*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
*_३३. ज्याला आयुष्यात ध्येय नाही, तो मनुष्यप्राणी नाही_*
--------------------------------
ह्या पृथ्वीतलावावर मुख्यतः तीन प्रकारचे जीव आहेत. एक वनस्पती, दोन जनावरे व तीन माणूस. माणूस इतर दोघांपेक्षा वेगळा आहे, कारण त्याला बुध्दी आहे व तो विचार करतो. जो माणूस फक्त बापजाद्यांनी कमावलेल्या दोन एकर जमिनीत जेवढे उत्पन्न येते तेवढेच घेतो व दोन वेळचं खातो, एखादी छोटीशी नोकरी करतो, महिन्याचा पगार त्याच महिन्यात खाण्यापिण्यासाठी संपवतो व शेवटी जेथे जन्मला तेथे मरून जातो, अशा व्यक्तीमध्ये व जनावरामध्ये काहीच फरक नसतो. गाय, म्हैस असे प्राणी आणि सर्व पक्षीही दोन वेळचे किंवा मिळेल ते अन्न खातात व निसर्गाने दिलेले आयुष्य तेवढे जगतात व मरून जातात. जो स्वत:करिता जगतो त्याच्या जगण्याला अर्थ नाही. तुम्ही किती वर्षे जगलात यापेक्षा, तुम्ही कसे जगलात याला महत्व आहे.
ज्याच्या आयुष्यात ध्येय आहे व जो प्रेरित आहे तोच खरा मनुष्यप्राणी आहे. त्याचे पूर्ण आयुष्य चैतन्य, उत्साह व नावीन्याने बहरलेले असते. अशी माणसं २४ तास, ३६५ दिवस व्यस्त असतात. जसे शिवाजी महाराजांना मुघलांकडे सरदारकी मिळाली असती व संघर्षाविना आपले वैयक्तिक आयुष्य जगता आले असते, परंतु त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापण्याचे ध्येय अंगी बाळगले होते. या ध्येय वादामुळेच ४०० वर्षानंतरही छत्रपती आपल्या मराठी माणसाच्या मनावर राज्य करून आहेत. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत यश संपादन करावयाचे असेल, तर ध्येय समोर ठेवून परिश्रम घेतल्यास नक्कीच यश मिळते. नाहीतर ज्या माणसाला ध्येय नाही, जो आयुष्यात काही कमवत नाही. जो केवळ पूर्वजांच्या कमाईवर आपला उदरनिर्वाह करतो, एखाद्या छोट्याशा नोकरीवर जीवन जगतो असा माणूस गेल्यानंतर कोणी त्याची आठवण तरी काढते का? तेव्हा माणसाने ध्येयवादी असले पाहिजे.
माणसाचे ध्येय जितके मोठे तितका माणूस मोठा होतो. त्याच्या हाताला यश आपोआप येते. पैसा त्याच्याकडे आपोआप येत राहतो. अनेकांचे सहकार्य त्याला आपोआप मिळत जाते. तुम्हाला जे काही व्हायचे आहे ते रोज तुमच्या डोक्यात आले पाहिजे. त्यासाठी तितके प्रयत्न करण्याची तयारी ठेवा. स्वतःकडून अवाजवी अपेक्षा ठेवू नका. अभ्यासपूर्वक नियोजन करा, यश तुमचेच असेल. मोठ्या ध्येयाने प्रेरीत झालेल्या व्यक्तीच्या मागे हजारो, लाखो लोक जातात व त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत व सहभाग देतात.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते
Comments
Post a Comment