नोकरी सोडून आधुनिक शेतीची कास धरली, मिळवले मिरचीचे यशस्वी उत्पन्न
आजकाल शेतीमध्ये काही फायदा नाही म्हणून नोकरीकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु शेतीत अजूनही फायदा आहे आणि याला एखाद्या व्यवसायाप्रमाणे सांभाळले, काटेकोरपणे नियोजन केले तर यशस्वी शेती करता येते. याच गोष्टीची जाणीव होऊन कराड तालुक्यातील शेरे गावच्या तरुण शेतकऱ्याने बँकेची नोकरी सोडून आणि घरची शेती करण्याचा निर्णय घेतला.
कृषी मध्येच.बी.एस्सी (बी.एस्सी एग्री) शिक्षण २००८ साली पुर्ण करणा-या वैभव विश्वनाथ पाटील यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका खाजगी बॅंकेमध्ये एग्री मॅनेजर म्हणुन केली. आपल्या शिक्षणाचा आणि कौशल्याचा वापर स्वत:ची शेती सुधारण्यासाठी व्हावा असे त्यांना सतत वाटत असे. त्यामुळे काहीवर्षांनी पुर्णवेळ शेतीकडे लक्ष देण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी क्षेत्रात प्रतिष्ठित समजल्या जाणा-या बॅंकेच्या नोकरीचा त्याने राजीनामा दिला.
अशी केली प्रगत शेतीची सुरुवात
हवामान, जमीन व बाजारपेठेचा अभ्यास करून दोन एकरवर मिरची लावण्याचा प्रयोग करण्याचे वैभव यांनी ठरवले. ऊस हेच प्रमुख पिक असणा-या कराड तालुक्यामध्ये पाण्याच्या उपलब्धतेचा व बाजारपेठेतील मागणीचा विचार करुन ऊसाखालील क्षेत्र मिरची लागवडीखाली आणण्याचा निर्णय घेणे वैभवसाठी जोखीमीचे होते. पारंपारिक शेतीपद्धतीऐवजी सुधारित तंत्राने शेती करण्याचे त्यांनी ठरविले.
मिरची लागवडीसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. तसेच वैभवने लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा ही वापर केला. लागवडीसाठी लांब, गडद हिरव्या रंगाच्या सिता या वाणाची निवड केली. मुख्य म्हणजे संपूर्ण गावामध्ये मिरचीचा प्रयोग करणारा हा एकमेव शेतकरी आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायही त्यांनी सुरुवात केली. सद्यस्थितीत वैभवकडे ८ म्हशींचा गोठा आहे. त्यांच्यापासुन दैनंदिन २५-३० लिटरचे उत्पादन मिळते आहे. ह्याच गोठ्यातुन मिळणा-या शेणखतापासुन गांडुळखताचे युनिटची बांधणी केली आहे. या युनिटपासून साधारणपणे ३-४ टन गांडुळखताची निर्मीती होत असून व्हर्मीवॉश मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मिरचीचे खत व किड व्यवस्थापनासाठी त्याने एकात्मिक पद्धतीचा वापर केला. रासायनिक खताबरोबरच जिवामृत, गांडुळखताचाही वापर शेतात केला जातो. किड व्यवस्थापनासाठी जैविक किडनाशकांबरोबरच प्रकाश सापळे व रंगित स्टिकर्सचाही वापर ते करत आहेत. सद्यस्थितीत त्यांच्या शेतात २५ कारागिर नियमित कार्यरत आहेत.
खर्च व उत्पन्न
मिरचीच्या पिकाला इतर भाजीपाल्याच्या तुलनेत नियमीत भाव मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. वाशी मार्केटमध्ये नियमित विक्री होत असुन आता पर्यंत २६ टन मालाची विक्री त्यांनी केली आहे. येत्या काळात अजुन १५ टन मिरचीचे उत्पादन अपेक्षित आहे.
एकुण खर्च - २,५०,००० रु.
उत्पन्न - ६,००,००० रु.
खर्च वजा जात - प्रती वर्षी रु.४,५०,०००/-निव्वळ नफा मिळणार आहे.
वैभव यांचा आदर्श ठेऊन याच गावातील ७ – ८ तरुणांनीही पुर्णवेळ आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. समाजसेवेची वैभव यांना आवड असून व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र संस्थेचा ते सक्रिय कार्यकर्ते आहेत.
Comments
Post a Comment