*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
_४०. श्रीमंतांचे अंधानुकरण करू नका_
--------------------------------
विचार व विवेक गहाण टाकून डोळेझाकपणे गरिबांनी श्रीमंतीचे अनुकरण करण्याच्या पध्दतीमुळे गरीब अधिकच गरीब होत आहे. तर विवेकी विचारामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. पूर्वी लग्नात पंगती उठल्यावर एकजण वही पेन घेऊन बसायचा व लग्नाला आलेले लोक आपआपल्या ऐपतीप्रमाणे ५०, १००, २०० आहेर करायचे, त्यामुळे गरिबाला थोडाफार आर्थिक आधार व्हायचा, परंतु श्रीमंतांनी पत्रिकेत आहेर आणू नये, असे लिहायला सुरुवात केली व गरिबांनीही त्याचे अनुकरण करायला सुरुवात करून त्यांनीही आहेर पध्दत बंद केली, पण लग्नाच्या खर्चामुळे जमिनी विकायची वेळ आली.
महागडी पत्रिका/निमंत्रणपत्रिका बनवणे व आपल्या दूतास पाहुण्यांना आमंत्रण देण्यास पाठविणे ही राजे महाराजांची पध्दती होती, त्याचे गरिबांनी अनुकरण सुरू केले. १० हजाराच्या पत्रिका पै-पाहुण्यांना वाटायला, चार माणसं गाडीवर व पेट्रोलला १० हजार, पण हेच काम फुकटात आज व्हॉट्सअपवर होऊ शकते, पण याना अनुकरण करायची भारी हौस. पतसंस्थेच्या चार नोटीस आल्यात, ते बघायचं राहिलं बाजूला. लग्नात डीजे, १० हजाराचे फेटे ही गर्भश्रीमंत लोकांची मानपान करयची पध्दत होती, कारण त्यांच्याकडे तेवढे पैसे होते. गरीब माणूसपण त्याचे अनुकरण करतो, डीजे सांगतो, फेटे बांधतो, अरे घराला पत्रे नीट बसव अगोदर बेट्या. हजारो लोकांच्या जेवणावळी घालणे हे राजे महाराजे, श्रीमंतांचे काम. स्वतःच्या शेतात चार पोती धान्य पिकत नाही आणि लग्नात ५०० लोकांची जेवणावळ घालतो.
ऐपत नसताना श्रीमंतीचे मोठेपणाचे, बडेजावपणाचे अंधाधुंद अनुकरण करण्यामुळे गरीब माणसे अधिकच गरीब होत आहेत. लग्न साधे-छोटे करा; मोठं लग्न, बडेजाव करण्याची गरज नाही. पत्रिका छापण्यापेक्षा व्हॉट्सअपवर सुध्दा निरोप पोहचतो व ज्याचे तुमच्यावर प्रेम आहे, ते लग्नाला येतात. लग्न मोठं करण्याचा मुलीच्या सुखाशी काहीही संबध नाही. करोडपती व्यापाराच्या लग्नाला निवडक २०० माणसं असतात व ज्याच्या शेतात १० पोती पिकत नाही, त्याच्या लग्नात ५०० माणसाची पंगत उठते. सगळ्या गावाला आमंत्रण देण्याची गरज काय? आमंत्रण फक्त चांगला परिचय, मैत्री, प्रेम व व्यवहार असणार्यांनाच द्यायचे असते. गावाला पत्रिका वाटायला लग्न म्हणजे सार्वजनिक भंडारा नव्हे. वैयक्तिक जीवनाला सार्वजनिक रूप देणे वाईट सवय आहे. तुमचं लग्न लावणारा व पुजा करणारा, जिथे तुम्ही लग्नाचा बस्ता काढता, जिथे तुम्ही लग्नाचे दागिने विकत घेता त्यांच्या मुलांची लग्न कधी झाली तुम्हाला माहीत तर आहे का? मग तुम्हालाच संगळ्यांना आमंत्रण देत सुटण्याची हौस का? सामुदायिक विवाह, यादी पे शादी, मंदिरात विवाह, प्रेमविवाहास सहमती, कोर्ट मॅरेज असे कमी खर्चिक मार्ग स्वीकारावे. गरिबाने विवेकाने पैशाला पैसा जोडावा व श्रीमंतीकडे वाटचाल करावी. थेंबे थेंबे तळे साचे, कणा कणानेच डोंगर बनतो. प्रत्येक गरीब मराठी माणसाने श्रीमंत व्हावे हीच छत्रपतीं चरणी प्रार्थना.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते
Comments
Post a Comment