Skip to main content

#विक्रम वेताळ आणि शेअर बाजार....

विक्रम वेताळ आणि शेअर बाजार

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. त्याने मौन धारण केले व तो दलाल स्ट्रीटवर गेला, झाडावर लटकलेले प्रेत खांद्यावर घेतले व तो सोनापूरा कडे चालू लागला.

येवढ्यात प्रेतात बसलेला वेताळ जागा झाला आणि म्हणाला,
विक्रमा तुझ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे मला खरोखरच कौतुक वाटते असेच सातत्य आणि निष्ठा जर गुंतवणूकदार बाजारावर दाखवणार असतील तर त्यांना खूप चांगला परतावा मिळवून ते धनवान होण्यापासून त्यांना कोणीच रोखू शकत नाही, पण वर्तमानपत्र आणि टीव्हीवरील सतत येणाऱ्या बातम्यांमुळे गुंतवणूकदारांचे मनोधैर्य खचत नसेल का?

“Bloodbath on Dalal street” किंवा “गुंतवणूकदारांचे दोन लाख कोटी बुडाले”
वगैरे शीर्षके तू बघितलीस तर तुझेही मनोधैर्य खचेल असे तुला वाटत नाही का? “

या माझ्या सर्व प्रश्नांची तू मौन सोडून समर्पक उत्तरे दिली नाहीस तर तुझ्या पोर्टफोलिओची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायावर लोळु लागतील”
असे म्हणून वेताळ उत्तराची वाट पाहू लागला.

विक्रमाने थोडा विचार करून बोलायला सुरुवात केली, विक्रम म्हणाला,
“वेताळा, मुळातच शेअर बाजाराची किंवा म्युचुअल फंडाची गुंतवणूक ही दीर्घकालीन (long time) गुंतवणूक असते. अर्थात प्रत्येकाची लॉंग टर्म वेगळी वेगळी असू शकते. आणि इथेच खरी गल्लत होते.

शेअर मार्केट अथवा म्युचुअल फंड यातील लॉंग टर्म कमीत कमी सात वर्षे व अधिक अशीच असावी. पण जे गुंतवणूकदार 15 ते 25 वर्षे गुंतवणूक करून थांबतात वा गुंतवणूक करत राहतात त्यांचे नुकसान होत नाही.

याच्या अगदी उलट जे गुंतवणूकदार बाजार चढा असताना बाजारात येतात व उतरू लागल्यावर बाहेर पडतात ते स्वतःचे नुकसान करून घेतात.

वेताळा एक गोष्ट लक्षात ठेव, शेअर बाजारात नुकसान त्यांचेच होते ज्यांना भीती आणि लोभ ( Fear and Greed) यांनी ग्रासले आहे.

वेताळा शेअर बाजार आणि म्युचुअल फंडातून परतावा मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे “भीती” आणि “लोभावर” नियंत्रण मिळवणे आणि ऋषीमुनी प्रमाणे तपसाधना करावी लागते. एक तप म्हणजे बारा वर्षे समजलास.

विक्रम पुढे बोलू लागला “माध्यमातील बातम्यांबद्दल बोलायचे तर एवढेच म्हणता येईल कि , ती बालिश अशी बडबड आहे”

दोन लाख कोटी खरोखरच बुडाले असते तर देशभरात किती हाहाकार माजला असता.

अरे दंगली झाल्या असत्या. बँकांपुढे लोकांनी निदर्शने केली असती. नाही का?

खरेतर लोकांजवळ असलेल्या शेअर्सचे बाजारमूल्य दोन लाख कोटींनी कमी झाले, (बुडाले नव्हे) असा त्या विधानाचा अर्थ आहे.

एक छोटेसे उदाहरण देतो,
आपल्या भारतात 14 कोटी मध्यमवर्गीय कुटुंबे आहेत. या प्रत्येक कुटुंबाकडे सरासरी 25 तोळे सोने आहे.

ज्या एखाद्या दिवशी सोन्याचा भाव रुपये पाचशे प्रतितोळा कमी होतो त्या दिवशी प्रत्येक कुटुंबाच्या सोन्याचे मुल्य रुपये साडेबारा हजाराने कमी होते. भाव जर हजार रुपयांनी कमी झाले तर ही घट 25 हजार रुपयांची होते.

म्हणजेच 14 कोटी मध्यमवर्गीय कुटुंबांचे 3.5लाख कोटींचे नुकसान होते असे म्हणता येईल का?

वेताळा असे तेव्हाच म्हणता येईल जर त्यादिवशी 14 कोटी भारतीयांनी त्यांच्या जवळचे सोने विकून टाकले.

असे आजवर कधीही घडलेले नाही.

उलट ज्या दिवशी सोन्याचे भाव इतके पडतात त्यादिवशी लोक रांगा लावून सोने खरेदी करतात.

अगदी असाच न्याय शेअर बाजार वा म्युचुअल फंडाला का लावला जात नाही.

जेव्हा शेअर बाजार घसरतो तेव्हा शेअर्सच्या किंमती कमी झालेल्या असतात.

ही वेळ खरेतर नवीन खरेदीची असते पण माध्यमे वरीलप्रमाणे हेडलाईन्स टाकतात.

कारण त्यांना प्रत्येक बातमीमध्ये सनसनाटी हवी असते मग ती वाचकाचे नुकसान करणारी असेल तरी.

खरेतर अशा बातम्यांमुळे जे गुंतवणूकदार स्थितप्रज्ञ असतात ते अजिबात विचलित होत नाहीत.

परंतु जे कुंपणावर असतात त्यांचे नुकसान होते,व मग ते जन्मभर शेअर बाजाराच्या नावाने बोटे मोडायला लागतात.

वेताळा वरील हेडिंग देणारे पत्रकार हे “कुंपण” वालेच असतात.

अश्या बातम्यांपासून दूर राहणे व त्याकडे दुर्लक्ष करण्यातच गुंतवणूकदारांचे हित आहे.

वेताळा, तू सुरुवातीला माझ्याबद्दल व माझ्या सातत्या बद्दल जे कौतुक केलेस ना तसेच सातत्य शेयर बाजार वा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना असायला हवे.

"गुंतवणुकीतील सातत्य व स्थितप्रज्ञता अंगी बाणवल्यास व बाजारावर निष्ठा ठेवल्यास तू म्हणतो तसे चांगला परतावा मिळवून धनवान होण्यापासून माझ्या राज्यातील गुंतवणूकदाराला कोणीच अडवू शकत नाही".

येवढे बोलुन विक्रम थांबला.
तेव्हा प्रेतातील वेताळ म्हणाला "विक्रमा  तुझ्या शेअर मार्केटच्या ज्ञानाचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे.

तुझे प्रसारमाध्यमांबद्दल चे निरूपण ही मला खरे तर निरुत्तर करून गेले. पण मनात आणखी काही प्रश्नांची गर्दी होते आहे. पण ते पुढच्यावेळी आता मी जातो".
असे म्हणून वेताळ पुन्हा झाडावर जाऊन लटकला.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...