Skip to main content

#लिंबू लागवड...

लिंबू लागवड

लिंबू लागवडीसाठी वापरावयाची जमीन : याला मुरमाड, मध्यम चुनखडीची जमीन चालते. ज्या जमिनीत बरबडा नावाचे गवत येते ज्याचा वापर अत्यंत गरीब लोक, धरणावर काम करणारे मजूर कर्नाटक, आंध्रप्रदेश अशा दक्षिण भारतातील लोक पालेभाजी म्हणून करतात ते राणी कलरचे फुल असणारे गवत (तण) येते ती वरकस जमिनही लिंबास चालते.

खड्डा व अंतर : लिंबू लागवडीसाठी १५' x १५' वर २' x २' x २' चा खड्डा घेऊन तेथे काडीकचरा, शेतातील पालापाचोळा, १० ग्रॅम प्रोटेक्टंट, पाव किलो कल्पतरू खत द्यावे आणि खड्डा भरून घ्यावा. खडकाळ जमीन आहे तेथे वरीलप्रमाणे खड्डा भरल्यावर धरणातील गाळाची माती टाकून खड्डे भरून घ्यावेत. नंतर ९" ते १' उंचीची मल्हार लिंबाची रोपे पिशवी फाडून मधोमध लावून टाचेने ४ ही बाजूने माती दाबून घ्यावी. नंतर १ लि. जर्मिनेटर, ५०० मिली प्रिझम आणि प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + १०० लि. पाणी असे द्रावण तयार करून १०० ते २५० मिली द्रावण रोपाच्या सभोवार आळवणी करावे. म्हणजे रोपे जगतात. पांढरीमुळी वाढून रोपे वाढीस लागतील.

लागवड जून - जुलैला करावी, तथापि लागवड वर्षभरही करता येते. हिवाळ्यातील लागवडीस वाढ कमी होते, तर उन्हाळ्यातील लागवडीस पाणी अधिक लागते. २ ते ३ महिन्याला कल्पतरू खताचा वापर करावा व सप्तामृत, हार्मोनी खालील वेळापत्रकाप्रमाणे वापरावे.

झाडांच्या जोमदार वाढीसाठी पहिले ३ - ४ वर्ष दरवर्षी खालीलप्रमाणे फवारणी करावी.

१) पहिली फवारणी : ( जून - जुलैमध्ये ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम १०० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : ( सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये ) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ हार्मोनी १५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( डिसेंबर - जानेवारीमध्ये ) : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

जेथे दुय्यम अन्नद्रव्ये कमी असतील तेथे डाय अमोनियम फॉस्फेट, म्युरिट ऑफ पोटॅश अथवा सिंगल सुपर फॉस्फेट हे १५ -१५ दिवसांनी किंवा १ महिन्याने जून ते ऑक्टोबर या कालावधीत ३ वेळा द्यावे. पाणी कमी असल्यास ठिबकचा वापर करावा, म्हणजे पाण्याची बचत होऊन झाडाची वाढ चांगली होते.

रासायनिक खताला पर्याय म्हणून गांडूळ कंपोस्ट हिरवळीच्या खतांचा वापर करावा. चुनखडी, खारवट जमिनीत ताग किंवा धैंच्याचे पीक घेऊन ते फुलोर्यात येतानाचा गाडावे. गाडल्यानंतर २ ते ३ वेळा ४ -४ दिवसाला पाणी द्यावे, म्हणजे महिन्याभरात ते लवकर कुजून जाते. खत दिल्यानंतर आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ -३ फवारण्य घेतल्यानंतर झाडाच्या वाढीबरोबरच त्याला जमिनीलगत घुमारे फुटतात ते सिकेटरने छाटावेत. झाडाला छात्रीसारखा आकार द्यावा, खोड मोठे होईपर्यंत २ ते ३ फुट उंच खोड मोकळे राहील असे पहावे.

आंतरपीक : सुरुवातीची २ वर्षे यामध्ये विविध भाजीपाला भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, वेलवर्गीयमध्ये काकडी, टरबुज, खरबूज,डांगर भोपळा तसेच कडधान्यामध्ये उडीद, मूग करावे. तूर करू नये. करायची झाल्यास २ ओळी लिंबाच्या मधोमध कराव्यात. पहिले २ वर्षे शेवग्यासारखे आंतरपीक घेऊन यापासून दीड ते दोन लाख रू. मिळून ते या लिंबासाठी वापरता येईल. हा प्रयोग एवढा प्रचलित नाही, तेव्हा याची निरीक्षणे टिपावीत. शक्यतो कीड व रोगाला बळी पडणारी आंतरपिके करू नयेत.

आले, हळद, मका, बटाटा, रताळी हि अन्नद्रव्ये जास्त घेणारी पिके करू नयेत. उन्हाळी पालेभाज्या कराव्यात.

छाटणी : छाटणी करताना झाडाच्या घेराच्या खालील भागात आर्द्रता आणि उष्णता निर्माण झाल्यास्ने खालील भागातील फांद्यांना बहार जास्त लागत असतो त्याकरीता खालील फांद्या जादा न छाटता बाहेरून थोड्याथोड्याच छाटाव्यात.

बहार धरणे : लिंबू लागवडीनंतर ४ ते ५ वर्षांनी फळे लागतात. साधारणपणे मृग (जून), हस्त (ऑक्टोबर ) व आंबे (फेब्रुवारी) बहार धरतात. परंतु हस्त बहार धरल्यास मार्च ते जूनमध्ये फळे (लिंबू) मार्केटमध्ये येऊन बाजारभाव अधिक सापडतात.त्यासाठी उन्हाळ्यात पाण्याची उत्तम सोय असावी लागते.

हस्तबहार धरण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी यशस्वी : हस्त बहार घेतेळेस सप्टेंबरमध्ये अती पावसामुळे फळे लागत नाहीत. लागलेली फळे सापडतात. एप्रिल - मे मध्ये फळे लागतात, परंतु गुंडीगळ होते. ती थांबविण्यासाठी किंवा होऊ नये म्हणून अगोदरच सप्तामृत औषधांची फवारणी (५०० मिली + १०० लि. पाणी ) करावी. हस्त नक्षत्राच्या अगोदर सप्तामृताची फवारणी घेतल्याने फुल लागेल. तसेच त्याने हस्ताचा अती पाऊस झाल्यावरही फुल सडणार नाही. कल्पतरू चार वर्षाच्यावरील झाडास १ ते २ किलो दोन वेळा विभागून एकदा जून - जुलै व नंतर सप्टेंबरमध्ये द्यावे.

फुल येण्यासाठी ३ ते ४ महिन्यांची जून काडी असावी लागते. या पिकला बारमाही ओलीत असल्यामुळे फेब्रुवारी, जुलै व ऑक्टोबर या महिन्यांत अनुक्रमे ४८, ३५ व १७% बहार येतो. जानेवारी व जुलै फुलोर्याची फळे अनुक्रमे जुलै व डिसेंबरमध्ये पावसाळी व हिवाळी हवामानात तयार होत असल्याने यावेळी फळांना भाव कमी मिळतो. ऑक्टोबर फुलोऱ्याची फळे उन्हाळ्यात तयार होतात. त्यावेळेस फळांचे प्रमाण कमी असते, भाव अधिक मिळतात. त्यामुळे डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरल्याने उत्पादनानात वाढ होऊन दर्जाही सुधारतो.

हस्त बहार व्यवस्थापनासाठी ऑगस्ट - सप्टेंबर या महिन्यात पावसामुळे ताण देणे शक्य होत नसल्याने याकाळात सायकोसील किंवा लिहोसिन (सी.सी.सी. ) हे संजीवक १००० पी. पी.एम. तीव्रतेचे फवारावे आणि नंतर बहाराची फूट निघण्यासाठी प्रिझम ५०० मिली + जर्मिनेटर ५०० मिलीची १०० लि. पाण्यातून फवारणी करवी. बहार फुटल्यानंतर पुढे दिल्याप्रमाणे फवारण्या नियमित वेळेवर घ्याव्यात, म्हणजे हस्तबहाराचा माल उन्हाळ्यात चालू होऊन अधिक उत्पादन व अधिक भाव मिळविता येतो.

१) पहिली फवारणी : ( बहार फुटीसाठी ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : ( गुंडी हरभर्याएवढी झाल्यावर ) : थ्राईवर ५०० ते ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० ते ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( फळे सुपारीच्या आकाराची झाल्यावर ) : थ्राईवर ७५० मिली ते १ लि. + क्रॉंपशाईनर ५०० मिली ते १ लि. + राईपनर ७५० मिली + प्रोटेक्टंट ५०० ते ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली + हार्मोनी ३५० ते ४०० मिली. + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी (फळे बारीक कैरीएवढी झाल्यावर ) : थ्राईवर १ ते १ । लि. + क्रॉंपशाईनर १।।लि. + राईपनर १ लि. + प्रोटेक्टंट दिड किलो + न्युट्राटोन १।। लि. + हार्मोनी ५०० मिली. + २५० लि.पाणी.

प्रिझममुळे थंडीतही शेंडा व्यवस्थित चालतो, फूट निघतो, फुटवा वाढतो तर न्युट्राटोन वापरल्याने लिंबू आकराने मोठे, पिवळे धमक, रसाळ तयार होते.

किडी :पाने पोखरणारी अळी : कोवळ्या पानात शिरून आतील मगज खाते, पानांवर वेडेवाकडे पट्टे दिसतात. पाने चुरगळल्यासारखी होऊन झाडाची वाढ खुंटते.

२) पांढरी माशी : पानातील रस शोषून घेतल्याने पाने निस्तेज होऊन वाळतात, काळी बुरशी पडते.

३) कोळी कीड : पाने व फळांवर फिक्कट, पिवळे खड्डे दिसून, फळे विद्रुप दिसतात.

४) याशिवाय मावा, पिठ्या ढेकूण इ. किडींचाही प्रादुर्भाव लिंबावर होतो.

वरील सर्व किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी वेळोवेळी सप्तामृतातील प्रोटेक्टंटची फवारणी 'कृषी विज्ञान' केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावी.

रोग :

१) कँकर / खैर्या : हा रोग झान्थोमोनास या अणूजीवतंतूमुळे होतो. हा रोग फार संसर्गजन्य असून पावसाळी हवामान व अधिक आर्द्रता असल्यास झपाट्याने पसरतो. सुरुवातीला पानांना टाचणीच्या टोकाएवढे लहान, गोल, गर्द हिरवे व पाणीयुक्त ठिपके पृष्ठभागावर दिसतात. हे ठिपके तांबूस रंगाचे खरबरीत होऊन पानांच्या दोन्ही बाजूस दिसतात. ठिपक्यांभोवती पिवळ्या रंगाचे वलय तयार होऊन कालांतराने ते नाहीसे होते. पुढे हे ठिपके फांद्यावर वाढतात आणि झाड देवीचे व्रण ग्रासल्यासारखे दिसते. परिणामी शेंड्याकडील फांद्या मरतात. तसेच झाडे खुरटल्यासारखी दिसतात. फळांवर टिपक्यांची वाढ झाल्यास फळे तडकतात व अशा फळांना बाजारात मागणी नसते. रोपवाटिकेतील रोपांना या रोगाचा संसर्ग झाल्यास रोपांमध्ये पाने पोखरणार्या अळीने पोखरलेल्या मार्गाद्वारे हा रोग वेगाने पसरतो.

२) टिस्टेझा : या रोगाची लागवड झाल्यावर झाडाची नवीन फूट पुर्णपणे किंवा अपुर्ण अवस्थेत दाबून राहते. झाडावरील पाने निस्तेज आणि शिरा पिवळसर किंवा पांढरट होतात. पाने लांब दिशेने परंतु आतील बाजूने कुरळे होतात. नवीन पालवीचे पोषण नीट न झाल्यामुळे पानगळ होते. हा रोग ओळखण्यासाठी पाने सुर्यप्रकाशात बधितल्याने त्यामधील शिरा पोकळ झाल्यासारख्या दिसतात. झाडाच्या खोडाच्या किंवा मोठ्या फांदीच्या सालीखालील भागावर सुईने टोकरल्यासारखी खोल व्रण (स्टेम पिटर्स) दिसतात.

३) मुळकुज व डिंक्या : हा रोग फायटोप्थोरा या बुरशीमुळे होतो. सुरुवातीस मुळकुजीची लागण होऊन तंतुमय मुळे कुजतात. कालांतराने ही कूज मोठ्या मुळांपर्यंत जाऊन खोडावर पायकूज होते. खोडाच्या सालीवर ओलसर ठिपके दिसतात व त्या ठिकाणी उभ्या चिर पडून त्यामधून पातळ डिंक बाहेर पडतो. असा भाग तांबट तपकिरी दिसतो व या भागावरील पेशी मरून ठसूळ होतात. अशा झाडातील पाने निस्तेज होऊन शेंड्याकडील पाने पिवळी पडतात व पानगळ होते. झाडामध्ये अन्नद्रव्याचे अभिसरण मंदावल्यामुळे अकाली बहर येऊन फळे अपक्क स्थितीत गळून पडतात.

४) शेंडेमर : जुन्या व दुर्लक्षीत बागेत बुरशीच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या फांद्या वरून खाली वाळत येतात. या रोगाचा प्रसार दुय्यम माध्यमातून होतो. जसे तंतुमय मुळाजवळ अतितीव्र क्षारांचे अधिक प्रमाण. अन्नद्रव्यांची कमतरता, इतर किडी व बुरशीमुळे फांद्यांना व मुळांना झालेली इजा, जमिनीत जास्त काळ पाणी साचणे इ. कारणाने कोलेटोटायकम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे नवीन व पक्क फांद्या वरूनखाली वाळण्यास सुरुवात होते. नंतर ही मर बुंध्यापर्यंत जाते आणि त्यामुळे डायबॅकची लक्षणे दिसतात.

नियंत्रण : बागेत वारंवार हलकी चाळणी करावी, त्यामुळे अन्नद्रव्याचे चांगले शोषण होऊन झाड जोमदार वाढते. पावसाळयापुर्वी आणि नंतर रोगग्रस्त फांद्या छाटून त्याठिकाणी बोर्डोपेस्ट लावावी.

जर्मीनेटर ३० मिली + कार्बेन्डॅझीम १० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३० ग्रॅम १०.लि पाण्यात मिसळून २ -३ वेळा फवारावे.

लिंबातील प्रमुख समस्या, विकृती :

पाने पिवळी पडणे लाईम इंड्यूस्ड आयर्न क्लोरॅसिस (LIIC) : लिंबाच्या झाडाच्या दक्षिणेकडील भाग हा कायम रोगट दिसतो. पाने पिवळी पडतात. LIIC चा प्रादुर्भाव होतो. पानांवर गुंडाळी येते. फुले व फळे कमी लागतात.

पानगळ : ह्यामध्ये पाने बशी व कपासारखी, विळ्याच्या आकारासारखी कातरलेली दिसतात.पानांवर डाग,फोड दिसतात.ताम्र (Cu) चे प्रमाण कमी झाले तर पानगळ झपाट्याने होते.(ज्यावेळेस सेंद्रिय पदार्थ, प्रेसमडचे प्रमाण अधिक होते. त्यावेळेस C:N Ratio वाढतो व झपाट्याने पानगळ होते. )

वरील सर्व प्रकारच्या किडी, रोग व विकृतीपासून सरंक्षण व दर्जेदार फळे मिळविण्यासाठी सुरूवातीपासून सप्तामृत आणि कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करावा. कँकर (फळावरील डाग), डागबॅक (शेंडे सुकणे), गमॉसिस ( Gummosis) च्या नियंत्रणासाठी १० ते १२ लि. पाण्यामध्ये प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + मोरचूद ५०० ग्रॅम + चुना २५० ग्रॅम + गेरू (काव) २५० ग्रॅमची पेस्ट करून कुंच्याने खोडस ३ ते ४ फुटापर्यंत १५ दिवस ते १ महिन्याच्या अंतराने लावावी.

काढणी व उत्पादन : साधारण लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून फळे सुरू होतात. एका झाडापासून ५० ते १०० ग्रॅम वजनाची ४०० ते ५०० फळे मिळतात. ५ ते ७ वर्षाच्या एका झादापासोन २ ते ३ हजार फळे मिळून एकरी कमीत कमी खर्च जाऊन ४० ते ६० हजार रुपये मिळतात. ४०० लिंबाच्या पिशवीस ५०० ते १५०० रुपयांपर्यंत भाव मिळतो.

Comments

Fact#Dhingaana

यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....*

*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...

#सरकी तेल व पेंड निर्मिती..

*सरकी तेल व पेंड निर्मिती  सरकी तेल व पेंड निर्मिती उद्योग हा तसा वर्षभर मागणी असणारा उद्योग ,ग्रामीण भागात जनावरांना पोषक खाद्य म्हणून तेलयुक्त पेंडी दिल्या जातात त्य...

#दुग्ध व्यवसाय:-

दुग्ध व्यवसाय:- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचं व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाल म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात. संगोपन ओलीताखालच १ हेक्टर कमीत कमी क्षेत्र असावं लागतं किमान ५-१० दुभत्या गाई-म्हशी अ...