*चंपकलाल व राजाराम पाटील : एक बोधकथा*
---------------------------------------
*>> पार्श्वभूमी :*
गेल्याच आठवड्यात, पनवेलपासून ३० ते ३५ किमी अंतरावर सुमारे १५० एकर जागेवर एका मोठ्या बंगलो प्रोजेक्टवर मार्केटिंग सल्लागार म्हणून माझी नियुक्ती झाली. बिल्डरने मला साईटवर भेटायला बोलावले. कोणत्याही प्रोजेक्टचा मार्केटिंग सल्ला देण्याच्या अगोदर मी खूप सखोल अभ्यास करतो. प्रोजेक्टचे लोकेशन, आजूबाजूचे लोक, त्यांचे व्यवसाय सामाजिक वातावरण, निसर्ग इत्यादी. हे सर्व माहीत होण्यासाठी मी स्थानिक लोकांशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. बिल्डरच्या सहकार्याने गावातील व परिसरातील किमान ५० लोकांशी भेट घालून देण्याचे ठरले आणि माझे काम सुरू झाले. माझी भेट एका मंदिराच्या कट्ट्यावर बसलेल्या ६० ते ६५ वय असलेल्या राजाराम पाटील या व्यक्तीशी घालून देण्यात आली. तो त्या प्रोजेक्टच्या जमिनीचा मूळ मालक असल्याचे कळताच मला आश्चर्ययाचा धक्काच बसला.
*>> २० ते २५ वर्षापूर्वी :*
चंपकलाल हा अंदाजे २० ते २२ वयाचा मुलगा राजस्थानातून राजाराम पाटील यांच्या गावात येतो व एक छोटे किराणा मालाचे दुकान सुरू करतो. राजाराम ही त्यावेळी तरुण, गावचे सरपंच होते. हळूहळू चंपकलालचा व्यवसाय वाढत गेला. १–२ वर्षात त्याने स्वतःचे दुकान विकत घेतले. पनवेलच्या आसपास अजून ४ दुकाने सुरू केली. त्याचे भाऊ व चुलत भाऊ इत्यादींना ती दुकाने चालवण्यास आणले. चंपकलाल अहोरात्र काम करत होता. राजारामची जमीन होती. उत्पन्न येत होते. राजाराम काही काम न करता ऐशोरामात जीवन जगत होता.
*>> काळ बदलू लागला :*
१० ते १५ वर्षे निघून गेली. पनवेलच्या आजूबाजूच्या गावात जमिनीचे दर भलतेच भडकले होते. तोपर्यंत चंपकलालची आजूबाजूच्या गावात ९ दुकाने होती. एक दोन एकर जमीनही त्याने घेतली होती. एक दिवस प्रवास करण्यासाठी व मालाची नेआण करण्यासाठी चंपकलालने स्कार्पिओ गाडी घेतली. तशी राजारामच्या मनात जळजळ सुरू झाली, पण चंपकलालशी मैत्री होती. निवडणूक व ऐश करायला चंपकलाल पैशाची मदत करायचा. राजारामने काही एकर शेती विकून स्कार्पिओ घेण्याची ईच्छा चंपकलालकडे व्यक्त केली. चंपकलालने सांगितले की, 'तुम्ही पाटील आहात. तुम्ही माझ्यापेक्षा चांगली गाडी घ्या. २५ लाखाची फॉर्च्युनर घेण्याचे ठरले. १५० एकरापैकी ५० हजार प्रती एकर प्रमाणे राजारामने जमीन चंपकलाल विकली व फॉर्च्युनर गाडी घेतली. चंपकलाल आपले काम, आपली दुकाने चालवत होता. राजारामचा आपल्या फॉर्च्युनर गाडीतून राजकारण, निवडणुका व छमछमचा नाद चालू होता. अशाने हळूहळू राजारामची अधोगती होत गेली. पुढे चंपकलालने बंगला बाधला. राजारामनेही बंगला बांधण्यासाठी २५ एकर जमीन चंपकलालचा चुलत भाऊ छगनलालला विकली. पुढे मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी काही एकर जमीन विकण्यात आली.
*>> आजची परिस्थिती :*
आज राजारामकडे १५० एकर जमिनीपैकी एकही एकर जमीन नाही. फक्त एक बंगला व गंजत पडलेली फॉर्च्युनर आहे. राजारामचा मुलगा बी. एड. झाला आहे व तो गावातीलच शेठ चंपकलाल विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी करतो आणि राजारामला महिन्याला १ हजार रुपये पान व बिडीच्या खर्चासाठी देतो आणि राजाराम गावातील एका मंदिराच्या कट्ट्यावर बसून बिड्या ओढतोय. गावाच्या विकासासाठी चंपकलालने शाळेला २५ लाखाची देणगी दिली आहे. गावातील व्यक्तींनी त्याचा मुलगा रोहनलालला सरपंच म्हणून निवडून दिले आहे. रोहनलाल बिल्डर असून त्याचे बेलापूरला मोठे कार्यालय आहे. तो आठवड्यात एखाद्या दिवशी गावात येतो.
*>> प्रोजेक्टचे व्हॅल्युएशन :*
एक मार्केटिंग सल्लागार म्हणून मी त्या प्रोजक्टचे व्हॅल्युएशन करू लागलो आणि माझे डोळे पांढरे झाले. प्रति स्क्वेअर फूट रु. ३२०० दर लावायचे ठरले. त्यानुसार १५० एकराच्या प्रोजेक्टचे व्हॅल्युएशन खूप मोठे आहे. एक एकरात किमान ६ कोटींचा व्यवसाय होतो. १५० एकरात सुमारे १००० कोटींच्या पुढे जाईल. पुढील ३ वर्षात प्रोजेक्ट तयार होईल. रोहनलाल जे माझे क्लाईंट आहेत. त्यांनी सांगितले की, हे १००० कोटी वापरुन आपण अजून असे १२ प्रोजेक्ट पुढील ५ वर्षात सुरू करू.
*>> गावातील स्थिती :*
राजाराम पाटील हे एक उदाहरण झाले. अशा अनेक लोकांनी भविष्याचा विचार न करता आपल्या जमिनी विकून टाकल्या. रोहनलाल सारख्या बिल्डरांनी त्या विकत घेतल्या. स्वतःला पाटील म्हणवणारी मुलं कधी व्यापार शिकली नाहीत. थोडी जमीन विकायची गाडी घ्यायची व चैनी करायची. गावातील बरीच मुलं रोहनलालच्या कार्यालयात वॉचमन, क्लार्क म्हणून काम करतात. घरामध्ये गावातीलच पाटलांच्या सुना मोलकरणीचे काम करतात. गणपती उत्सव, शिवजयंती, यात्रा अशा अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात रोहनलाल सढळ हाताने लाख दोन लाखाची मदत करत असतो. गावातील पाटलांच्या पोरांची मंडळे आहेत. ती रोहनलालकडे कार्यक्रमासाठी देणगी मागण्यासाठी येत असतात. गावातील अशा उत्सवात रोहनलालची मोठी पोस्टर्स लावलेली असतात. रोहनलाल आपल्या बेलापूरच्या कार्यालयात दुसऱ्या गावातील जमीन विकत घेण्याची तयारी करत असतो. गावातील पाटलांची पोरं शिवजयंतीत झांज पथक बोलावून डीजेच्या गाण्याच्या तालावर नाचत असतात. या कथेतून तुम्ही काय समजलात व काय बोध घेतलात ते मला लिहा.
Comments
Post a Comment