*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
_३६. दिल ना लगे तो कहो... बाय बाय..._
--------------------------------
आवड नसणाऱ्या क्षेत्रात करिअर केल्यामुळे किंवा व्यवसाय निवडल्यामुळे बहुसंख्य लोक एकतर त्यांच्या क्षमतेइतके यश मिळवू शकत नाहीत किंवा पैसा मिळत असेल, तरी मनातून अजिबात आनंदी नसतात. राहून राहून त्यांना आपल्या आयुष्याचा रस्ता चुकल्याचे जाणवत असते. शाळा, कॉलेजात ८५% हून जास्त गुण मिळवणारे इंजिनीअर होतात व मोठ्या कंपनीत ९ ते ५ ड्युटी करतात, असे अनेक लोक गुलाम बनून काम करीत आहेत. एकदा का संसाराचा गाडा मागे जुंपला की महिन्याचा खर्च भागवण्यासाठी मनाविरुध्द घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे आयुष्यभर नाईलाजास्तव काम सुरू असते, पण ही परंपरा मोडून जे आपल्या मनाचं, आवडीचं क्षेत्र निवडतात, ते जीवनात अती उच्च यश संपादन करतातच; पण संपूर्ण जीवन स्वतःच्या अटीवर व आनंदाने जगतात. इतरांना त्यांचा हेवा वाटतो.
आज जगात सर्वात जास्त यशस्वी, तरुण व मोठे उद्योजक अमेरिकेतून विशेषतः सिलिकॉन व्हॅलीतून घडत आहेत. याचे कारण म्हणजे उच्च शिक्षण झाल्यानंतर कोणतीही नोकरी न करता स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात किंवा आपल्या डोक्यात असणाऱ्या बिझनेस आयडियावर काम करणे व ती यशस्वी करून पुढे मोठ्या उद्योगात रूपांतर करण्यासाठी पोषक वातावरण तिथे आहे. गुगलचे संस्थापक अमेरिकेतील एका मोठ्या विद्यापीठातील विद्यार्थी; त्यांनी जर नोकरी पत्करली असती, तर गुगल कंपनी उभी राहिली नसती, आज ते वर्षाला ११० बिलीयन डॉलरचा व्यवसाय करतात. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गचे वडील डेंटिस्ट होते. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर ही परंपरा त्याने तोडली, १२ वी पास झाल्यानंतर वयाच्या १९व्या वर्षी त्याने छोटेखाणी फेसबुक सुरू केले. आज त्यांची संपत्ती ७० बिलीयन डॉलरची आहे. बिल गेट्स १२ वीत गणितात हुशार होते व त्यांना प्रोग्रॅमिंगची आवड होती, त्यांनी त्याच क्षेत्रात काम सुरू केले. उद्योग सुरू करण्यासाठी कॉलेज मध्येच सोडून दिले, आज ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. वॉल्ट डिस्ने हा शाळेत असताना चित्रे काढून ती विकायचा व त्यातच त्याने व्यवसाय सुरू केला. आज डिस्ने हा अब्जावधीचा उद्योग आहे. पूर्वी ९५% हून अधिक गुण मिळालेले आयआयटी, आयआयएम मध्ये जायचे व विदेशात बलाढ्य पगाराच्या नोकऱ्या मिळवायचे, पण हल्ली ट्रेंड बदलला आहे. येथून बाहेर पडणारी मुलं स्वतःचा उद्योग उभारण्यावर भर देत आहेत.
मूलभूत मानसशास्त्र असे सांगते की; माणसाने आपल्या आवडत्या क्षेत्रात काम केले, तर त्याची यशाची शक्यता दुपटीने वाढते व कुणाच्याही हाताखाली काम न करता स्वतंत्र केल्यास तीच शक्यता चौपटीने वाढते. स्वतंत्र व्यवसाय व नोकरी यातील मिळणाऱ्या पैशाचा विचार केल्यास नोकरीपेक्षा व्यवसायात सरासरी १० पट अधिक पैसे मिळतात. तेव्हा खरच एखाद्या क्षेत्रात आवड नसेल, तर त्या क्षेत्रात, कंपनीत, कामात वेळ घालवून स्वतःचे व इतरांचे नुकसान करू नका. त्यापेक्षा आवडीचे क्षेत्र निवडा, स्वतःचा उद्योग सुरू करा, स्वतःचं स्वतःचे बॉस बना. जीवनातील अतीउच्च आनंद मिळवा व सोबत रग्गड पैसाही मिळवा. नाहीतर तुमचे जीवन म्हणजे घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणेच राहील. म्हणून म्हणतो ‘दिल ना लगे तो कहो बाय बाय’ मग बघा कसे होईल तुमचे जीवन खऱ्या अर्थाने ‘डिअर जिंदगी’ प्रमाणे होईल. जगातील सर्वच्या सर्व यशस्वी उद्योगाच्या यशाचे हेच गमक आहे.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. त्या अनुषंगाने पुढील लेखात माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते
Comments
Post a Comment