*भाजीपाला विक्री ते ५० कोटींचा मालक.... एक्सलंट गोडसे*
----------------------
अहमदनगर जिल्हा, साखर सम्राटांचा जिल्हा अशी त्याची ओळख. याच जिल्ह्यातलं अकोले गाव. या गावातला नितीन. एका गरिब कुटुंबातील मुलगा. वडील सहकारी खरेदी विक्री संघामध्ये ‘सेल्समन’ म्हणून नोकरीला. त्यांची महिन्याची मिळकत ४०० रुपये एवढी. या मिळकतीवर पाच जणांच्या कुटुंबाची गुजराण करणं नितीनच्या आईसाठी एक कसरतच होती. आपल्या घरची परिस्थिती नितीनला समजत होती. जीवन शिक्षण मंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असणाऱ्या नितीनला मात्र शिक्षणाची आवड होती. आपल्या शिक्षणाचा भार आपल्या बाबांवर नको म्हणून नितीन रोजंदारीची, मजूरीची तर कधी भाजी विकण्याची कामं करु लागला.
स्वत:चं देखील एक वेगळं विश्व असावं असं त्याला नेहमी वाटे. हे विश्व साकारण्यासाठी पदवी मिळविल्यानंतर त्याने ऑर्के इंडस्ट्रीजच्या उपकंपनीत सुपरवायझरची नोकरी स्विकारली. एका वर्षानंतर त्याने टेक्नोव्हा इमेजिंग सिस्टम मध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. पण जर मोठ्ठं व्हायचं असेल तर आपल्याला उच्च शिक्षण घ्यावं लागेल या विचाराने नितीनने एमबीए साठी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. १९९४-९६ मध्ये त्याला एमबीएची पदवी मिळाली. एमबीएच्या जोरावर त्याला विष्णू प्रिया ऍग्रो इंडस्ट्रीज मध्ये नोकरी मिळाली. ताजी भाजी बाजारपेठेत विकण्याचा व्यवसाय ही कंपनी करत असे. मुंबईमध्ये अजून मॉल संस्कृतीने जन्म घ्यायचा होता त्या काळात या कंपनीने ग्राहकांना स्वच्छ आणि ताजी ब्रॅण्डेड भाजी विकण्याची ‘आयडीया’ वापरली. शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे नितीनने स्वत:ला पूर्णपणे या नोकरीत झोकून दिले. कालांतराने आपण हा व्यवसाय का करु नये या विचाराने नितीनने ही नोकरी सोडली.
शुद्ध, स्वच्छ आणि ताज्या भाज्या विकण्याचा हा व्यवसाय सुरु करण्याचे नितीनने ठरविले. मात्र भांडवलाची मोठीच समस्या होती. सुदैवाने नितीनच्या एका परिचिताने त्याला ५ लाखांचं अर्थसहाय्य केलं. नितीनसाठी आता गगन ठेंगण होतं. पहाटे ३.३० वाजता बाजारातून भाजी आणणे. दुपारी ती व्यवस्थित निवडून, चिरुन ब्रॅण्डेड पिशवीत भरणे आदी कामे तो करत होता. सगळी अंगमेहनतीची कामे करुनसुद्धा नितीनला नफ्यामधला एक रुपया देखील मिळत नव्हता. ज्यांनी पैसे लावले तेच सगळा नफा लाटत होते. नाईलाजाने नितीनने तो धंदाच बंद केला. मित्राच्या मदतीने त्याला एका गॅस बनविणाऱ्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजरची नोकरी मिळाली. त्या तीन वर्षांत त्याचा आत्मविश्वास त्याला परत गवसला. संपूर्ण भारतभर फिरता आलं. मात्र मनातलं उद्योजक बनण्याचं स्वप्नं त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं.
शेवटी ३१ डिसेंबर, १९९९ रोजी नितीन गोडसे यांनी एक्सेल गॅस ऍण्ड इक्विपमेंट्स प्रा. लि ची स्थापना केली. एक्सेल गॅस ऍण्ड इक्विपमेंट्स प्रा. लि ही गॅस पाईप शुद्धीकरणाच्या पूर्ण प्लान्टच्या इन्स्टॉलेशनचं काम करते. एक रुपया हातात नसताना निव्वळ प्रचंड मेहनत करण्याची तयारी, दुर्दम्य आत्मविश्वास आणि अतूट विश्वास या भांडवलावर नितीन गोडसे यांनी कंपनी सुरु केली. आज कंपनीची उलाढाल जवळपास ५० कोटींच्या आसपास असून सुमारे १५० कामगार हे वेतन पटावर आहेत. गेल्या १३ वर्षांच्या कार्यकालात गॅस पाईपच्या क्षेत्रात सर्वोच्च ५ कंपनीच्या यादीत स्थान मिळविलेले आहे. फायझर, सिप्ला, रिलायन्स, गोदरेज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऍण्ड रिसर्च, कतार पेट्रोलियम आणि भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र हे सगळे एक्सेल गॅस ऍण्ड इक्विपमेंट्स प्रा. लिचे मान्यवर ग्राहक आहेत. निव्वळ भारतातच नव्हे तर अगदी थेट मध्य पूर्वेत देखील एक्सेल गॅस ऍण्ड इक्विपमेंट्स प्रा. लिने आपले पंख विस्तारले आहेत. लवकरच कंपनी आपली कार्यालये दुबई, आखाती देश आणि अफ्रिकेमध्ये सुरु करणार आहे.
गोष्ट इथेच संपत नाही...
सुरुवातीला नितीन गोडसेंच्या कंपनीला १३ किमी लांबीच्या गॅस पाईप इन्स्टॉलेशनचे आणि ५८ लाख रुपये मूल्य असलेल्या प्रकल्पाचे कंत्राट मिळाले. लवकरच त्यांना कळले कि हा संबंधित भाग किरणोत्सर्ग परिसर आहे. हा प्रकल्प टिपीकल सरकारी यंत्रणेसारखा असल्याने त्यांच्या पद्धतीने आराखडा तयार करणे, पाहणी करणे आदी सुरु होते. जो प्रकल्प २ महिन्यांत पूर्ण व्हायला पाहिजे होता, तो पूर्ण करण्यास ३ वर्ष लागले. गोडसेंना तो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १ कोटी रुपये खर्च आला. प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली त्यांनी तो प्रकल्प पूर्ण केला. जवळपास ८० लाख रुपयांचं कर्ज गोडसेंवर झाले होते जे फेडण्यास त्यांना २ वर्षे लागली. २ वर्षे देणेकरी त्यांचे उंबरठे झिजवत होते. गोंडसेंच्या आयुष्यातील हा अत्यंत वाईट काळ होता.
मात्र अत्युच्च सेवा दर्जा या एकमेव निकषांवर गोडसेंनी इथवर मजल मारली. आज कंपनीकडे २०१६-१७ पर्यंत ४-५ शहरांत २० गॅस प्लान्ट्स उभारावयाचे आहे. या प्रकल्पांची किंमत १०० कोटीच्या आसपास आहे. २०१७-१८ मध्ये गुजरात मध्ये सीमलेस ट्यूबजचा कारखाना सुरु करण्याचा गोडसेंचा मानस आहे. दरवर्षी कंपनी ३० टक्क्यांनी प्रगती करत आहे. २०२२ पर्यंत कंपनीची उलाढाल ५०० कोटींपर्यंत असेल असा आशावाद गोडसे व्यक्त करतात.
शून्यातून आज एवढी मोठी मजल गोडसेंनी मारली. मात्र समाजाप्रति असणारं भान ते जपून आहेत. समाजाप्रति असणारी ही बांधिलकी लक्षात ठेऊनच त्यांनी होतकरू आणि ज्यांना व्यवसाय करण्याची महत्वाकांक्षा आहे अशा ५ मराठी तरुणांना आपल्या पायावर उभं केलं आहे. आज हे ५ तरुण कोटींच्या घरात व्यवसायाची उलाढाल करीत आहेत. एका मुलाने तर थेट नितीन गोडसेंनाच आपला ‘बिझनेस पार्टनर’ म्हणून निवडले आहे.
नावात काय आहे असे शेक्सपियरने म्हटले होते. ‘गोडसे’ या नावाला सकारात्मक दृष्टीने समाजासमोर नितीन गोडसे यांनी आणले आहे. बिझनेस करायला खूप पैसा लागतो असं म्हणणाऱ्यांसाठी नितीन गोडसे हे आदर्श चपराकच आहेत. नितीन गोडसे खऱ्या अर्थाने ‘एक्सलंट गोडसे’ आहेत.
Comments
Post a Comment