ विक्री – ग्राहक ————- 2
5) उत्पादक – प्रक्रिया करणारा
किरकोळ विक्रेता – ग्राहक ———– 2
6) उत्पादक – दूध सहकारी संघ-
प्रक्रिया करणारा – किरकोळ विक्रेता ग्राहक– 3
7) उत्पादक – दूध वाहक – प्रक्रियादार
किरकोळ विक्रेता – ग्राहक —————— 3
टीप
मध्यस्थांच्या संख्येमुळे उत्पादक आणि ग्राहकांवर किमतीच्या बाबतीत फरक पडतो. विक्रीची जेवढी साखळी लहान तितका ग्राहकाला फायदा जास्त (कमी किमतीमुळे) आणि उत्पादकालाही चांगला नफा मिळतो. जास्तीच्या मध्यस्थामुळे पदार्थात भेसळीचे प्रमाण वाढण्यास एक प्रकारची संधीच मिळते.
विपणन आणि दूध, दुग्ध पदार्थांची किंमत
1) उत्पादनाची किंमत हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचा ग्राहकाच्या मागणीवर प्रभाव पडतो.
2) विक्रीसाठी उत्पादनाची किंमत ही स्पर्धात्मक हवी.
3) उत्पादनाच्या टप्प्यात दूध खरेदी, प्रक्रिया, पॅकेजिंग, कच्चा मालाची किंमत, साठवणूक, वितरण इ. खर्च कमीत कमी ठेवावा. किंवा हा खर्च कसा कमी राहील हे पाहावे.
दुग्ध पदार्थांच्या किमतीतील घटक
1) कच्चा दुधाची किंमत, 2) कच्चे दूध गोळा करणे, वाहतूक करणे, 3) प्रक्रियेचा खर्च
4) विपणन आणि वितरण यासाठी लागणारा खर्च, 5) पॅकेजिंगचा खर्च, 6) कर, 7) विक्री
साखळीच्या प्रत्येक पायरीवरचा नफा (दूध गोळा करणे, प्रक्रिया आणि विक्रीतील मार्जीन)
पदार्थाच्या वास्तववादी किमतींसाठी
बाजारातील कार्य ———————- खर्चातील घटक
1) कच्चे दूध खरेदी — कच्च्या दुधाचा खर्च, मजूर, लागणारी सामग्री, खरेदीतील मार्जीन
2) वाहतूक ः मात्र वाहतुकीचा खर्च, सामग्री येणारा खर्च, वाहतुकीचे मार्जीन.
3) प्रक्रिया ः कच्चा माल, त्यासाठीची यंत्रणा, उपकरणे, मजूर, पॅकेजिंग, वीज, वितरण आणि विपणन, प्रक्रियेतला मार्जीन.
4) मार्केटिंग आणि वितरण ः वाहतूक, मजूर, सामग्री, भाड्याने देणे, किरकोळ विक्री मार्जीन.
टीप ः स्थिर किंमती आणि बदलत्या किमती अशा श्रेणी पडतात. इमारत, यंत्रे यांचा घसारा इ. देखील यामध्ये ग्रहीत धरावा. हिशेब करताना खर्चाचे सर्व घटक ग्राह्य धरणे अभिप्रेत आहे.
विपणन माहितीची पद्धत आणि संशोधन
1) बऱ्याच ठिकाणी सर्व समावेशक विक्री माहितीचा अभाव असतो. अशा ठिकाणी प्रक्रियादाराने किंवा त्यांच्या संघटनेकडून छोटे मेळावे किंवा सभा आयोजित करून माहितीचा प्रसार करावा.
2) बाजाराचे लहान सर्वेक्षण किंवा ग्राहकाचा अभ्यास यांद्वारे माहिती संकलित करावी.
3) जो पदार्थ तुम्ही उत्पादित आणि विक्री करणार आहात, या संबंधीची जवळपास सर्व आवश्‍यक माहिती हवी. यामुळे कुठल्या प्रकारचा पदार्थ, कधी, कुठे आणि किती उत्पादित करावा आणि विक्री करावा यांचे ज्ञान होईल. यामुळे ग्राहकाला योग्य तो पदार्थ, योग्य त्या जागी निश्‍चित वेळेत पोहोचवल्यास तो ग्राहकांना उपलब्ध होईल.
नेमकी कोणती माहिती असावी ?
* कुठल्या विभागात विक्री करणार?
* किमतीविषयक माहिती (किमतीतील बदल सवलत इ.).
* एकूण ग्राहकांची संख्या आणि त्यांचे प्रकार.
* सध्याची आणि भविष्यातील उत्पादन- पुरवठा पातळी.
* बाजारातील स्पर्धेकांची संख्या आणि प्रकार.
* दुधाचे विपणन, प्रक्रिया यांच्या व्यवहार्यतेचा अभ्यास.
टीप ः दूध व दुग्धपदार्थांची विक्री किंवा प्रक्रिया या व्यवसायात उतरताना अगोदर व्यवहार्यतेचा अभ्यास करावा. जेणेकरून नियोजित व्यवसायाची आर्थिक व्यवहार्यता सिद्ध होईल. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्यवसायासाठी वास्तव्यकारक, वास्तववादी योजना करणे आवश्‍यक आहे.
व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी
* किती दूध उत्पादित होणार (सकाळ, संध्याकाळ).
* त्या विभागातील सध्या दुग्धपदार्थ विकले जाण्याचे मार्ग.
* स्थानिक उत्पादक किती पैसे घेतात? ताजे दूध तसेच प्रक्रिया पदार्थांच्या दराचा अभ्यास करावा.
* आपल्या भागत उत्पादित होणाऱ्या पदार्थांच्या चवीचे ज्ञान असावे. यावरून ग्राहकाला पदार्थ आवडतो का नाही हे ठरविता येईल.
* ऊर्जेचे स्रोत (इंधन, वीज, पाणी इ.)
* मुख्य गुंतवणूक (जमीन, इमारत, यंत्रे, वीज इ.).
* व्यवसायाचे स्पष्ट नियोजन. जे टिकून राहण्याची क्षमता व्यवहार्यता दर्शवेल.
व्यवसायाची मार्गदर्शक योजना
1. व्यवसायाचे वर्णन
* कुठल्या प्रकारच्या व्यवसायाचे नियोजन आहे?
* तुम्ही कशा प्रकारचे उत्पादन विकणार?
* बाजारपेठेत कशा प्रकारची संधी आहे? (नवीन, विस्तार, हंगामाप्रमाणे, वार्षिक).
* विक्रीच्या वाढीसाठी काय संधी आहेत?
2. विक्रीची योजना
* आपले संभावित ग्राहक कोण?
* तुमचा बाजारपेठेतील हिस्सा, बाजारपेठेत ग्राहकांच्यामध्ये उत्पादन कसे प्रसिद्ध होईल ते कसे टिकून राहील?
* तुमचे स्पर्धेक कोण? त्यांच्या व्यवसायाची कशी प्रगती होत आहे?
* तुमच्या उत्पादनाची विक्रीसाठी प्रयत्न कसे करणार?
* तुमचे पुरवठादार कोण?
* तुमचा व्यवसाय कोठे स्थिर आहे?
3. संघटित नियोजन
* व्यवसायाचे व्यवस्थापन कोण करेल?
* व्यवस्थापकासाठी कुठली शैक्षणिक अर्हता पाहाल?
* किती कर्मचाऱ्यांची गरज भासेल?
* पैशाचे नियोजन कसे कराल? (यामध्ये सुरवातीस आवश्‍यक गुंतवणूक ग्राह्य धरलेली आहे.)
* तुम्ही नोंदी कशा ठेवाल?
* कायदेशीर मालकी कशी निवडाल आणि का?
* कुठल्या प्रकारच्या परवान्यांची गरज आहे?
* कुठल्या नियमांचा व्यवसायावर परिणाम होईल?
4. आर्थिक नियोजन
* पहिल्या वर्षी व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज.
* व्यवसाय सुरू करण्यास किती खर्च आवश्‍यक आहे?
* पहिल्या वर्षी फायदा घेण्यासाठी किती विक्रीची गरज आहे?
* उत्पादनात कसा विराम असेल?
* यंत्रांसाठी किती भांडवल आवश्‍यक आहे?
* एकूण किती पैशांची गरज आहे?
* संभवनीय निधीचा स्तोत्र.
* कर्ज कसं घ्याल? (तारण, सुरक्षितता)
विक्री तंत्रातील अनुभवाचे बोल
(लेखक कृषी महाविद्यालय, धुळे येथे कार्यरत आहेत)
आपल्या उत्पादनाच्या विक्रीत वाढ होण्यासाठी उत्पादनाला विशिष्ट “ब्रॅंड नेम’ तसेच लोगो आवश्‍यक आहे. विक्री करताना पॅकेजिंगही चांगले हवे.
विक्रीचे नियोजन
* किरकोळ विक्रीसाठी विविध दुकाने, मॉल.
* हॉटेल्ससाठी रोज लागणारे पदार्थ म्हणजे पनीर, दही, चक्का. यात पनीर हा जास्त आवश्‍यक पदार्थ आहे.
* आचारी, जेवणाचे कंत्राट घेणारे यांच्याशी संपर्क ठवून त्यांना वेळोवेळी आवश्‍यक पनीर, दही, चक्का, खवा, बासुंदी, अंगुर रबडी, रसमलाई पुरवता येईल.
* आचारी, जेवणाचे कंत्राट घेणाऱ्या लोकांशी सतत संपर्क ठेऊन लग्नाच्या तारखेनुसार पदार्थांची आगाऊ नोंदणी करता येईल.
* लग्नसमारंभासाठीचे हॉल, लॉन्स यांच्या मालकांशी संपर्क ठेऊन त्या ठराविक दिवशी आवश्‍यक दुग्धपदार्थ पुरवता येतील.
* हॉस्पिटलसाठी आवश्‍यक, कमी फॅटचे दूध, चॉकलेट दूध इ. पुरवता येईल.
* आपल्या आजूबाजूच्या भागातील कॉलनीमध्ये काही खास दुग्धपदार्थांचे तांत्रिकदृष्ट्या आरोग्यासाठीचे महत्त्व पटवून देऊन दुग्धपदार्थ विकता येईल.
* पदार्थाची पौष्टिकता, गुणवत्ता, त्यांची आवश्‍यकता (वैज्ञानिक दृष्टिकोनातून), तयार करतानाची स्वच्छता याचे संगणकावर सादरीकरण करून ग्राहकाचा विश्‍वास संपादन
दुग्ध प्रक्रिया उद्योगापूर्वी सर्वेक्षण महत्त्वाचे…
भारत जगात दुग्ध उत्पादनात आघाडीवर आहे. येत्या काळात दुधाची मागणी वाढती आहे, तर दुसऱ्या बाजुला आजही ग्रामीण भागात दुधाला शहरी भागाच्या तुलनेत हवा तितका दर मिळत नाही. देशाच्या एकूण दूध उत्पादनात 37 टक्के दूध हे दुग्धपदार्थांच्या प्रक्रियेसाठी वापरले जाते. यात 24 टक्के दूध हे अनियोजित क्षेत्रात वापरले जाते. येथेच दुग्धपदार्थांची गुणवत्ता सुधारण्यास खूप मोठा वाव आहे.
अनेक जिल्ह्यांत हजारो बचत गट, विविध आर्थिक उन्नतीचे गट कार्यरत आहेत. अनेक जिल्ह्यांत विविध योजनांमार्फत गाई, म्हशींचे वाटप केल्यामुळे दुग्ध उत्पादनात काही ठिकाणी वाढही झालेली दिसते. “फ्लश सीझन’ म्हणजे जास्त दुधाच्या काळात तर गाईचे दूध अनेक डेअऱ्यांमध्ये नाकारले जाते किंवा अत्यंत कमी दर मिळतो. हे लक्षात घेऊन गावातील तरुण गट, तसेच महिला बचत गटांनी एकत्र येऊन आपल्या गावातील, तसेच आसपासच्या इतर गावांतील शेतकऱ्यांकडून अतिरिक्त दूध गोळा करून ते पुढे विक्रीकरता न पाठवता प्रक्रिया केल्यास चांगली किंमत मिळू शकते. फक्त गरज आहे ती तंत्रज्ञानाची जोड व स्वच्छ, शुद्ध, उत्तम दुग्धपदार्थ पुरवण्याची.
दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरू करताना…. दूध प्रक्रिया करताना कुठले पदार्थ बनवावेत, यंत्रसामग्रीवर बराच खर्च करावा लागेल का, उत्पादित प्रक्रिया पदार्थ कोण घेणार, विक्री कशी करणार, पॅकेजिंगचे काय, ब्रॅंड तयार होईल का, असे अनेक प्रश्‍न व्यवसायास सुरवात करणाऱ्यांच्या मनात येतात. यासाठी पहिल्यांदा या उद्योगासंबंधी प्राथमिक अभ्यास महत्त्वाचा आहे.
दुग्धजन्य पदार्थांची मागणी – 1) गाव, शहर, निमशहर यानुसार पदार्थांची संख्या कमी-जास्त होऊ शकते. परंतु सर्वांगाने विचार केल्यास अनेक हॉटेल, ढाबे, जेवणाची कंत्राटे घेणारे, या सर्वांना पनीर, खवा, तूप, दही, चक्का इ. ठराविक प्रमाणात लागत असतो.
2) हॉटेल, ढाबे यांची पनीरसाठीची रोजची मागणी असतेच.
3) लग्नाच्या जेवणात गुलाबजाम, मिठाईसाठी खवा, चक्का, पनीर इ. आवश्‍यक असतो. शंभर माणसांसाठी गोड दुग्धपदार्थ- उदा. गुलाबजाम तयार करण्यासाठी अंदाजे पाच किलो खवा म्हणजेच 500 ते 700 माणसांसाठी 25 ते 35 किलो खवा हा कच्चा माल म्हणून लागेल. तसेच शंभर जणांसाठी जेवणासाठी एका भाजीत पनीर वापरावयाचे असल्यास साधारणपणे 10 किलो पनीर लागेल. थोडक्‍यात, बाजारपेठेत मागणी आहे. ही मागणी आपण शोधली पाहिजे.
विक्रीचे नियोजन – 1) कुठल्याही व्यवसायात मागणी एकदम वाढणार नाही. बचत गटांच्या विविध प्रदर्शनांतून, “ऍग्रोवन’ने भरवलेल्या प्रदर्शनातून स्टॉल्स लावल्यास मोठ्या प्रमाणात जाहिरात होऊन मागणी वाढते.
2) हॉटेल, ढाबे यांची दुग्धपदार्थांसाठीची रोजची मागणी असतेच.
3) लग्नसमारंभाची मागणी लक्षात घेऊन तेथील जेवण तयार करणाऱ्या आचारी लोकांशी संपर्क ठेवून अपल्या दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढविता येईल.
4) अशा प्रकारे मागणी वाढत गेल्यास आजूबाजूच्या शहरांतील शॉपिंग मॉल्स, सुपर शॉपी, दुकाने इ. ठिकाणी योग्य पद्धतीने पॅक केलेले दुग्धपदार्थ विक्रीसाठी ठेवता येतील.
यंत्रसामग्रीची गरज – 1) छोट्या यंत्रांचा वापर करून शेतकऱ्यांच्या गटांना दूध प्रक्रियेच्या दृष्टीने लघुउद्योगांकडे वळण्यास मोठी संधी आहे.
2) खवा, पनीर, पेढा, श्रीखंड, लस्सी, क्रीम सेपरेशनसाठी लहान स्वरूपातील यंत्रे उपलब्ध आहेत.
3) विविध पदार्थांसाठी वेगवेगळ्या क्षमतेची बांधणीची यंत्रे महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. आपल्या उत्पादनानुसार ती विकत घेता येतील.
4) खवा उत्पादनासाठी कमीत कमी 40 हजारांपासून ते 2.5 लाखांपर्यंत यंत्रे उपलब्ध आहेत. पनीरसाठी साधा पनीर प्रेस 15-20 हजार, तर न्यूमॅटिक प्रेस हा 50 हजार ते 2.5 लाखांपर्यंत मिळू शकेल.
5) दुधातील साय वेगळी करण्यासाठी क्रीम सेपरेटरची किंमत 25 ते 40 हजारांपर्यंत आहेत. सुरवातीस एक किंवा दोन पदार्थांसाठी लागणारी यंत्रे खरेदी करून, गरजेनुसार इतर पदार्थांच्या निर्मितीसाठी यंत्रे विकत घेता येतील.
पॅकेजिंगसाठी डबे – 1) विविध दुग्धपदार्थांसाठी पॅकेजिंग मटेरिअल निवडताना मूळ पदार्थ व पॅकेजिंग मटेरिअलची गुणवत्ता विचारात घ्यावी.
2) सध्या बाजारात सहज उपलब्ध होणारे पीव्हीसी किंवा पॉलिप्रॉपिलीनचे प्लॅस्टिकचे डबे बासुंदी, गुलाबजाम, श्रीखंड, रसगुल्ला इ. साठी वापरता येतील.
3) मिठाई ठेवण्यासाठी कागदापासूनची वेष्टने व प्लॅस्टिकचे वेगवेगळे प्रकार लॅमिनेट करून वापरता येतील.
4) अनेक प्रकारच्या प्लॅस्टिकची घनता, ताणशक्ती, ऑक्‍सिजनच्या प्रवेशक्षमतेमध्ये फरक असतो. या प्रकारच्या क्षमता तपासून त्या-त्या प्लॅस्टिकसंबंधी खात्री पटवता येते.
5) पनीर, मिठाईसाठी व्हॅक्‍यूम पॅकिंग वापरले जाते. नवीन तंत्रज्ञानामध्ये मॉडीफाइड ऍटमॉसफिअर पॅकेजिंग ऑक्‍सिजन ऍबसॉर्बर तंत्र उपलब्ध झाले आहे.
ब्रॅंडिंग महत्त्वाचे – 1) आपल्या उत्पादनाचा ब्रॅंड विकसित करण्यासाठी जाहिरातींबरोबरच स्वच्छ, शुद्ध, योग्य मूल्यवर्धित आणि पॅकेजिंग केलेले दुग्धपदार्थ तयार करणे खूप महत्त्वाचे आहे.
2) आजघडीला नवनवीन तऱ्हेने दुग्धपदार्थ उत्तमरीत्या पेश करून आपल्यासमोर येत आहेत. “मॉल’ संस्कृतीमुळे एकच पदार्थ चार-पाच प्रकारे ग्राहकांसमोर येत आहेत.
3) बदलत्या जीवनशैलीमुळे पौष्टिक, शुद्ध, नैसर्गिक रंग आणि रसायनविरहित पदार्थांकडे कल वाढतोय. यासाठी स्थानिक उपलब्धतेनुसार दुग्ध पदार्थांत फळांचा वापर, कमी फॅटचे दुग्धपदार्थ, कमी कॅलरीजचे पदार्थ (कृत्रिम साखरेचा वापर), तंतुमय पदार्थांचा वापर अशा अनेक प्रकारे मूल्यवर्धन करता येईल.
4) दुग्धपदार्थ तयार करत असताना मिळणारे उप-उत्पादन- उदा.- स्किम मिल्क (फॅट नसलेले) जे साय काढल्यानंतर मिळते, निवळी जे पनीर, छाना तयार करताना मिळते, ताक इत्यादीवर छोटीशी प्रक्रिया करून विक्री करता येते. या प्रक्रियेच्या पद्धती अत्यंत सोप्या व सहज करता येण्याजोग्या आहेत.
5) ग्राहकाला उत्पादनाची गुणवत्ता पटवून दिली तर विक्रीत वाढ तर होईलच, तसेच ही माहिती “ब्रॅंड’ बनवण्यासाठीही उपयुक्त ठरेल.
दुग्धपदार्थ निर्मितीचे प्रशिक्षण – कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालयातील पशुशास्त्र व दुग्धशास्त्र विभागांत आयोजित होणारे मेळावे, प्रशिक्षण यातून दुग्धपदार्थ निर्मितीची माहिती मिळेलच, तसेच दुग्ध महाविद्यालय, पुसद, विविध जिल्ह्यांतील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये प्रशिक्षण, माहिती मिळेल. आणंद, गुजरात येथील प्रशिक्षण दुग्धतंत्र महाविद्यालय प्रसिद्ध आहे. येथे पाच-सहा दिवसांचे दुग्धतंत्रातील विविध प्रशिक्षण कार्यक्रम शेतकरी, डेअरीतील तंत्रज्ञ यांच्यासाठी सुरू असतात. प्रशिक्षण, भोजन, निवास यांचा खर्च धरून साधारणपणे प्रशिक्षण कालावधीनुसार 4 ते 10 हजार रुपये शुल्क आहे. याचबरोबरीने राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाना येथेही प्रशिक्षण मिळते.
दूध उत्पादनावर परिणाम करणारे घटक
गाई-म्हशींपासून मिळणाऱ्या दुधाचे नमुने निरनिराळ्या ठिकाणी व वेळी गोळा करून त्यांचे रासायनिक पृथक्‍करण केल्यास, त्यातील घटक सारखेच असतात. परंतु घटकांचे प्रमाण हे वेगवेगळे आढळते. दूध व दुधाचे पदार्थ बनविताना व खाद्यान्न म्हणून त्यांचा वापर करताना हे फरक महत्त्वाचे ठरतात. दुधातील घटकांच्या प्रमाणावर परिणाम करणाऱ्या प्रमुख बाबी पुढीलप्रमाणे –
1) जनावरांचा प्रकार – निरनिराळ्या प्राण्यांच्या दुधातील घटकांच्या प्रमाणात व दूध उत्पादनात प्राणीनिहाय फरक आढळतो. उदा. गाय, म्हैस, शेळी इ.
2) जनावरांची जात – एकाच प्रकारच्या जनावरांच्या अनेक जाती आढळतात. त्यांच्या जातीप्रमाणे दुधातील घटकांच्या प्रमाणात व दूध उत्पादनात प्राणीनिहाय फरक आढळतो. उदा. गाईमध्ये जर्सी, गौळाऊ; तर म्हशीमध्ये मुऱ्हा, जाफराबादी इ.
3) दुधाच्या काळाचा टप्पा – गाईच्या दुधाचा काळ जसजसा पुढे जातो, म्हणजे वाढतो तसतसे दुधात स्निग्धांशांचे प्रमाण थोडेसे वाढते. याउलट दूध तिसऱ्या महिन्यापर्यंत वाढून नंतर हळूहळू कमी होते व 9-10 महिन्यांत आटते.
4) गाईचे वय – पहिल्या वेतापासून तिसऱ्या वेतापर्यंत दूध व स्निग्धांशांचे प्रमाण थोडे थोडे वाढते. नंतर ते स्थिर राहून 12-14 वर्षे वयानंतर कमी होते.
5) वैयक्तिक फरक – एकाच जातीच्या गाईंना सारखेच खाद्य दिले व व्यवस्थापनदेखील सारखेच असले, तरीदेखील त्यांचे दूध उत्पादन व दुग्ध घटकांमध्ये फरक आढळतो. हा फरक आनुवंशिकतेच्या कारणामुळे होतो.
6) ऋतुमानानुसार फरक – दुधामध्ये स्निग्धांशांचे प्रमाण उन्हाळ्यात थोडे कमी व हिवाळ्यात थोडे अधिक असते. हाच फरक दूध उत्पादनातदेखील आढळतो.
7) दूध काढण्याच्या वेळांमधील अंतर – 24 तासांत दूध काढण्याच्या दोन वेळांमध्ये 12 तासांपेक्षा अधिक अंतर असेल, तर अधिक वेळानंतर काढलेल्या दुधाचे प्रमाण अधिक व स्निग्धांशांचे प्रमाण कमी राहील.
8) दोहनाच्या वेळचे, सुरवातीचे व अखेरचे दूध – गाईच्या एकाच वेळेच्या दोहनाच्या सुरवातीच्या धारांमध्ये स्निग्धांश कमी, तर शेवटच्या धारांमध्ये बराच अधिक असतो. हा फरक दोन-तीन टक्‍क्‍यांपर्यंत राहू शकतो.
9) विण्याच्यावेळी गाईची स्थिती – विण्याच्या काळात गाय धष्टपुष्ट असून अंगावर चरबी अधिक असेल, तर अशा गाईंमध्ये सुरवातीच्या काळातील दुधात स्निग्धांश अधिक राहून नंतर 15-20 दिवसांनंतर तो थोडा कमी होऊन स्थिर राहतो.
10) गाईचे खाद्य – खाद्याची कमतरता असल्यास, त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. मात्र दुधातील घटकांवर विशेष परिणाम होत नाही. त्यांना स्निग्ध पदार्थ खाऊ घातले तरी दुधातील स्निग्धांश 0.2 टक्‍क्‍यापेक्षा जास्त वाढणार नाही. त्याकरिता संतुलित आहार देणेच योग्य आहे.
आयुर्वेदिक/ वैदिक उपचार – आयुर्वेद/ वेदामध्ये खालीलप्रमाणे वनस्पतींचा उपयोग केला असता, दुधाचे फॅटचे प्रमाण वाढल्याचे दाखले सापडतात. थोड्या प्रमाणात हे प्रयोग करण्यास हरकत नाही. अ) बरेच शेतकरी जनावरांना ढेपेऐवजी कापसाची सरकी खाऊ घालतात. ती तशीच न देता भरडून, भिजवून खाऊ घातल्यास दुधाचे/ फॅटचे प्रमाण वाढते. ब) एरंडीची पाने जनावरास भरपूर खाऊ घातल्याने (एक महिना) दूध वाढते. क) चवळीच्या ओल्या शेंगा अथवा बीज भिजू घालून ते भरपूर खाऊ घालावे, दूध वाढते. ड) मेथी खाऊ घातल्यास दुधाबरोबरच जनावरांची आरोग्यशक्ती वाढते. इ) अंबाडीचे बीज भरडून पाण्यात घट्ट शिजवून त्याचे गोळे खाऊ घातल्यास दूध वाढते. ई) उडीद भिजवून भरपूर खाऊ घालावे (एक महिना). फ) जनावरास भरपूर गाजरे खाऊ घातल्यानेही दूध वाढते. ग) वासनवेल भरपूर खाऊ घातल्यानेही गाई-म्हशी भरपूर दूध देतात.
व्यवस्थापन – अ) दूध एकाच माणसाच्या हाताने ठराविक वेळेतच (सहा ते आठ मिनिटे) काढावे. ब) दूध काढण्याच्या वेळा ठराविक व समान अंतराने नियमित असाव्यात. क) दूध काढताना सुरवातीच्या पहिल्या दोन ते तीन धारा आपण न घेता, जमिनीवर सोडून वाया घालविणे आवश्‍यक असते. कारण जनावराच्या स्तनांमध्ये बाह्य रोग जिवाणू, विषाणू जातात ते यामुळे बाहेर जातात. त्यामुळे हे जरूर करावे. परंतु शेवटची धार मात्र निपचून पूर्णपणे काढावी. कारण शेवटच्या धारेमध्ये फॅटचे प्रमाण वाढत-वाढत जाऊन सर्वाधिक असते. वासरू पान्हा सोडण्यासाठी किंवा दूध पाजण्यासाठी सुरवातीलाच पाजावे; शेवटी नव्हे. ड) म्हशींना गाईप्रमाणे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पोळ तसेच खांदा नसतो. त्यामुळे त्यांना पाण्याने दोन ते तीन वेळा ओले करावे किंवा थंड जागी बांधावे. इ) जनावरांच्या आरोग्याची काळजी व निगा घ्या. ते आजारी असेल तर लागलीच उपचार करावेत. जनावरांच्या नाकासमोरील काळी रखरखीत त्वचा ओली दवबिंदूमुक्त नसून कोरडी झाल्यास हे लगेच कळेल. ई) उत्तम दूध व फॅट देणाऱ्या जातीचे जनावर जवळ बाळगावे. त्यांचे व त्यांच्या पुढील पिढीचे योग्य संगोपन व व्यवस्थापनाने करावे.
काटेकोर नियोजनातून वाढविला दुग्ध व्यवसाय
सातारा शहरापासून दक्षिणेस साधारण सात किलोमीटवर करंडी हे गाव आहे. या गावातील अनिल जाधव यांची 14 एकर शेती आहे. सातारा येथील पतसंस्थेमधील नोकरी सांभाळून बंधू अरविंद यांच्या मदतीने त्यांनी शेती आणि जनावरांचे चांगले व्यवस्थापन ठेवले आहे. सात वर्षांपूर्वी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दोन म्हशींपासून पशुपालन सुरू केले. शेतामध्येच 40 फूट बाय 25 फूट असा गोठा बांधला. परिसरातील शेतकरी आणि पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जनावरांच्या व्यवस्थापनातील तंत्र शिकत त्यांनी दोन वर्षात सहा म्हशी वाढविल्या. म्हशींच्या व्यवस्थापनाचा अंदाज आल्यावर व्यवसाय वाढविण्यासाठी संकरित गाईंची खरेदी करण्याचे ठरविले. त्याअगोदर जाधव यांनी जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या गोठ्यांना भेटी देऊन संकरित गाईंच्या व्यवस्थापनाची माहिती घेतली. परिसरातील शेतकरी, तसेच अकलूज, बारामती येथील बाजारपेठेतून टप्प्याटप्प्याने होल्स्टिन फ्रिजियन गाईंची खरेदी सुरू केली. जशी गाईंची संख्या वाढेल त्याप्रमाणे गोठ्यात सुधारणा केली. सध्या त्यांच्याकडे 110 होल्स्टिन फ्रिजियन, 10 कालवडी, पाच खिलार गाई, दोन म्हशी आणि चार बैल आहेत. जाधव यांची दर वर्षी सात एकर ऊस लागवड असते. जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी चार एकर क्षेत्रावर मका, कडवळ, मारवेल गवत या चारा पिकांची हंगामानुसार लागवड ते करतात. इतर क्षेत्रावर हंगामी पिकांची लागवड केली जाते. पुरेसे शेणखत उपलब्ध असल्याने पीकलागवड करताना शेणखताचा पुरेसा वापर केला जातो. त्याचा पीक उत्पादनवाढीला फायदा मिळाला आहे.
असा आहे गोठा – – गाई, म्हशींच्या व्यवस्थापनासाठी 150 बाय 70 फुटांचा गोठा.
– गोठ्यात दुधाळ गाई, कालवडी आणि वासरांसाठी स्वतंत्र व्यवस्था. चारा योग्य पद्धतीने खाता यावा यासाठी योग्य आकाराच्या गव्हाणी.
– डोक्‍याकडे डोके या पद्धतीने गाई गोठ्यात बांधल्या जातात. दोन्ही बाजूंच्या गव्हाणींमध्ये मोकळी जागा. तेथून चारा, पशुखाद्य देणे सोपे जाते. जनावरांवर व्यवस्थित लक्ष ठेवता येते.
– गाईंना पाहिजे तेव्हा स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे यासाठी त्यांनी प्रत्येक गाईंच्या समोर पाण्याची भांडी बसवली आहेत. पाइपद्वारा प्रत्येक भांड्यास पाण्याची टाकी जोडलेली आहे. त्यामुळे गाईंनी जेवढे पाणी प्यायले तेवढे परत त्या भांड्यात जमा होते.
– गोठ्याच्या बाजूला पाण्याची टाकी, मजुरांना राहण्याची खोल्या बांधल्या आहेत.
– गोमूत्र, गोठा धुतलेले पाणी बाहेर नेण्यासाठी गोठ्यात कडेला नाली आहे. हे पाणी पाइपलाइनच्या माध्यमातून शेतात सोडले आहे.
गोठा व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या बाबी – जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दररोज गोठा स्वच्छ धुतला जातो.
– गोठ्यात जनावरांना बसण्यासाठी सिमेंटचा कोबा करण्यात आला होता, त्यामुळे गाईंची नखे, गुडघ्यांना उठता- बसताना जखमा होत होत्या. हे टाळण्यासाठी गाईंना बसण्यासाठी मॅटचा वापर केला जातो.
– पशुवैद्याकडून जनावरांच्या आरोग्याची तपासणी केली जाते. शिफारशीनुसार लसीकरण, जंतनिर्मूलन केले जाते.
– चाऱ्याच्या व पाण्याच्या काटेकोर वापरावर भर आहे.
– प्रत्येक दिवसाचे नियोजन करून ते काटेकोर पाळले जाते.
– जनावरांसाठी असणाऱ्या आठ मजुरांची राहण्यासाठी चांगल्या घरांची सोय केली आहे, तसेच गोबरगॅस उपलब्ध करून दिला आहे.
असे आहे पशुपालनाचे अर्थशास्त्र – – सध्या 60 होल्स्टिन फ्रिजियन गाई दुधाळ आहेत. एक गाय प्रतिदिन सरासरी 20 ते 30 लिटर दूध देते.
– गोठ्यातील सर्व जनावरांना दिवसाला 200 किलो पशुखाद्य लागते. या खाद्याचा खर्च पाच हजार येतो. वैरणीस दोन हजार आणि मजुरी दोन हजार जाते. हिरवी वैरण शेतातील असते, परंतु कडबा विकत आणावा लागतो.
– सध्या सकाळी सरासरी 350 लिटर आणि संध्याकाळी 350 असे एकूण दिवसाला सरासरी 700 लिटर दूध जमा होते. या दुधाला जागेवर 21 रुपये भाव मिळतो. फॅटनुसार दर कमी-जास्त होतो.
– सर्व जनावरांचे खाद्य बैरण, मजुरी, इतर किरकोळ खर्च वजा जाता खर्च दिवसाला सरासरी पाच हजार रुपये मिळतात, परंतु खर्च आता वाढतो आहे. त्यामुळे काटेकोर व्यवस्थापन ठेवले जाते.
– वर्षाला 350 ट्रॉली शेणखत तयार होते. एक ट्रॉली शेणखत 3000 रुपयांना विकले जाते.
– दर वर्षी दहा कालवडी गोठ्यात तयार होतात. त्यापासून वेगळे उत्पन्न मिळते. एक कालवड सरासरी 50,000 रुपयांना विकली जाते.
– रोजचे गोठ्यातील दुधाचे संकलन मोठे असल्याने परिसरातील अनेक डेअऱ्यांकडून संपर्क होत असतो, त्यामुळे चांगला दर मिळण्यास मदत होते. स्वतःच्या गाडीतून डेअरीवर दूध पोच केल्यामुळे लिटरमागे दोन रुपये जास्तीचे मिळतात.
काटकोर व्यवस्थापन असेल तरच पशुपालन फायद्याचे – पशुपालनातील वाटचालीबाबत बोलताना जाधव म्हणाले, की गाई, म्हशींच्या व्यवस्थापनामध्ये वडिलांचे मार्गदर्शन आणि बंधू अरविंद यांची मदत होते. जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये डॉ. बापूराव कोरडे, दयानंद ननावरे, पंतगराव देशमुख यांचे चांगले सहकार्य मिळते. चाऱ्याच्या खर्चात बचत करण्यासाठी हायड्रोपोनिक्‍स तंत्राने चारानिर्मिती करण्याचा विचार आहे. सध्या दुधाचे दर बदलत आहेत, तर दुसऱ्या बाजूला चारा, कडबा, पशुखाद्याचे दर वाढत आहेत. नफा कमी होत चालला आहे. यामुळे शासनाने दुधास सातत्याने चांगला भाव मिळावा या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. या व्यवसायामध्ये पहिली चार,पाच वर्षे गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होते, हे लक्षात घेऊन पशुपालकांनी जनावरांचे आरोग्य, लसीकरण, खाद्य व्यवस्थापनाकडे लक्ष दिले तर खर्चामध्ये बचत करणे शक्‍य आहे. योग्य व्यवस्थापनामध्येच दुग्ध व्यवसायाचा आर्थिक नफा आहे.
असा आहे दिनक्रम – – पहाटे चार ते सहा या वेळात गोठ्यातील शेण गोळा करून गोठा स्वच्छ केला जातो.
– सहा ते आठ या कालावधीत गाईंच्या धारा दूध काढणी यंत्राने काढल्या जातात.
– गाईंना 20 किलो हिरवा चारा आणि कडबा कुट्टी करून दिला जातो. त्याचबरोबरीने सकाळी तीन किलो आणि संध्याकाळी तीन किलो खुराक दिला जातो.
– गोळा झालेले दूध स्वतःच्या गाडीतून सातारा येथे डेअरीवर पोच केले जाते.
– सकाळी नऊ ते दुपारी तीन या कालावधीत गाई-म्हशी गोठ्यात शांतपणे रवंथ करतात.
– दुपारी तीननंतर गोठा धुतला जातो. सध्याकाळी साडेसहा ते आठ या कालावधीत पुन्हा धार काढली जाते. त्यानंतर दूध सातारा शहरात पोच केले जाते.
संगणकावर होतात सर्व नोंदी…. गोठ्यात जनावरांची संख्या मोठी असल्याने सर्व जनावरांच्या लिखित नोंदी ठेवणे अवघड होते. त्यामुळे त्यासाठी अनिल जाधव यांनी संगणकावर या नोंदी ठेवण्यासाठी प्रणाली तयार केली आहे. गोठ्यातील प्रत्येक गाईला क्रमांक दिलेला आहे. त्यानुसार प्रणालीमध्ये रेतन तारीख, गर्भधारणेची तारीख, दुग्धोत्पादनाची माहिती नोंदविली जाते. या नोंदीमुळे गाईंचे रेतन, दुग्धोत्पादन, कालवडी यांची नोंद तत्काळ उपलब्ध होते. त्यानुसार पुढील नियोजन करणे सोपे जाते.
कष्टाला आधार सुधारित तंत्राचा दुग्ध व्यवसाय केला फायद्याचा
शेतीची पार्श्‍वभूमी कराड शहरापासून उत्तरेस साधारण तेरा किलोमीटर अंतरावर वाघेरी गाव आहे. गावच्या डोंगरकुशीत काशीद यांची वडिलार्जित साडेतीन एकर शेती आहे. सतरा गुंठ्यांत घासगवत, 10 गुंठ्यांत मका, 35 गुंठे क्षेत्रात कडवळ, वीस गुंठे क्षेत्रात उसाचे पीक आहे. उर्वरित क्षेत्रात कडधान्याची पिके घेतात. शेतालगत तीन गुंठ्यांत सुसज्ज असा मुक्त संचार पद्धतीचा गोठा आहे. गाईंना फिरण्यासाठी मुक्त मैदान, स्वतंत्र पाण्याची सोय, निवाऱ्यासाठी शेड, तसेच खाद्य उपयोगी साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र खोलीही तेथे आहे. होल्स्टिन फ्रिजीयन जातीच्या 11 गाई व पाच कालवडी आहेत. सर्व जनावरे सशक्त आहेत.
व्यवसायाला सुरवात विजय काशीद यांचे शिक्षण दहावी झाले. त्यांनी सुरवातीला नोकरीसाठी खूप धडपड केली. मात्र यश मिळाले नाही. सन 2007 पूर्वी त्यांनी तीन वर्षे चालक (ड्रायव्हर) म्हणून नोकरी केली. नोकरीऐवजी शेती व्यवसायच चांगल्या प्रकारे करण्याच्या इराद्याने त्यांनी 2007 ला दुग्ध व्यवसाय करण्याचा मनोदय आखला. सुरवातीला भांडवल नव्हते. मात्र कष्ट करण्याची तयारी असल्याने दूध खरेदीदाराकडून पन्नास टक्के रक्कम उचलस्वरूपी व उर्वरित रक्कम स्वतःकडील गुंतवून 27 हजार पाचशे रुपये खर्चून कराडमधील जनावरांच्या बाजारातून गाई घेतल्या. त्यांचे संगोपन सुरू केल्यानंतर उत्पादित दूध विक्रीतून सुमारे चार ते पाच महिन्यांत खरेदीदाराकडील उचल फिटली. त्यानंतर त्याच पद्धतीने दुसरी गाय खरेदी केली. अशा पद्धतीने पुढे चार गाईंचे सुसूत्रपणे संगोपन केले. त्यांना बंधू सुरेश यांचीही बारावीच्या शिक्षणानंतर साथ मिळू लागली.
गोठा व्यवस्थापन चोख ठेवले दोघा भावंडांनी चिकाटीने कष्ट करत काही महिन्यांतच अंगावरील उचलीचा बोजा कमी केला. तेथून पुढे रोखीने गाई खरेदी केल्या. सुरवातीला पाच गाईंचा गोठा बांधीव होता. गाईंना स्तनदाह व जखमा होऊ लागल्याने बैठकीसाठी मॅटची सोय केली. गाईंना मोकळ्या वातावरणात हिंडता यावे यासाठी दोन वर्षांपासून मुक्त संचार पद्धतीचा गोठा बांधला. सुमारे 25 फूट रुंद व 85 फूट लांबीच्या आवारात गाईंना मुक्तपणे फिरण्याची सोय आहे. उर्वरित 15 फूट रुंद व 85 फूट लांबीच्या क्षेत्रफळात शेड आहे. गोठा उभारणीसाठी सुमारे तीन लाख 75 हजार रुपये खर्च आला. यात दूध खरेदीदाराकडून उचल घेऊन टप्प्याटप्प्याने काम पूर्ण केले. दूध काढणीवेळी गाई शेडमध्ये येतात. तेथे त्यांना वैरणीची कुट्टी व खाद्य देतात. दूध काढणीनंतर गाई मुक्त संचार करतात. मुक्त गोठ्यामुळे शेण काढणी, पाणी पाजणे, गोठ्याच्या स्वच्छतेकामी लागणारे 40 टक्के श्रम कमी झाले आहेत. त्याचबरोबर व्यवस्थापन खर्चात बचत घडली.
दुग्धोत्पादन काशीद यांच्याकडील व्यायलेली गाय चार महिन्यांपर्यंत प्रति दिन 25 लिटर व गाभण कालावधीतील गाय चार ते सात महिन्यांच्या कालावधीपर्यंत 16 ते 17 लिटर दूध देते. प्रतिदिन एकूण सरासरी 110 लिटर दूध उत्पादित होते. प्रति लिटर सरासरी वीस रुपयांपर्यंत दर मिळतो. यातून दरमहा 66 हजारांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यातील सुमारे पन्नास ते साठ टक्के व्यवस्थापन खर्च होतो. मुक्त संचार पद्धतीमुळे रोगराई निवारणासाठी होणाऱ्या खर्चात 70 ते 80 टक्‍क्‍यापर्यंत बचत झाली आहे. खाद्य, सुकी वैरण, टंचाईवेळी आणलेल्या ओल्या वैरणीसाठीही खर्च होतो.
दोन वर्षांपासून पैदाशीच्या वासरांचे संगोपन केले आहे. तसेच तीन ते चार वेत झालेल्या गाईंची विक्रीही केली आहे. त्यापासून उत्पन्न जोडले आहे. वडील भीमराव काशीद, आई सौ. कमल यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन व आत्मविश्‍वास मिळतो. पुढील कालावधीत प्रति दिन 225 ते 250 लिटर उत्पादन करण्याचे नियोजन आहे.
दूध खरेदीदार शाश्‍वत असल्यास हा व्यवसाय फायद्यात राहतो. असे काशीद बंधूंचे म्हणणे आहे. त्यामुळे शाश्‍वत खरेदीदाराकडेच ते दूध विक्री करतात. गोठ्यात दूध काढणी यंत्र आहे. प्रति चार मिनिटास 14 लिटर दूध काढणी क्षमता असणारे हे यंत्र आहे. भारनियमनावेळी पर्यायी व्यवस्था आहे. कष्ट व प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करण्याकडे त्यांचा कल असतो. सूत्रबद्धपणे व्यवस्थापन सांभाळल्याने विना थांबा दर्जेदार दूध उत्पादन घेणे त्यांना शक्‍य झाले आहे.
अनुभवी शेतकऱ्यांकडील गोठ्यांना भेटी देऊन व्यवसायातील बरे-वाईट अनुभव जाणून घेतल्यानंतर त्यानुसार व्यवसाय सांभाळल्यामुळेही प्रगती साधता आली. पहाटे पाच ते सात व सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत गोठ्यातील व्यवस्थापन, तसेच वैरण काढणीची कामे काशीद बंधू स्वतः सांभाळतात. त्यातून मजुरीचा खर्च कमी केला आहे.
गाईंना चाऱ्याबरोबर गोळी खाद्य, सरकी पेंड आदींचा वापर होतो. मुक्त गोठा पद्धत असल्याने रोगराईचे प्रमाण नगण्य आहे. जनावरांत कृत्रीम रेतन तंत्र वापरण्याच्या दृष्टीने पशुवैद्यक गोठ्यावर येतात.
नैसर्गिक अपघाताने गाईंचा मृत्यू झाल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी गाईंचे विमा संरक्षणही घेतले आहे.
दूध विक्री व खाद्यदराच्या हिशेबाने व्यवस्थापन नियंत्रित ठेवतात.
साडेतीन एकर शेती व्यवस्थापनाकडेही लक्ष दिले जाते. ऊस, घासगवत, मका, कडवळ व कडधान्ये ही पिके घेतात. शेणाचे उत्कृष्ट पद्धतीचे भुकटीस्वरूपी खत तयार होते. ते पिकांसाठी वापरले जाते.
नोकरीच्या मागे न लागता एखाद्या कठीण प्रसंगालाही धाडसाने सामोरे जात व्यवसाय कायमस्वरूपी टिकविण्याच्या हेतूने काशीद बंधूंची धडपड सुरू आहे. काहीही झाले तरी भांडवल उशाला असल्याने ते डगमगत नाहीत.
कष्टाची आणखी बाजू सांगायची तर काशीद यांच्या गोठ्याकडे येणारा मार्ग शेतातून आहे. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या वाहनांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अशावेळी काशीद बंधू सायकलीला दुधाच्या किटल्या अडकवून अर्धा किलोमीटर अंतर दूध वाहतूक करतात. त्याच पद्धतीने खाद्याचीही वाहतूक करतात. दरमहा दोन ट्रेलर शेणखत मिळते. वर्षाकाठी पंधरा ट्रेलर शेणखत विकून त्यामधील रकमेतून सुकी वैरण विकत आणतात. उर्वरित शेणखत शेतात वापरतात.
चाराटंचाई काळात ऍझोलामुळे मिळाले दूध उत्पादनात सातत्य
संतुलित आहार न मिळाल्यास जनावरांच्या शरीरप्रकृतीवर, परिणामी दूध उत्पादन आणि प्रजोत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यातच मागील वर्षी राज्यात चारा व पाण्याचा भीषण प्रश्‍न निर्माण झाला होता.
लातूर जिल्ह्याबाबत सांगायचे तर जनावरांची सुक्‍या चाऱ्याची गरज ज्वारीचा कडबा व धान्य उत्पादन घेतल्यानंतर शिल्लक उपपदार्थ (काढ, गुळी व भुसा) यावर अवलंबून असते. हिरव्या चाऱ्याची गरज पाण्याच्या उपलब्धतेनुसार जयवंत, यशवंत व मका या चारा पिकांच्या लागवडीमधून भागवली जाते. जिल्ह्यातील पर्जन्यमानाचा विचार करता पुरेशा पाण्याअभावी उन्हाळ्यात हिरवा चारा उपलब्ध होत नाही. या काळात जनावरांचे पोषण फक्त वाळलेल्या चाऱ्यावर अवलंबून असते.
कदम यांना लागला ऍझोलाचा शोध अशा काळात आपल्या जनावरांना पाण्याअभावी हिरवा चारा उपलब्ध होणार नाही व त्यांचे पोषण व्यवस्थित होणार नाही याची जाणीव आखरवाई (ता. लातूर) येथील श्रीमंत कदम यांना झाली. त्यांनी उपलब्ध तंत्रज्ञानाचा शोध सुरू केला. त्यातून मांजरा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ऍझोला हा पोषक चारा व त्याची उत्पादन पद्धतीही सोपी असल्याचे समजले.
कदम यांचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. त्यांची चार एकर शेती असून ऊस, सोयाबीन, ज्वारी व चाऱ्यासाठी मका ही पिके ते घेतात. पाणी कमी असल्याने शेतीतील उत्पन्नात अनियमितता असते, त्यामुळे शेतीबरोबर जोडधंदा करावा म्हणून 2006 मध्ये त्यांनी होलस्टिन फ्रिजियन (एचएफ) जातीची गाय विकत घेतली व दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. याच गाईपासून मिळालेल्या कालवडीचे चांगल्या प्रकारे संगोपन केले. आज त्यांच्याकडे तीन एचएफ गाई असून त्या —- 20 लिटरपर्यंत दूध देतात.
हिरव्या चाऱ्यासाठी दर वर्षी पाण्याच्या उपलब्धतेनुसार मका असतो. सुक्‍या चाऱ्यासाठी ज्वारीचा कडबा, सोयाबीन गुळी-काड व उसाचे वाढे वापरले जातात. मागील वर्षी खूप कमी पाऊस झाला, त्यामुळे रब्बी व उन्हाळ्यात मका घेता येणार नसल्याची जाणीव झाली. सुक्‍या चाऱ्याची चिंता नव्हती; पण हिरवा चारा गाईंना पुढील पावसाळ्यापर्यंत मिळणार नव्हता. दुष्काळी परिस्थितीत गाईंना सकस व संतुलित आहार पुरवता येणार नसल्यामुळे दूध उत्पादनात सातत्य उरणार नाही याची चाहूल लागली. अशा वेळी मांजरा कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ऍझोला उत्पादनास त्यांनी सुरवात केली.
अशी केली ऍझोलाची शेती कदम यांच्याकडील दोन गाई दुभत्या होत्या. सुरवातीला त्यांना ऍझोला देण्यासाठी वाफे तयार केले. प्रति गाईला दररोज 1.5 ते दोन किलो याप्रमाणे दररोज तीन- चार किलो ऍझोला उत्पादनाची गरज होती. त्यासाठी 10 फूट लांब, सहा फूट रुंद व नऊ इंच खोल आकाराचे दोन वाफे जमिनीमध्ये आंब्याच्या झाडाखाली तयार केले. वाफ्यांचा पृष्ठभाग समपातळीत करून घेतला. झाडांच्या मुळ्या प्लॅस्टिक पेपरमध्ये जाऊन पेपर खराब होऊ नये म्हणून खताचे बारदान अंथरूण घेतले. त्यानंतर वाफ्यावर प्लॅस्टिक पेपर टाकला. वाफ्याच्या बाहेरील प्लॅस्टिकवर माती टाकून घेतली. वाफ्यात अंथरलेल्या प्लॅस्टिक पेपरवर 15 ते 20 किलो खडेविरहित मातीचा थर दिला. त्या थरावर तीन किलो ताजे शेण पाण्यात मिसळून टाकले. नंतर त्यावर 30 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 30 ग्रॅम क्षार मिश्रण टाकून वाफ्यात पाणी सोडले. पाण्याची पातळी 8 ते 10 सें.मी.पर्यंत ठेवली. त्यानंतर एक किलो ऍझोला कल्चर वाफ्यातील पाण्यावर सोडले. अशाच प्रकारे दुसरा वाफा तयार केला.
आता सर्व जनावरांना ऍझोला वाफा पूर्णपणे भरल्यानंतर ऍझोलाची वाढ झाल्यानंतर तो काढण्यास सुरवात केली. दररोज प्रत्येक वाफ्यातून 1.5 ते दोन किलो ऍझोला झाऱ्याच्या साह्याने काढले व पाण्याने धुऊन घेतले. हे पाणी वाफ्यामध्ये टाकले. सुरवातीला ऍझोला खुराकात मिसळून गाईंना दिला. आता गाई तो स्वतंत्रही खातात. सध्या दोन वाफे तयार केले आहेत. सर्व जनावरांना ऍझोला खाऊ घातला जातो.
हिरवा चारा उपलब्ध नव्हता त्यावेळी गाईंना दररोज सकाळी ज्वारीचा कडबा, दुपारी उसाचे वाढे व संध्याकाळी सोयाबीन काड-गुळी दिली जायची, तसेच प्रत्येक गाईला तीन किलो मका चुनी, दोन किलो सरकी पेंड व एक किलो भुईमूग पेंडही दिली जायची. ऍझोला उत्पादन सुरू झाल्यानंतर दररोज 1.5 ते दोन किलो ऍझोला प्रत्येक गाईला खुराकात मिसळून देणे शक्‍य झाले. आता भुईमूग पेंड देणे बंद केले, त्यामुळे खर्चात बचत झाली.
असे झाले फायदे 1- हिरव्या चाऱ्याची कमतरता भासली नसून गाईंच्या दूध उत्पादनात वाढ झाली, त्यात सातत्य आले.
2- गाईचे वेत आठ महिन्यांपूर्वी होऊनही दूध उत्पादन कमी झाले नाही.
3- दुधाला फॅट चांगले आले.
4- भुईमूग पेंड बंद केल्यामुळे खर्चात बचत झाली.
5- गाई वेळेवर माजावर येऊन गाभण राहिल्या.
6- गाईंच्या शरीरप्रकृतीत खूप सुधारणा झाली.
7- चाराटंचाईच्या काळात गाईंना पोषक चारा मिळाला.
8- गाई ऍझोला आवडीने खातात.
ऍझोलाचे वैशिष्ट्य ऍझोलाचे उत्पादन सोपे असून ते कमी खर्चाचे आहे. त्याचा एक वाफा तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्लॅस्टिक पेपरला 400 ते 500 रुपये लागतात. प्लॅस्टिक पेपरचा खर्च वगळता वर्षाला एका वाफ्यासाठी 175 – 200 रुपये खर्च येतो.
कोल्हापूर जिल्ह्यात नानीबाई चिखली हे कागलपासून वीस किलोमीटर अंतरावरील सुमारे दहा हजार लोकसंख्येचे गाव. याच गावातील यशवंत पाटील यांची दहा एकर शेती आहे. सन 1999 मध्ये आपली मुले अरविंद व अमर यांच्या मदतीने त्यांनी अडीच लाख रुपये कर्ज काढून दुग्ध व्यवसाय सुरू केला. पहिल्या वेताच्या पाच गाई कोलारहून आणल्या. त्यानंतर पैदास वाढवत जनावरांची संख्या 70 पर्यंत पोचली आहे. जन्मलेल्या वासरांची योग्य निगा राखल्यानेच हे शक्‍य झाले. गोठ्यात सुमारे पंचाहत्तर जनावरे आहेत. यात चाळीस गाई, तीस कालवडी, तीन मुऱ्हा पंढरपुरी म्हशी, तर दोन जातिवंत वळू आहेत. होलस्टीन फ्रिजीयन (एचएफ) जातीच्या चाळीस गाई आहेत. त्या प्रति दिन सरासरी 20 ते 36 लिटर दूध देतात.
गोठ्याची आदर्श उभारणी – गोठा पन्नास जनावरांच्या क्षमतेचा. शेजारी मुक्त स्वरूपातील गोठ्यासाठी जागा.
– गोठा बांधताना पिलरऐवजी पाइपचा आधार. सभोवती चार फुटांची भिंत.
– हेड टू हेड (जनावरांची डोकी समोरासमोर) पद्धतीची रचना.
– 75 फूट लांबीची व दोन फूट उंचीची गव्हाण.
– मस्टायटीस, गुडघी, खुरांचा आजार, पाय फासटणे आदी समस्या टाळण्यासाठी जनावरांच्या पायाखाली रबरी मॅट.
– तापमान नियंत्रणासाठी फॉगर सिस्टिम. उन्हाळ्यात चाळीस अंशांपर्यंत तापमान गेले तर ही यंत्रणा कार्यान्वित केली जाते.
गोठ्यातील कार्यपद्धती – पहाटेच्या सुमारास कुटुंबातील तिघे व दोन मजुरांच्या साहाय्याने जनावरांची स्वच्छता.
– चारा, पशुखाद्य, पाणी, धारा काढणे ही कामे सकाळी नऊ वाजेपर्यंत.
– दूध काढणीसाठी मिल्किंग मशिनचा वापर.
– सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत जनावरांना विश्रांती.
– धारा काढल्यानंतर जनावरांना शेजारील मुक्त गोठ्यात सोडले जाते.
– सकाळी सात ते नऊ या वेळेत जनावरांना व्यायाम.
– गाभण जनावरांना नैसर्गिक वातावरण मिळावे यासाठी मुक्त गोठा परिसरात सोडले जाते. शेजारी कालवडींसाठी स्वतंत्र व्यवस्था.
चारा व अन्य प्रभावी नियोजन – दहा एकर शेतीत सहा एकरांवर ऊस. उर्वरित क्षेत्रावर एक एकर मका व कडवळ, दोन एकर गवत, तसेच मका क्षेत्रात चवळी व लसूण घास अशी वैविध्यपूर्ण चारा पिके
– मजूर खर्च वाचविण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून कापणी यंत्राचा वापर. दहा किलो वजनाचे यंत्र दहा रुपयांच्या पेट्रोलमध्ये दोन टन चारा कापते, तो पंचाहत्तर जनावरांना पुरेसा होतो.
– दिवसाला प्रति जनावर 26 किलो ओला व सहा किलो कोरडा चारा मिसळून व दोन टप्प्यांत सकाळी व संध्याकाळी दिला जातो. कोरडा चारा कुट्टीद्वारे दिला जातो.
– नजीकच्या दूध संघाचे पशुखाद्य प्रति लिटरला चारशे ग्रॅम, तर खनिज मिश्रण पावडर दिवसाला शंभर ग्रॅम प्रति जनावर याप्रमाणे दिले जाते.
– वर्षभर पुरेल इतका मुरघास तयार करून गरजेनुसार वापर.
– गव्हाणीत दोन तास चारा व वीस तास कालावधीसाठी समोर पाणी राहील याप्रमाणे नियोजन. जनावरांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे या उद्देशाने हे नियोजन.
– योग्य प्रथिने मिळणारा चारा दिल्याने आजारांचे प्रमाण कमी.
– कृत्रिम रेतन, वेळीच लसीकरण.
– अशा व्यवस्थापनामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी, त्यामुळे औषधोपचारावरील खर्च ऐंशी टक्‍क्‍यांपर्यंत, तर मरतूकही शून्य टक्‍क्‍यापर्यंत कमी झाली आहे.
वासरू संगोपन योजनेत आघाडी शेतकऱ्यांनी आपल्या गोठ्यातच वासरे तयार करावीत, या हेतूने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) वासरू संगोपन योजना राबविली आहे. त्याअंतर्गत पाटील कुटुंबाकडे 84 कालवडींची नोंद आहे. दूध संघाकडून 40 कालवडींसाठी अनुदान घेणारे हे एकमेव कुटुंब आहे.
अर्थशास्त्र – दिवसाचे दूध संकलन – 400 लिटर (सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी दोनशे लिटर)
* दुधाचे फॅट – 4.2 ते 4.3
* एस.एन.एफ. – 9 प्रति लिटर दुधाला मिळणारी किंमत – 21 रुपये
– वार्षिक उपलब्ध होणारे शेणखत – सुमारे 125 ट्रॉली
* शेणखताचे उत्पन्न – दोन लाख 50 हजार (प्रति ट्रॉली किंमत दोन हजार रुपये धरल्यास)
* दूध संघाचा बोनस (वार्षिक) – दीड लाख रुपये
* वर्षाला 15 ते 20 गाईंची विक्री, त्यातून पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम
* एकाही जनावरावर विमा नाही
दुग्ध व्यावसायिकांची शाळा भरली… पाटील कुटुंबीयांतील अरविंद व अमर बंधूंकडे 1999 पासूनची अनुभवाची शिदोरी आहे. त्यांच्या गोठ्याचे यश पाहून दूध संघाने गेल्या वर्षी त्यांच्याकडे दुग्ध उत्पादक सभासदांना प्रशिक्षण देण्याची (मायक्रो ट्रेनिंग सेंटर) जबाबदारी सोपवली. त्यानुसार सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी येथे प्रशिक्षण घेतले आहे. पन्नास ते साठ लोकांचे एकदिवसीय प्रशिक्षण होते.
गोठ्याशेजारी “लेक्‍चर रूम’ असून आधुनिक बैठक व्यवस्था, साउंड सिस्टिम, फळा, आदर्श दुग्ध व्यवस्थापनाचे तक्ते, वही, पेन आदींची सोय आहे. गोठा पाहणीसह त्याचे व्यवस्थापन, स्वच्छता, रबर मॅटची आवश्‍यकता, पशुखाद्य व्यवस्थापन, औषधे, लसीकरण, जनावरांच्या नोंदी, माजाचा काळ, कृत्रिम रेतन याविषयी सविस्तर माहिती दिली जाते. प्रशिक्षणार्थींसाठी स्वयंपाक करताना पाटील कुटुंबातील महिलांचे हात थकत नाहीत. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाते. आलेल्या लोकांवर आपुलकीने लक्ष ठेवण्याचे काम यशवंत यांचे वयस्क आई- वडील करतात. प्रत्येक प्रशिक्षणार्थीमागे एकशे साठ रुपये खर्च येतो. त्यापैकी दूध संघ प्रति व्यक्ती 100 रुपये, तर सदस्य 60 रुपये पाटील कुटुंबाला देतो. अरविंद यांना “जनावरांचे मास्तर’ नावानेच ओळखले जाते.
एकीचे बळ हीच ठरली ताकद व्यवसाय सुरू झाल्यानंतर पहिली पाच वर्षे पारंपरिक पद्धतीनेच दुग्ध व्यवसाय केला. अनुभवातून शहाणपण आले. तज्ज्ञांकडून शास्त्रोक्त माहिती घेत अनुभवाला त्याची जोड दिली व व्यवसाय फायद्यात आणला. कोणताही निर्णय आम्ही एकत्रित घेतो. ग्रामीण भागात विभक्त कुटुंबामुळे शेती किंवा अन्य व्यवसायाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, परिणामी नुकसान होते; पण गोठ्याचे व्यवस्थापन, त्याचा नफा याचा मोठा संबंध कुटुंबातील “एकी’शी जोडला गेला आहे. याचा अभिमान असल्याचे अरविंद यांनी सांगितले.
करून घेतो. आपल्या गाईला आहारातील कोणता घटक किती प्रमाणात द्यायचा, त्यामधील प्रथिने, कोरडा शुष्कांश, खनिजे, ऊर्जा इ.बाबतची पशुपालकाला माहिती असते. गोठा सुरू करण्यापूर्वी त्याबद्दल प्रशिक्षण किंवा दोन वर्षे प्रत्यक्ष गोठ्यात कामाचा अनुभव घेणे येथील पशुपालकाला अनिर्वार्य आहे.
यांचाही विचार केला जातो. वळूची शारीरिक गुणवैशिष्ट्ये तपासली जातात, त्यानुसार पुढील पिढीकरिता कोणता वळू वापरावा हे निश्‍चित करतात. सदर वळू सिद्ध होण्याकरिता देशातील विविध कळपांमध्ये या वळूपासून तयार झालेल्या कालवडींचे निरीक्षण आणि अभ्यास केला जातो. जर वळूपासून उच्च प्रतीच्या कालवडी तयार झालेल्या असल्यास हा वळू सिद्ध वळू समजला जातो. यासाठी कालवडींची शरीर रचना, दूध उत्पादन, रोगप्रतिकारशक्ती हे निकष प्रामुख्याने लक्षात घेतले जातात. हा सिद्ध वळू देशातील विविध कळपांमध्ये पुढील काळात वापरला जातो.
सन 1840 पासून शेतकऱ्यांनी स्थापन केलेली सहकारी तत्त्वावरील “कॅटल ब्रिडिंग असोसिएशन’ काम करीत आहे. या संघटनेने निवड केलेल्या सिद्ध वळूंचा वापर रेतनासाठी केला जातो. सदर वळू विविध चाचण्या आणि शास्त्रीय कसोटीवर निवडला जातो. वळूची निवड करताना कळपातील प्रत्येक जनावराचा पशुपालक आणि पशुवैद्यकीय अधिकारी अभ्यास करतात. कळपातील गाईंची दूध उत्पादन क्षमता, शारीरिक वैशिष्ट्ये जसे की कासेची रचना, आकार, पायाची रचना पाहिली जाते; तसेच महत्त्वाचे म्हणजे दुधातील घटक जसे की, प्रथिने व फॅट
गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन हेच नेदरलॅंडचे ध्येय…
प्रत्येक पशुपालकाला सरकारने दुग्धोत्पादनाचा कोटा ठरवून दिलेला आहे. पशुपालकाने दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त दूध उत्पादन घेतले, तर सरकार त्याला दंड करते. दर्जेदार दूध उत्पादन मिळविणे, ही येथील पशुपालकांची प्राथमिकता असते. या देशात फॅट ऐवजी प्रथिनांवर दुधाचा दर ठरतो.
नेदरलॅंडमधील गाईंचे दूध मुख्यत्वे चीज तयार करण्यासाठी वापरले जाते. येथील चीजला जगभरातील बाजारपेठेत मागणी आहे. त्यामुळे निर्यातीसाठी लागणाऱ्या गुणवत्तेनुसार दूध उत्पादन होण्यासाठी येथील पशुपालक गाईंचे काटेकोर व्यवस्थापन ठेवतात. पशुपालकांच्या स्तरावर गोठ्यात दूध काढण्यापासूनचे नियम कडक आहेत. प्रत्येक पशुपालकाला सरकारने दुग्धोत्पादनाचा कोटा ठरवून दिलेला आहे. जर पशुपालकाने दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त दूध उत्पादन घेतले, तर सरकार त्याला दंड करते. दूध स्वच्छ व रोगजंतुविरहित तयार करणे, ही तेथील शेतकऱ्यांची प्राथमिकता असते. दुधात निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त सोमॅटिक सेल काउंट किंवा पांढऱ्या रक्तपेशी आढळल्यास किंवा निर्धारित संख्येपेक्षा जिवाणूसंख्या जास्त आढळल्यासही सरकार त्या पशुपालकास दंड करते, त्यामुळे या सर्व बाबतीत पशुपालक खूप दक्ष आहेत.
गाईंना कासदाह होऊ नये तसेच दुधाची प्रत खराब होऊ नये याकरिता पशुपालक सातत्याने पशुवैद्यकांचे सल्ले घेतात. मोठ्या गोठ्यामध्ये दूध काढणी यंत्रे, साठवणुकीचे बल्ककुलर, तसेच इतर उपकरणांची काळजी घेतात. गाईंच्या बरोबरीने गोठ्याचीही काटेकोर स्वच्छता येथील पशुपालक ठेवतात.
सुदृढ गाई हाच दुग्धोत्पादनाचा पाया ः नेदरलॅंडमध्ये घटसर्प, फऱ्या, ऍन्थ्रॅक्‍स, लाळ्या खुरकूत, गोचिडताप, ब्रुसोलेसिस यासारखे रोग दिसत नाहीत. मात्र, काही गाईंमध्ये कासदाह, अपचन, निमोनिया यासारखे रोग दिसतात. सुरवातीपासूनच येथील पशुपालक गाईंचे व्यवस्थापन करताना “टेस्ट अँड स्लॉटर’ ही पद्धत अवलंबतात, त्यामुळे तेथे रोगकारक गाई दिसत नाहीत. त्यातल्या त्यात गाईला जर स्टॅफेलोकोकल मस्टायटीस हा रोग झाल्यास झाल्यास तेथील पशुवैद्यक तीन दिवस त्या गाईस उपचार करतात. जर गाईने उपचारास प्रतिसाद दिला तर गाईला गोठ्यात ठेवले जाते, अन्यथा ही गाय त्वरित गोठ्यातून बाहेर काढली जाते. ब्रुसोलेसिस (सांसर्गिक गर्भपात), इन्फेक्‍शिअस बोवाईन ऱ्हायनोट्रेकायटिस (आयबीआर), ऍथ्रॅक्‍स सारखे रोग जनावरांपासून माणसांना होऊ शकतात. आपल्याकडे अशा गाई रोगनिदान झाल्यावर त्वरित बाजारात विकल्या जातात, त्यामुळे अशा गाईंद्वारे दुसऱ्या गोठ्यात रोगाचा प्रसार होतो. त्यामुळे निरोगी जनावरे आणि माणसे या रोगांनी बाधित होऊ शकतात. याबाबत आपल्याकडे धोरण ठरविणे आणि अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. भविष्यातील दुग्ध व्यवसायास अशा गोष्टी मारक ठरतात.
नेदरलॅंडमध्ये एखाद्या भागात गाईंच्या रोगाचा झपाट्याने प्रसार झाला, तर त्या भागातील सर्व गाई नष्ट केल्या जातात. संबंधित पशुपालकाला सरकार नवीन गाईंच्या खरेदीसाठी आर्थिक मदत करते किंवा निरोगी गाईंची खरेदी करून देते, पशुपालकाला वाऱ्यावर सोडले जात नाही.
आपल्याकडेही जातिवंत गाई- म्हशींचे संवर्धन महत्त्वाचे आहे. निव्वळ दुग्धोत्पादनापेक्षा गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनावर येत्या काळात भर दिला पाहिजे, तरच देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत आपल्या पशुपालकाला चांगला दर मिळेल. परदेशातील नवीन संशोधनही आपण आत्मसात केले पाहिजे, त्यामुळे खाद्य व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापनावरील खर्च कमी करणे शक्‍य आहे.
जमीन आणि पाणी प्रदूषणावर उपाययोजना ः
1) नेदरलॅंडमधील शेतजमिनीत अगदी पाच फुटांखाली पाणी लागते, कारण येथील जमीन वालुकामय आणि समुद्र सपाटी खाली आहे. त्यामुळे तेथे पाणी निचऱ्याची समस्या आहे. यामुळे ज्या शेतात चारा लावला जातो, तेथील मातीमधील अन्नद्रव्यांची आणि इतर घटकांची दरवर्षी तपासणी आवश्‍यक आहे.
2) माती- पाणी परीक्षण केंद्राने दिलेल्या मर्यादेनुसारच चारा पिकांना खते वापरणे शेतकऱ्याला बंधनकारक आहे. जास्त खते वापरल्याचे माती- पाणी परीक्षणात आढळल्यास त्या शेतकऱ्यास दंड लावला जातो.
3) निसर्ग व पीक पद्धती यांचे संतुलन राखून शेती करणे ही पद्धत तिथे शेतकऱ्यांनी आत्मसात केली आहे.
4) गाईंच्या शेणामुळे जमिनीत नायट्रोजन किंवा अमोनियाचे प्रदूषण होऊ नये याकरिता प्रत्येक गोठ्याखाली मोठी टाकी केलेली असते.
5) गोठ्याची जमीन ही लोखंडी प्लेटची असते. या गोठ्यात पडणारे शेण साफ करण्यासाठी प्रत्येक गोठ्यात बॅटरीवर चालणारा आणि बॅटरी संपत आल्यास स्वतःला परत चार्जरने चार्ज करणारा रोबोट पाहायला मिळतो.
6) सरकारने प्रत्येक पशुपालकाला गोठ्यातील जनावरांच्या संख्येनुसार किती मर्यादेपर्यंतच शेण तयार झाले पाहिजे याचा कोटा निश्‍चित केलेला असतो. जर जास्त शेण तयार केले, तर शेतकऱ्याला दंड भरावा लागतो.
7) पशुपालनासंबंधी सर्व नियमावली ही पशुपालकांनी स्वतः तयार केलेली आहे. पुढील पिढीला प्रदूषणमुक्त, स्वच्छ निर्मळ दूध तयार करणे हेच येथील पशुपालकांचे ध्येय आहे.
प्रथिनांवर ठरतो दुधाचा दर… 1) नेदरलॅंडमधील गाईच्या दुधातील फॅटऐवजी प्रथिने हा घटक दुधाचा दर ठरविण्याकरिता वापरला जातो. आपल्याकडे एका गाईने एका वितात किती दूध दिले असे विचारले जाते; परंतु नेदरलॅंडमध्ये मात्र एका गाईने एका वितात किती हजार किलो प्रथिने दिली, असे विचारले जाते.
2) बाजारात येणाऱ्या दुधावर पाश्‍चरायझेशन किंवा अल्ट्रा हाय ट्रीटमेंटची प्रक्रिया करून टेट्रापॅकमध्ये हे दूध पॅक करून विकले जाते. काही कंपन्या कॉफी करण्याकरिता वेगळे दूध तयार करतात.
3) नेदरलॅंडमध्ये तीन कंपन्या पशुपालकांकडून दूध विकत घेतात. स्वतःच्या “ब्रॅंडनेम’ने दुधाची विक्री त्यांच्या मॉलमध्ये करतात. दूध उत्पादन ते विक्रीची साखळी येथे तयार झाली आहे.
4) ग्राहकाला स्वच्छ, ताजे आणि गुणवत्तापूर्ण दूध देण्याकडे त्यांचा कल आहे.
नेदरलॅन्ड देशात होल्स्टिन फ्रिजियन गाईंचे सर्वांत जास्त प्रमाण आहे. ही गाय एका वितामध्ये 10 हजार लिटरहून जास्त दूध देते. गाईंमध्ये 100 टक्के कृत्रिम रेतन केले जाते. या ठिकाणी सात गाईंपासून ते 5000 गाईंचा सांभाळ करणारे पशुपालक पाहावयास मिळतात. येथील पशुपालक अद्ययावत तंत्रज्ञानाने समृद्ध आहेत.
जगातील काही निवडक दूध उत्पादक देशांपैकी नेदरलॅंड हा एक महत्त्वाचा युरोपीय देश. या देशाचे क्षेत्रफळ हे 41,543 चौरस कि.मी. आहे. शीत कटिबंधीय प्रदेशात हा देश असल्याने याठिकाणी सहा महिने बर्फ आणि चार महिने उन्हाळा अशा प्रकारचे वातावरण असते. या देशातील लोक इतिहासकाळापासून दर्यावर्दी आणि प्रयोगशील म्हणून प्रसिद्ध आहेत. नेदरलॅंडमधील 60 टक्के जमीन ही पशुपालन व्यवसायाकरिता वापरली जाते. येथील डच डेअरीकडे 20,000 डेअरी फार्म आहेत. या फार्ममध्ये सुमारे 1.5 दशलक्ष गाई असून. वार्षिक दूध उत्पादन 11.9 सहस्रलक्ष किलो होते. या ठिकाणी दुधापासून चीज, बटर, दूध पावडर मोठ्या प्रमाणात तयार केली जाते. या देशाला दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीमधून 6.4 सहस्रलक्ष डॉलरचे उत्पन्न मिळते.
जातिवंत वळू आणि गाईंची पैदास नेदरलॅंडमध्ये आमच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान रोज 60 लिटर दूध देणाऱ्या गाई पाहण्याचा योग आला; तसेच उच्च गुणवत्तेचे वळू तयार करणाऱ्या काही सहकारी कंपन्यांमध्ये अभ्यास करण्याची संधी मिळाली. येथील कंपन्या शेतकऱ्यांबरोबर जातिवंत वळू निर्मितीमध्ये सहभागी असतात. इस्टलॅंड फार्मस्‌ येथे एका पशुपालकाकडे 20 वळू तयार करण्यात आले होते. या पशुपालकाकडील गाईंच्या नरवासरांचे संगोपन करून नंतर वयात आलेल्या वळूंचे वीर्य कृत्रिम रेतनाद्वारे इतर कळपातील गाईंसाठी वापरून त्यांच्यापासून तयार झालेल्या कालवडींचा अभ्यास ही कंपनी करत होती. असे वळू उत्पादनक्षमतेमध्ये सिद्ध झाल्यास त्यांची निवड देशांतर्गत तसेच परदेशांत कृत्रिम रेतनासाठी केली जाते.
आपल्याकडे मात्र अजूनही शेतकरी आणि दुग्ध व्यवसायासंबंधी सर्व यंत्रणा गाय माजावर आल्यास ती गाभण राहिली पाहिजे, याचाच विचार करतात; परंतु पुढील पिढीतील दुधाचे उत्पादन किती असेल? किंवा कोणता वळू या गाईसाठी योग्य आहे? याबाबत अजूनही फारसे पाहिले जात नाही. सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे 5000 ते 6000 लिटर दूध देणाऱ्या संकरित होल्स्टिन फ्रिजियन गाई आहेत; परंतु या गाईपासून तयार होणाऱ्या कालवडी तिच्या आईपेक्षा कमी दूध देतात, असे चित्र दिसत आहे. या सगळ्यामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या निवडीचा व प्रजननाच्या नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. हे लक्षात घेऊन आपल्याकडेही गाईंच्या प्रजननाकरिता व पुढील काळात उत्तम प्रतीची जनावरे तयार करण्याकरिता पशुपैदास संघटना तयार होणे गरजेचे आहे. यामधून आपल्याकडील भौगोलिक स्थितीत तग धरून चांगले दूध उत्पादन देणाऱ्या गाई तयार होतील, त्यामुळे नवीन पशुपालकास गाईंची बाजारातून खरेदी करताना संभ्रम होणार नाही.
गाईंचे पोषण नेदरलॅंडमध्ये सहा महिने बर्फवृष्टी आणि नंतर सहा महिने सूर्यप्रकाश, पावसाळा असतो, त्यामुळे या सहा महिन्यांत जमेल तसे शेतात चाऱ्याचे उत्पादन घेतले जाते, त्यापासून सुधारित पद्धतीने मुरघास तयार केला जातो. हा मुरघास वर्षभर पुरवला जातो. मुरघास तयार करताना मका तसेच गवताचा अंर्तभाव मोठ्या प्रमाणात केला जातो. शेतजमिनीचा 60 टक्के भाग चारा पिकांची लागवड आणि गवताळ कुरणांसाठी ठेवला जातो. मुरघासासाठी मक्‍याच्या वेगळ्या जातींची लागवड केली जाते. मुरघासाकरिता मक्‍याची पक्व अवस्था कशी ओळखावी यासंबंधी तेथील कंपन्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.
मनुष्यबळाची कमतरता, महागडी मजुरी या समस्या तेथेही आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा अवलंब येथील शेतकऱ्यांनी केला आहे. मका मुरघासासाठी पक्व झाला की शेतकरी मुरघास तयार करणाऱ्या कंपनीला संपर्क करतो. कंपनीचे लोक शेतावर येऊन मका कापून तो लगेच ट्रकमध्ये भरून घेऊन जातात. हा मका मुरघासासाठी तयार करण्यात आलेल्या मोठ्या टाक्‍यांत भरला जातो. योग्य पद्धतीने चाराकुट्टी भरून प्लॅस्टिक पेपरने मुरघासाची टाकी बंद केली जाते. त्यानंतर दोन महिन्यांनी मूरघास तयार झाल्यानंतर तो जनावरांसाठी वापरला जातो. मुरघासाबरोबर फळ प्रक्रिया उद्योगातील फळांच्या साली, बार्ली, मेथीघासाची गोळी पेंड इ.चा गाईच्या आहारात वापर केला जातो. प्रत्येक पशुपालक नजीकच्या विद्यापीठात जाऊन किंवा पशुतज्ज्ञांकडून दरवर्षी प्रत्येक गाईचे आहार नियोजन तयार यांत्रिकीकरणाचा वापर ः या देशात मनुष्यबळाची कमतरता असल्याने यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात आहे. चारा कापणी, मुरघास बनविणे, गाईची धार काढण्याकरिता यंत्रमानवाचा वापर, वासरांना दूध पाजण्याकरितासुद्धा यंत्रमानवाचा वापर येथील पशुपालक करताना दिसतात.
आपल्याकडे जमिनीचा आकार लहान असल्याने चारा कापणी यंत्रे वापरण्यावर मर्यादा आहेत; परंतु तरीही आपल्या भागात उपयोगी पडणारी आणि लहान स्तरावर काम करणारी यंत्रे उपलब्ध होणे गरजेचे आहे. कामे वेळेत व कमी मजुरांमध्ये होऊन शकतील अशी यंत्रे तयार होण्याकरिता सरकारी, खासगी आणि संशोधन संस्थांच्या स्तरावर काम होणे गरजेचे आहे.
प्रत्येक गाईची नोंद ः या देशातील सर्व गाईंच्या दूध उत्पादनाची नोंद रोजच्या रोज केंद्रीय ठिकाणी ठेवली जाते. प्रत्येक गाईला एक ओळखक्रमांक दिला जातो. या नोंदींमध्ये गाईचा जन्म दिनांक, शरीररचना, तिच्या आई-वडिलांची वैशिष्ट्ये, प्रत्येक विताचे दूध, प्रथिने, फॅट, झालेले आजार, प्रजनन याबाबत नोंद असते. नोंद नसलेले जनावर पाळण्यास किंवा बाजारात विकण्यास कायद्याने मनाई आहे. हे सर्व नियम काटेकोरपणे शेतकरी पाळतात. दरवर्षी उत्तम दूध व्यावसायिक शेतकऱ्यांना आणि पशुपैदासकारांना प्रोत्साहन देण्याकरिता देशातल्या विविध भागांत प्रदर्शन घेतले जाते. यामधून उत्तम गाई, कालवडींची निवड करून त्यांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव केला जातो. नेदरलॅन्ड येथे इस. 1621 मध्ये अमेरिकेत निर्यात केलेल्या प्रत्येक होल्स्टिन गाईची नोंद आजही उपलब्ध आहे.
सुधारित तंत्र व व्यवस्थापनासून साकरला दुग्घव्यवसाय
जोडधंद्याची जोड दिल्यास शेती फायदेशीर ठरते. शिवाय जोडधंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचावते. सोनार कामाचा पारंपरिक व्यवसाय सुरू ठेवीत पुसद (जि. यवतमाळ) येथील उमेश पंधे यांनी भोजला येथे पंधे डेअरी फार्म सुरू केला. गाई-म्हशींची सुयोग्य देखभाल व गोठा व्यवस्थापन ते करतात. दर दिवशी 150 लिटर दुधाच्या संकलनातून नफाही समाधानकारक मिळत आहे. आमीन चौहान उमेश व गणेश पंधे बंधूंकडे वडिलोपार्जित सहा एकर ओलिताची शेती आहे. पारंपरिक शेती करीत असतानाच या बंधूनी नोव्हेंबर 2011 मध्ये म्हैस विकत घेतली. त्यापासून बारा लिटर दूध दररोज मिळायचे. निम्मे दूध घरी ठेवून उर्वरित दुधाची ते घरूनच विक्री करीत. दुधाचा दर्जा चांगला ठेवल्याने मागणी वाढू लागली. त्याप्रमाणे व्यवसाय वाढविण्याचा निर्णय पंधे बंधूंनी घेतला. परभणी बाजारातून सहा जाफराबादी व चार मुऱ्हा म्हशी, तर नगर जिल्ह्यातील लोणी येथून 11 होलस्टिन फ्रिजीयन व एक फुले- त्रिवेणी अशा गाई विकत घेतल्या. आज त्यांच्याकडे 11 म्हशी व 12 गाई आहेत.
-जाफराबादी म्हशीच्या दुधाला फॅट चांगला मिळतो, तर फुले त्रिवेणीपासून भरपूर दूध मिळते.
-मुऱ्हा म्हशी स्वभावाने काहीशा चंचल असल्या तरी भरपूर दूध देतात. मात्र जाफराबादीच्या तुलनेत दूध पातळ असते.
…असे आहे गोठा व्यवस्थापन * जनावरांना बाराही महिने हिरवा चारा पुरविण्याचे नियोजन
* वर्षभर पुरेल एवढा कोरडा चारा विकत घेऊन साठवला जातो.
* कडबा कुट्टीद्वारे जनावरांना दिला जातो.
* वर्षभर चाऱ्यासाठी एक एकरात मका व यशवंत फुले गवताची लागवड
* तोंडखुरी व पायखुरी या रोगांसाठी नियमित लसीकरण, कासदाह रोग होऊ नये यासाठी काळजी.
* गोठ्यातील शेण ट्रॉलीद्वारे उचलले जाते.
* गोठा रोज धुऊन स्वच्छ केला जातो.
* दर आठवड्याला जनावरांची तपासणी
-जनावरांच्या निगेसाठी एक जोडपे ठेवले आहे.
-जनावरांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी पशुचिकित्सक
-पिण्याच्या पाण्यासाठी गोठ्यातच पाइपलाइनद्वारे व्यवस्था
गाई व म्हशींच्या देखभालीसाठी 50 x 35 फुटाचे लोखंडी अँगलचे शेड. वरती कापडी आच्छादन व खाली सिमेंटचा बेड. दोन्ही बाजूला सिमेंटच्या पक्‍क्‍या गव्हाणी. गोठ्यात ‘टेल टू टेल’ पद्धतीने जनावरे बांधली जातात. एका बाजूने गाई तर दुसऱ्या बाजूने म्हशी बांधतात. गाईंसाठी मुक्त संचार गोठा पद्धत सुरू केली आहे.
दुधाची काढणी यंत्राद्वारे होते. गोठा धुण्यासाठी पंधे यांनी स्वतःची पद्धत विकसित केली आहे. गव्हाणीला लागून जमिनीपासून दीड फूट उंच आडवे पीव्हीसी पाइप लावले आहेत. त्यांना विशिष्ट अंतरावर छिद्रे पाडली आहेत. पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरील मोटारीला हा पाइप जोडला असून गोठा स्वच्छ करण्याच्या वेळी विशिष्ट दाबाने पाइपमधून पाणी येते. त्यामुळे दोन जनावरांच्या मधल्या जागेतून शेण निघून मधल्या नालीतून गोठ्याबाहेर संकलित होते. अशाप्रकारे कमी श्रमात गोठा स्वच्छ केला जातो.
पशुचिकित्सक डॉ. सी. पी. भगवतकर व डॉ. काईट यांचे मार्गदर्शन मिळते. वडील दीपक पंधे व भाऊ गणेश यांचे मार्गदर्शन व मदत उमेश यांना होते.
दूध उत्पादन व विक्री गाईंचे 100 लिटर व म्हशींचे 50 लिटर मिळून दररोज सुमारे 150 लिटर दूध मिळते. गाईच्या दुधाला प्रति लिटर 25 रु. तर म्हशीच्या दुधाला 40 रु. दर मिळतो. 100 लिटर दूध खासगी डेअरीला, तर 50 लिटर दुधाची घरूनच किरकोळ विक्री होते. दररोजच्या दूध विक्रीतून 4500 रुपये मिळतात. दररोजचा खर्च 2500 रु. वजा जाता 2000 रु निव्वळ नफा उरतो.
उप-उत्पादन – जनावरांपासून मिळणारे अर्धे शेणखत शेताला उपयोगी पडते. दोन एकरात पंधे यांना यंदा वीस क्‍विंटल कापूस झाला. एक एकर सेंद्रिय पपईपासून 50 हजारांचे उत्पन्न मिळाले. उर्वरित शेणखताची विक्री होते. आतापर्यंत एक लाख रुपयांच्या शेणखताची विक्री केली आहे. शेणखताचा दर्जा चांगला असल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून त्याला मागणी आहे. रेडे आणि गोऱ्ह्यांची विक्री न करण्याचा पंधे यांचा संकल्प असून नजीकच्या माहूर येथील रेणुका देवस्थानाच्या गोरक्षण संस्थानास ते दान केले जातात. आतापर्यंत सात रेडे व दोन गोऱ्हे दान केले आहेत.
पंधे बंधूंकडून शिकण्यासारखे काही – * पाणी, जागा व चारा यांचे योग्य नियोजन करूनच दुग्ध व्यवसाय करावा
* दूरदृष्टी ठेवूनच चाऱ्याचे नियोजन आवश्‍यक.
* मजूर नसल्यास स्वतः काम करण्याची तयारी ठेवावी.
* घरपोच दुधाची विक्री व्यवस्था उभारल्यास नफा वाढतो.
* नव्या गाई विकत आणल्यावर बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणून प्रारंभी पुरेसे उत्पादन मिळत नाही.
* म्हशींच्या तुलनेत गाईंची जास्त काळजी घ्यावी लागते.
* स्थानिक बाजारात घरगुती ग्राहक म्हशीच्या दुधाला प्राधान्य देतात.
* घरगुती ग्राहक दुधाला जास्त भाव देतात.
* मुक्त गोठा पद्धती म्हशींपेक्षा गाईसाठी उपयुक्त.
* शेतीविषयक साहित्य, पुस्तके वाचण्याची आवड. त्यातूनच दुग्ध व्यवसायाविषयी माहिती मिळविली.


Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...