*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
_३४. आपल्याला आयुष्यात काय करायचंय, हे १०००% स्पष्ट हवे_
--------------------------------
*>> जबरदस्त कनफ्यूजन :*
मला बर्याच पालकांचे, नोकरदारांचे ईमेल आले; प्रत्येकजण जबरदस्त कनफ्यूज आहे. पालकांना समजेना नेमके मुलांना कोणते शिक्षण द्यावे. खूप खर्च करून शिकवले आणि नोकरी लागत नाही. अवघड शिक्षणाला टाकले आणि मुलगा नापास झाला तर? कोणत्या मुलाला किती शिकवावे? व्यवसाय काढून द्यावा तर कोणता? फेल झाला, तोटा झाला, तर पुढे काय? मुलाचं कनफ्यूजन, आता इंजिनिअर झालो, नोकरी लागत नाही, लागली तर पगार १५ हजार. शिक्षणावर १० लाख खर्च केले म्हणून घरचे लोक रोज ओरडतात. कित्येकांनी भले मोठे कर्ज काढून शिक्षण घेतले आहे, नोकरी नाही, तर फेडणार कसे?
*>> नोकरदारांचे कनफ्यूजन :*
बदली झाली, नोकरी लागल्यावर वाटलं होतं, आता आपण स्वर्गात गेलो, पण काही नाही पूर्ण नैराश्य. फक्त पोटाची खळगी व ईएमआय भागवण्यासाठी नोकरी करतोय, मनापासून अजिबात इच्छा नाही, नोकरी जाईल या भीतीपोटी वरिष्ठांच्या रोज शिव्या खातोय. पगार कितीही वाढला, तरी महागाई किती वाढते ते सांगू नका. मुलाचं शिक्षण, घराचं कर्ज, मुलींची लग्नं. सर्व विचार केला तर निवृत्त झाल्यावर स्वतःच्या आयुष्यासाठी १ पैसा तरी शिल्लक राहील का नाही हे कळत नाही, घोर नैराश्य.
*>> लक्षवेधी :*
एक विशेष व आश्चर्याची बाब म्हणजे, या लेखमालिकेदरम्यान ज्या लोकांनी मला संपर्क साधला, त्यात फक्त ४ ते ५ जणच यशस्वी उद्योजक आहेत. म्हणजे यशस्वी उद्योजक हा एकमेव असा सुखी व्यक्ती आहे, ज्याला १००% माहिती असते की आपल्याला आयुष्यात काय करायचंय. त्यःची आयुष्याची दिशा ठरलेली असते, गडगंज पैसा कमावलेला असतो, त्याच्या समोर आलेले प्रश्न तो चुटकीसरशी सोडवतो, तो कुणाला फार काही विचारत बसत नाही, त्यांची मुलंही कोणता प्रश्न विचारणार नाहीत, थोड फार शिक्षण झालं की, चला स्वत:च्या व्यवसायात. २४ तास व्यस्त, रोज पैसे कमवणे चालू, पैसा आल्यावर जीवनातले बरेच प्रश्न सुटतात, फक्त तो कसा वापरायचा हे माहीत पाहिजे.
*>> आयुष्यात काय करायचं :*
ज्यांच्या आयुष्यात आज कनफ्यूजन आहे, प्रॉब्लेम आहेत, नैराश्य आहे, बेकारी आहे, कर्जबाजारीपणा आहे, दुःख आहे, व्यसन आहे, दिशाहीन आहे, चिंतेने ग्रासला आहे, सतत आजारी आहे, गरीबी आहे, अज्ञान आहे, कलह आहे आणि जितके काही प्रश्न तुमच्या आयुष्यात आले आहेत, ते केवळ एकाच गोष्टीमुळे; ती गोष्ट म्हणजे तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे हे स्पष्ट नाही, कसं करायचं हे माहीत नाही. सर्व आयुष्यच दिशाहीन समुद्रात भरकटलेल्या होडीप्रमाणे झाले आहे.
*>> प्रथम निश्चिती :*
एखाद्या शांत ठिकाणी जा, काही तास, काही दिवस, काही आठवडे राहा. स्वत:लाच विचारा, तुला काय करायचं आहे आयुष्यात? तुझे ध्येय काय, तुझ्या मनाला काय पटतंय, तुला कोणती गोष्ट करण्यात आनंद मिळतो, तुला आयुष्यात काय मिळवायचं आहे, तुला ते कसे मिळवायचंय, ते मिळवण्याचे मार्ग कोणते, यापूर्वी मार्ग चुकला असेल तर तो का व कुणामुळे चुकला आहे, अगोदर झालेल्या चुकांवर काय इलाज आहे का? यापूर्वी कितीही मार्ग चुकलेला असो, त्यातूनही फिनिक्स पक्षप्रमाणे झेप घेऊन आयुष्यात अतिउच्च यश कसे संपादन करता येईल अशा अनेक गोष्टींचा विचार करा. तो एका वहीत लिहा. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्ती व सल्लागारास दाखवा व इथून पुढील आयुष्याची दिशा निश्चित करा.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते
Comments
Post a Comment