*उद्योग आणि मराठी माणूस...* -------------------------------- *_१९. जे तराजू चालवतील, तेच संपत्ती कमवतील_* -------------------------------- इतिहास काय सांगतो, ‘जे तलवारी चालवतील ते तलवारीने मरतील, जे डोकं चालवतील ते जगावर राज्य करतील, तसेच जे तराजू चालवतील ते संपत्ती कमवतील.’ मित्रहो, आजही तेच दिसतंय. पुस्तकं वाचणारे बुद्धीवादी सरकारमध्ये आहेत, तराजूवाले त्यांना पैसे पुरवतात आणि तलवारीची भाषा करणारे अजून मोर्चे व आंदोलन करत आहेत. यात मराठी माणूस कुठे आहे याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तराजूवाले, आज देशातील उद्योग क्षेत्रात मुख्यतः यांचेच वर्चस्व दिसून येते, कारण हे लोक पिढ्यानपिढ्या उद्योग क्षेत्रात आहेत. स्वतःचा उद्योग कसा यशस्वी करायचा, याचाच विचार ते करतात आणि परिणामी ते यशस्वी होतात. त्यांची मुलेदेखील याच क्षेत्रात येताना दिसतात. हे पिढ्यानपिढ्या चालू राहणार. यात मराठी माणसे आहेत ती केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. आज बऱ्याच मराठी तरुणांची मानसिकता नोकरी मिळवणे ही असते. त्याच दृष्टीने ते शिक्षण घेतात, परंतु आजची परिस्थिती पाहता नोकरी मिळणे अवघड आहे. बरेचजण बेरोजगार आहेत. बऱ्याच जणांना राजकारणात रस असतो. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेतेमंडळी अस्मितेच्या नावाखाली तरुणांना भडकवण्याचे काम करतात. त्यात युवक भरडले जातात, त्यांना नेत्यांच्या मागे कार्यकर्ता म्हणून मिरवण्यात रस असतो, परंतु यांचे भविष्य काय? आज काल सोशल मीडियावर आपण शिवाजी महाराजांबद्दल पोस्ट टाकून आपण मराठी असल्याचे अभिमानाने सांगतो. स्वतःला त्यांचे वारस समजतो; परंतु शिवरायांनी नुसती तलवार नाही चालवली, तर बुध्दी चालवली. त्यांचे राजकीय डावपेच आणि गनिमीकाव्यापुढे त्यांचे सर्व शत्रू हतबल झाले होते हे विसरू नका. केवळ आपली बुध्दी व दूरदृष्टीच्या सहाय्याने त्यांनी इतिहास घडवला. आजही त्यांना मॅनेजमेंट गुरु म्हणून संबोधले जाते. हा इतिहासाचा भाग आता तरी मराठी तरुणांना समजेल का? अनेकांच्या व्हॉटसअप प्रोफाईलवर तलवारीचा फोटो असतो, तेव्हा असे वाटते की अजून यांच्या डोक्यात तलवारच आहे. त्यांच्या डोक्यात बुध्दी आणि पैसा यावा हीच शिवरायांचरणी प्रार्थना. आज तलवारीपेक्षा पैशाची धार जास्त आहे. ज्याच्याजवळ पैसा त्याचीच जास्त पॉवर. यामध्ये बहुतांशी उद्योजक आहेत. आज मराठी तरुणांनी देखील उद्योग क्षेत्रात उतरणे गरजेचे झाले आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर यश मिळवण्यासाठी केलात, तर तुमचेच भले होईल. आपल्याकडे एक म्हण आहे, “उद्योगीला महापूर, आळश्याला गंगा दूर.” आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात त्यासंबंधीचे विवेचन करण्याचा व माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा. - प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया
*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...
Comments
Post a Comment