*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
*_२५. व्यवसायात गद्दारीपासून सावधानता बाळगा_*
--------------------------------
इ. स. पूर्व ३०० वर्षापूर्वी ‘इसापनीती’ नावाने अनेक दंतकथा प्रसिध्द आहेत. एक लाकूडतोड्या होता. तो जंगलात नियमितपणे लाकूड तोडण्यास जात असे. एके दिवशी झाड तोडताना त्याला कोणीतरी वेदनेने रडल्याचा आवाज येऊ लागला. पाहतो तर काय, ते झाड खूप रडत होतं. असा प्रसंग आयुष्यात पहिल्यांदाच पाहिल्याने तो घाबरला. झाड म्हणाले, “लाकूडतोड्या, तू घाबरू नकोस.” त्याने विचारले, “झाडा, तू का रडतोयस?” झाड म्हणाले, “काही दिवसापूर्वी तू माझ्या झाडाची फांदी तोडून नेली होतीस. त्याच फांदीपासून ह्या कुर्हाडीला दांडा बनवला आहेस आणि त्यानेच आज मी तोडला जातोय, ह्याचेच मला अतिशय दु:ख होतंय. ज्या फांदीला मी माझ्या शरीराचा भाग म्हणून वाढविले, त्यानेच आज माझा जीव घेतला जातोय.”
अनेकदा व्यवसायात असेच होताना दिसते. आपण विश्वासाने कर्मचारी, मॅनेजर, पार्टनर किंवा कुटुंबातील सदस्यांना भागीदारी किंवा व्यवसायात मदत म्हणून आणि त्यांनाही नोकरी मिळेल म्हणून चांगल्या हेतूने ठेवतो, पण त्यांच्या गद्दारीला अनेकांना सामोरे जावे लागून खूप मोठा मनस्ताप व नुकसान सहन करावे लागले आहे. अनेकांचे व्यवसाय तर गद्दारीमुळेच संपतात. अनेक व्यावसायिकांची पैशासाठी फसवणूक, अकाली मृत्यू, खून असे प्रकारही घडताना बातम्या येत आहेत. पैशामुळे माणसाची मती गुंग होते, बुध्दी भ्रष्ट होते. त्यामुळे तुमचा व्यवसाय, तुमच्या ऐपती व समजुतीप्रमाणे तुम्ही नियंत्रित करू शकाल अशीच माणसे ठेवा. गद्दारीची थोडीतरी भनक लागली तर ताबडतोब निर्णय घेऊन वेळीच लोकांना बाजूला काढा. इतिहासात गादीसाठी मुलांनीच पित्याची हत्या केल्याची अनेक उदाहरणे आहेत. विषप्रयोग, फितुरी, चोरी, गद्दारी इत्यादीपासून सावध राहण्यासाठी व्यावसायिकांनी डोळ्यात तेल घालून लोकांची पारख केली पाहिजे.
जहाजाला एखादे लहान छिद्र सुध्दा बुडविते, तसेच एखादा गद्दार माणूस किंवा एखादा दगाफटका संपूर्ण व्यवसाय व आयुष्य संपवू शकतो. ज्याच्याकडे द्यायला काही नसते, ते धोका व दुःख जरूर देतात. आपला इतिहास तर गद्दारी व फितुरीने भरलेला आहे. राजकारणाचे तर विचारूच नका. एक मुलगा बापाला म्हणाला, “बाबा मला राजकारण शिकवा ना.” बाप त्याला म्हणतो, “हो शिकवतो ना. एक काम कर घरावर जा आणि तिकडून उडी मार. मी खाली उभा राहतो आणि तुला झेलतो.” मुलगा घरावर जातो आणि उडी मारतो, पण बाप त्याला पकडत नाही आणि मुलगा जोरात खाली पडतो..
मुलगा: "बाबा तुम्ही मला का पकडलं नाहीत. मला किती लागले आहे."
बाप: "बाळा राजकारणाचा पहिला नियम. स्वतःच्या बापावर पण विश्वास ठेवू नये."
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात त्यासंबंधीचे विवेचन करण्याचा व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया
Comments
Post a Comment