Skip to main content

# ऊर्जय इलेक्ट्रिकल्स प्रा. लि..

वीज बिलाचे पैसे वाचवून देणाऱ्या उद्योजकाची कथा

कन्नमवार नगर. मुंबईतील मराठी मध्यमवर्गीयांची वसाहत. याच वसाहतीतील एका इमारतीच्या गच्चीवर १२-१३ वर्षाचा जयवंत टिव्ही ऍंटेना साफ करत होता. पावसाच्या रिमझिम धारा बरसत होत्या. ज्यांच्या टीव्ही ऍंटेनाचं काम जयवंत करत होता ते काका आडोशाला उभे होते. जयवंत पावसाने चिंब भिजून गेल्यामुळे थरथरत होता. काकांनी जवळ येऊन पाहिलं तर जयवंतचं अंग तापलेलं होतं. अंगात ताप असूनसुद्धा जयवंत काम करत होता. त्याला एकच माहित होतं जर आपण काम केलं तर पैसे मिळतील आणि आपल्या घराला हातभार लागेल. त्या काकांनी जयवंतला कसंबसं घरी पाठवलं. तापाने फणफणलेला जयवंत त्यानंतर ४ दिवस अंथरुणाला खिळूनच होता.

आजारातून बरा झाल्यानंतर टीव्ही ऍंटेनाचं उरलेलं काम करण्यासाठी जयवंत परत त्या काकांच्या घरी गेला. एव्हाना काकांनी अन्य एका वायरमनकडून उरलेलं काम करुन घेतलं होतं. काकांनी त्याला विचारले “फक्त वायर कनेक्शनच्या ठिकाणी घासलं असतंस तरी चाललं असतं मग संपूर्ण ऍंटेना का घासत होता?”. अपेक्षेपेक्षा जास्त दिलं तर कस्टमर खूष होतो आणि खूष झालेला कस्टमर आपल्याला जास्त काम देतो. हे बाळकडू ज्ञात असलेला जयवंत त्यांना म्हणाला, “तुमचा ऍंटेना चकाचक करुन देणं हे माझं कामंच होतं, मग तो पूर्णच साफ करुन द्यायचा हे ठरवलं म्हणून मी संपूर्ण ऍंटेना साफ केला.” म्युनिसिपालटीच्या शाळेत ७ वी मध्ये शिकणाऱ्या जयवंतचे हे उदगार होते. ग्राहकांना समाधानी ठेवण्याच्या लहानपणी गवसलेल्या याच कौशल्यामुळे जयवंत गोसावी यांनी ऊर्जा क्षेत्रातील ऊर्जय इलेक्ट्रिकल्स प्रा. लि नावाची कंपनी स्थापन केली.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मारोतीराव कन्नमवार यांच्या सहकार्यामुळे मध्यमवर्गीय मराठी माणसांना इमारतींमध्ये स्वत:चं घर मिळालं त्यामुळे या वसाहतीला त्यांचंच नाव देण्यात आलं असं म्हटलं जातं. भारतातील एक सर्वांत मोठी वसाहत म्हणून सुद्धा कन्नमवार नगराचा उल्लेख होतो. याच वसाहतीत राहणाऱ्या काशिनाथ गोसावी आणि सत्यभामा गोसावी या दाम्पत्याच्या पोटी जयवंतचा जन्म झाला. जयवंतला १ भाऊ आणि २ बहिणी. गोसावी हे मूळचे मालवण मधील चिंदर गावचे. जयवंतचे शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेत ७ वी पर्यंत झाले. तर ८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण उत्कर्ष बालविद्यामंदीर येथे पूर्ण केले. जयवंतचे बाबा एका मिलमध्ये कामाला होते. त्यावेळी मिलकामगारांचा पगार तुटपुंजाच होता. या तुटपुंजा पगारात इतकं मोठं कुटुंब सांभाळणं जयवंतच्या आईला जिकिरीचं होतं. आई-बाबांची कुटुंबासाठी चालणारी ही ओढाताण लहानगा जयवंत पाहत होता.

आपल्या घराला आर्थिक हातभार लागावा यासाठी तो पेपर टाकत असे. दूध सुद्धा घरोघरी जाऊन पोहोचविण्याचं काम त्याने केलं होतं. एवढ्याने काही घरातलं भागणार नाही हे त्याला माहित होतं म्हणून एका वायरमन मित्राच्या हाताखाली तो काम करु लागला. तशी त्याला तांत्रिक ज्ञानाची आवड होतीच. छोट्या- मोठ्या दुरुस्तीची कामे तो करु लागला. त्यातून पैसे हाती येऊ लागले. मित्राच्या मदतीने त्याने सातवीत असताना पहिलं काम मिळवलं होतं ते म्हणजे ऍंटेना दुरुस्तीचं. त्याचवेळी जयवंत आजारी पडला होता. जयवंतला त्या काकांनी पैसे दिले. “पैसे नको मला, मी ते काम नाही केले.” असे जयवंत म्हणाला. तेव्हा काका म्हणाले, “अरे त्या वायरमनने फक्त ऍंटेनाला दिशा दिली. भर पावसात तु ऍंटेना पूर्ण घासलास. तुझ्या मेहनतीचे हे खरे पैसे आहेत.” जयवंतने कमावलेली ही पहिली स्वतंत्र कमाई.

याचदरम्यान कधीतरी जयवंतची आई फरशीवरुन घसरुन पडली. आईच्या पाठीला मुका मार लागला. स्लीप डिस्कचा त्रास होऊ लागला. आईला घरकामात मदत व्हावी म्हणून त्यावेळेस जयवंतच्या बाबांनी वॉशिंग मशिन विकत घेतली. ती विकत घ्यायला लहानग्या जयवंतने १००० रुपये दिले होते.

१० वी झाल्यानंतर जयवंतने आयटीआयमध्ये दिवसा इलेक्ट्रिशनच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तर रात्री विद्या विकास रात्र शाळा महाविद्यालयात शिकून त्याने १२ वी पूर्ण केली. आयटीआय पास झाल्यावर एका कंपनीमध्ये तो कामाला लागला. पगार होता फक्त ४० रुपये प्रति दिन. कधी कधी सलग ४८ तास काम करुन सुद्धा २००० रुपयांवर हा पगार गेला नाही. सन २००० साली जयवंतला बेस्ट मध्ये नोकरी मिळाली. तिकडे नोकरी करत असताना जयवंत नेहमी पहायचे की बेस्ट कार्यालयात सर्वांत जास्त लोक येतात ते वीजेचं बिल जास्त येतं या तक्रारी घेऊन. मग एखादा कर्मचारी मागील बिल आणि आताचं बिल यांची तुलना करुन बिलाची रक्कम कशी योग्य आहे हे पटवून देतो.

जयवंत यांच्या एक बाब लक्षात आली की आपण प्रत्येकजण नकळत ५ ते २० टक्के वीजबिलाचे पैसे जास्त देतो. लोकांना याविषयी तांत्रिक माहिती नसते. आणि ज्यांना ही माहिती असते ते भरमसाठी पैसे फि च्या स्वरुपात उकळतात. विशेषत: लघु, मध्यम स्वरुपाचे उद्योजक यांत जास्त भरडले जातात. त्यांना कुठेतरी यासंबंधी शिक्षित करुन योग्य दिशा मिळावी या उद्देशाने जयवंत गोसावी यांनी बेस्ट मधील नोकरीचा राजीनामा दिला. त्यांनी ऊर्जय इलेक्ट्रिकल्स प्रा. लि नावाने कंपनीची स्थापना केली. आज या कंपनीत बी.ई झालेले इंजिनिअर्स सुद्धा कार्यरत आहेत. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, शापूरजी पालनजी, अजमेरा ग्रुप, कॉक्स एण्ड किंग्ज अशा नामांकित कंपन्यांना त्यांनी सेवा दिली आहे. सध्या कंपनीची उलाढाल कोटींच्या आसपास आहे.

कोणत्याही उद्योगधंद्यामध्ये ‘कॉस्ट कटिंग’ हा प्रकार खूप महत्वाचा असतो. वीजबिलामध्ये कपात हा यातील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यामुळे जयवंत गोसावी खऱ्या अर्थाने सामाजिक उद्योजकतेचे कार्य करत आहेत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. किंबहुना वीज बिलाचे पैसे वाचवून देणारा माणूस म्हणूनच लोक त्यांना आता ओळखू लागले आहेत.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...