Skip to main content

#जीवनात खरा यशस्वी व आनंदी कोण ?...

जीवनात खरा यशस्वी व आनंदी कोण ?
--------------------------------
एका सत्य घटनेवर आधारित हा लेख, पालकांचे व मुलांचे डोळे उघडावेत म्हणून देत आहे.

१९७०चे साल असावे. महाराष्ट्रातील एका तालुक्याच्या ठिकाणी शाळेत एका बँक अधिकाऱ्याचा मुलगा अतुल व एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याचा मुलगा सहदेव दहावीत शिकत होते. अतुल बोर्डात आला. सर्वांना खूप आनंद, सत्कार वगैरे झाला. पुढे त्याला पुण्याला कॉलेजला प्रवेश मिळाला, तो सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला. सहदेव त्याचा खास मित्र, त्याला ५०% गुण मिळाले. त्याने जिल्ह्याच्या ठिकाणी जवळच डेअरी टेक्नॉलॉजीचा कोर्स केला. काही वर्षे एका नामवंत डेअरीत अनुभव घेवून स्वतःचा डेअरी व्यवसाय करण्यासाठी गावी परतला. अतुलला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी लागली, त्या कंपनीने त्याची  कामासाठी अमेरिकेला बदली केली. त्याच दरम्यान त्याच्यासोबत कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीवर त्याचे प्रेम बसले व त्याने प्रेमविवाह केला, अमेरिकेत असताना त्याला दोन मुलेही झाली. तो पाच वर्षातून एकदा भारतात येतो. आता तो एका कंपनीचा बडा अधिकारी आहे, त्याची बायकोही नोकरी करते. दोघांच्या 'बिझी' आयुष्यामुळे त्यांना एकमेकांशी बोलायला व भेटायला वेळच नसतो. अतुल कामानिमित्त जगभर प्रवास करतो, मुलांना वसतिगृहात शाळेला ठेवले आहे. कामाच्या ताणामुळे अतुलला सिगरेट व दारूचे व्यसन लागले. तणावामुळे व व्यसनामुळे त्याला एक हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. त्याचे वडील आता बँकेतून निवृत्त झाले आहेत. मुलगा, सुना, नातंवडे यांची भेट ४-५ वर्षातून एकदा होते. त्यांच्यासोबत राहणारे व त्यांना सांभाळणारे कोणी नाही. शेवटी पुण्याजवळील एका वृध्दाश्रमात आई वडिलांना ठेवले आहे. महिन्यातून अतुल एकदा आई वडिलांना फोन करतो. सून व नातवंडांशी फारसा संवाद काय, चांगली ओळख किंवा भेटही होत नाही. अतुलची मुलं पुर्णपणे अमेरिकन कल्चरची असून पब, पार्टी, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड इत्यादी प्रकारात व वातावरणात असतात. कुटुंब, आजोबा, आजी काय असते ते त्यांना माहीत नाही.

अतुल बोर्डात आलेला; कुटुंब, शिक्षक व समाजाच्या दृष्टीने तोच सर्वाधिक यशस्वी मुलगा, हा समज  आहे. आजही शाळेत चांगली टक्केवारी म्हणजे यशस्वी असा समज आहे, पण तो साफ खोटा आहे. जीवनाची शाळा ही पुस्तकी शाळेपेक्षा १०० पट मोठी व किचकट आहे. आज अतुलचे जीवन पैशाने भरलेले, पण दुःखाने ग्रासलेले आहे. कामाच्या ताणामुळे, सतत प्रवासात असल्याने कौटुंबिक सुख नाही. आईवडील वृध्दाश्रमात असल्याची खंत व दुःख त्याच्या मनात सलत आहे.

याउलट, ज्या सहदेवला ५०% गुण मिळाले, तो डेअरीचे सर्व ज्ञान व अनुभव आल्यावर गावी परत आला. वडिलोपार्जित ५ एकर शेती हाताखाली घेतली. शेतीतील पारंपारिक पध्दती हळूहळू बंद करून व्यावसायिक तत्वावर डेअरी फार्म सुरू केले. त्याच्या आई वडिलांनीही मोठ्या विश्वासाने सर्व कारभार सहदेवकडे दिला व रोजच्या कामात त्याला मार्गदर्शन व सहकार्य करू लागले. सुरूवातीला ५ म्हैसाना म्हशी गुजरातमधून आणल्या व दुधाचे उत्पादन सुरू केले. सुरुवातीला ते दूध जवळील डेअरीत  विकत असे. पुढे दर ६ महिन्याला ५ म्हशी वाढत गेल्या. हळूहळू व्यवसाय वाढवत गेला, अंदाज व अनुभव येत गेला व नुकसान कधीच झाले नाही. आज सहदेवकडे १०० म्हशी आहेत, रोज ८०० ते ९०० लीटर दूध निघते. सर्व खर्च वजा जात त्याला रोज ६ ते ७ हजार फायदा होतो. आता त्याने स्वतःची डेअरी व छोटे प्रोसेसिंग युनिट टाकले आहे. तो आपल्या फार्ममधील दूध व इतर शेतकऱ्यांचे दूध घेऊन प्रोसेसिंग करतो. रोज १० हजार लीटर दूध तो शहरात पाठवतो. सहदेवच्या उद्योगामुळे सुमारे १०० लोकांना रोजगार मिळाला. त्याने गावातील शेतातच टोलेजंग बंगला बांधला आहे. घरात आई, वडील, बायको व मुले असा परिवार आहे.आईवडील वारकरी संप्रदयाचे आहेत, त्यामुळे घरात धार्मिक व आध्यात्मिक वातावरण आहे. घरात मांसाहार व व्यसनाला स्थान नाही. दोन्ही मुले जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी शाळेत शिकत आहेत. सहदेवची स्वतःची गाडी आहे. आषाढी व कार्तिकी वारीला सहकुटुंब आजी, आजोबा, आई, वडील, नातवंडे पंढरपूरला गाडीने जातात. पूर्वी सहदेवचे वडील पंढरपूरला चालत किंवा सायकलने जायचे. आज स्कॉर्पिओ गाडीने सहदेव त्यांना घेऊन जातो. वृध्दापकाळात त्यांची खूप चांगली काळजी सहदेव व त्याची पत्नी घेत आहे. नातवंडांनाही आजी-आजोबासोबत वेळ घालवता येतो. दोघांनाही त्याचा आनंद व समाधान मिळते. मुलांना अनुभवाचे बोल ऐकायला मिळतात.

मित्रहो, मग सांगा खऱ्या जीवनात यशस्वी कोण? सहदेव की अतुल? समाजातील आजच्या समजुतीनुसार ज्याला शाळेत ९०% गुण मिळाले तो सर्वात यशस्वी, ज्याला मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळाली तो, ज्याला अमेरिकेत नोकरी मिळाली तो यशस्वी. समाजातील यशस्वीतेची समज व परिमाणे पूर्णपणे चुकीची आहेत. फारशी शाळा न शिकलेला शिक्षण संस्थापक, आमदार, खासदार, मंत्री तुम्हाला चालतो, त्यांचा तुम्ही सत्कार करता, मग ५०% गुण मिळालेल्या मुलांचा सत्कार का नाही करत? अतुल आणि सहदेव  ह्या दोघांच्यापैकी जीवनात यशस्वी कोण तुम्ही सांगा आणि मगच मुलांना शाळेत ९०% गुण मिळवण्याची अपेक्षा धरा व ५०% गुण मिळवणाऱ्या मुलांकडे आता वेगळ्या व यशस्वी नजरेने बघायला शिका.

आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.

- प्रा. प्रकाश भोसले

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...