लिंबू, पेरू व सीताफळ अशा तीन प्रकारच्या पिकांची शेती करून मिळवले शाश्वत उत्पन्न
परभणी जिल्ह्यातील उजळंबा येथील राजाभाऊ रगड या शेतकऱ्याने शेती नियोजनावर भर देऊन वर्षभर शाश्वत उत्पन्न मिळवण्याची सोय केली आहे. राजाभाऊ यांची गावात ४५ एकर शेतजमीन आहे. गावातील जमीन खडकाळ व हलक्या प्रकाराची आहे. म्हणून पाणी कमी लागणाऱ्या पिकांची लागवड करण्याचे ठरवले. विहीर व शेततळ्यांद्वारे जलसिंचन केले.
फळपीक लागवडीवर भर
राजाभाऊ यांना पारंपरिक पीक पद्धतीतून उत्पादन खर्चाएवढेही उत्पन्न मिळत नव्हते. शेतीत मजुरांचा अभाव, वाढलेली मजूरी, कमी बाजारभाव हे सर्व गृहीत धरून मिळणारे उत्पन्न समाधानकारक नव्हते. तोट्यात जाणाऱ्या शेती पद्धतीला नव्याने अभ्यास करून उत्पादन घेण्याचे राजाभाऊ यांनी ठरवले. अभ्यासातून फळबाग लागवड करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हलक्या जमिनीवर खोदलेल्या खड्यामध्ये काळी माती आणून टाकली.
फळपीकपद्धती ठळक मुद्दे
एकूण ४५ एकर क्षेत्रापैकी १७ एकरांवर फळबाग
सन २०१२मध्ये १२ एकरांवर लिंबू (प्रमालिनी), अडीच एकरांवर पेरू (लखनौ ४९)
सन २०१३ - अडीच एकर सीताफळ (बाळानगर)
लिंबाचे वर्षभर उत्पादन
१. साधारण २० बाय २० फूट अंतरावर लिंबाची लागवड केली आहे.
२. झाडांची संख्या एकरी ११० पर्यंत आहे.
३. दोन वर्षांपासून उत्पादन सुरू झाले आहे. तसे हे वर्षभर उत्पादन देणारे पीक आहे. मात्र मृग आणि आंबे असे दोन्ही बहार प्रामुख्याने घेतले जातात.
४. हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात मागणी वाढलेली असल्यामुळे दर चांगले मिळतात. ५. चांगली वाढ झालेल्या झाडापासून एक क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.
६. तोडणीनंतर ग्रेडिंग केले जाते.
यंदाचा दर - सरासरी ३५ रु प्रति किलो
गेल्या दोन वर्षातील उत्पन्न - २४० ते ३०० क्विंटल
पेरूची शेती
१. एक एकरावर १० बाय १९ फूट तर दीड एकरावर २० बाय १० फूट अंतर अशी अडीच एकरांत सुमारे ८०० झाडांची लागवड केली आहे.
२. प्रतिझाड सरासरी ५० किलो व काही वेळा त्याहून अधिक उत्पादन मिळते. गेल्यावर्षी सरासरी प्रति किलो १० रुपये दर मिळाले. अलीकडील वर्षांत हे दर १० ते १५ रुपये या दरम्यान राहिल्याचे राजाभाऊ यांनी सांगितले.
सीताफळ उत्पादन
१.बाळानगर जातीच्या झाडांची १० बाय १० फूट अंतरावर एकरी सुमारे
४३५ झाडांची लागवड केली आहे.
२.झाडे लहान आहेत. प्रति झाड सरासरी ७ किलो याप्रमाणे उत्पादन मिळू लागले आहे.
३. परभणी येथील मार्केटमध्ये प्रति किलो सरासरी ३० रुपये (प्रति क्रेट ५३० रुपये) दर मिळतात.
पाणी व्यवस्थापन
फळबागांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते. राजाभाऊ यांच्याकडे तीन विहिरी आहेत. परंतु त्यांचे पाणी दरवर्षी जेमतेम फेब्रुवारी- मार्च महिन्यापर्यंत पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात टॅंकरने पाणी विकत घेऊन फळबागा वाचवल्या आहेत. गेल्यावर्षी राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत शेततळ्यांची निर्मिती केली. आणखी एका शेततळ्यांचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत आहे. शाश्वत उत्पन्न मिळू लागल्याने येत्या काळात उर्वरित क्षेत्रापैकी जास्तीतजास्त क्षेत्र फळबाग लागवडी खाली आणण्याचा मानस आहे.
ठळक मुद्दे
यंदा ८ एकर क्षेत्रावर पेरूची नवी लागवड केली आहे.
शेतमाल साठवणुकीसाठी ग्रामीण गोदाम योजनेतून ६० बाय ३० फूट आकाराच्या गोदामाची उभारणी केली आहे.
चाळीस बाय २० फूट आकारमानाचे पॅक हाऊस शेतात बांधले आहे.
ट्रॅक्टर, पाॅवर टिलरच्या सहाय्याने शेतीकामे केली जातात.
एक बैलजोडी तसेच चार सालगडी आहेत.
ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते.
लिंबावरील सिट्रस कॅन्कर रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारशीत रसायनाची फवारणी केली जाते.
पाॅवर टीलरद्वारे आंतरमशागत केली जाते.
कृषी विभागाकडून योजनांची माहिती मिळते.
Comments
Post a Comment