पुण्यातील कुडजे गावच्या स्मार्ट वुमनची यशोगाथा
पीक उत्पादनवाढीसह जमीन सुपीक असणेही महत्वाचे असते . जमीन सुपीकतेचे महत्त्व जाणून घेऊन, कुडजे (ता. हवेली, जि. पुणे) येथील शुभांगी विनायक जम या एसआरटी पद्धतीने भात आणि भाजीपाला पिकांची लागवड करतात. पिकवलेला भात व भाजीपाला थेट ग्राहकांना विकून त्यांनी शेती क्षेत्रात चांगला नफा कमावला आहे.
कुडजे हे गाव खडकवासला धरण परिसरात आहे. खरिपात भात हेच मुख्य पीक येथे घेतले जाते. कुडजे गावातील प्रयोगशील महिला शेतकरी शुभांगी विनायक जम यांनी गेल्या चार वर्षांपासून पारंपरिक भात लागवडीएेवजी एसआरटी पद्धतीचा वापर करून पीक घेत आहेत. शुभांगीताईंचे पती विनायक हे पुणे शहरातील कंपनीत नोकरी करतात. त्यामुळे एक एकर शेतीची जबाबदारी शुभांगीताई पाहतात आहे.
एसआरटी पद्धतीने भात लागवड
यापूर्वी त्या दरवर्षी भात, चवळी, मूग, उडीद अशी पिके घेत होते. २००० मध्ये कूपनलिका घेतल्यामुळे भातानंतर रब्बी आणि उन्हाळी पिकांच्या लागवडीस सुरवात केली. चार वर्षांपूर्वी शुभांगीताईंना गावातील सुदर्शन बचत गटाचे अध्यक्ष विजय पायगुडे यांच्या माध्यमातून एसआरटी पद्धतीने भात लागवडीची माहिती मिळाली. मग भात शेतीला सुरवात केली. उन्हाळ्यात जमिनीची चांगली मशागत करून एक एकरात दोन ट्रॉली शेणखत मिसळून एक मिटर रुंद आणि सहा इंच उंचीचे गादीवाफे तयार केले. त्यानंतर २५ सें.मी. बाय २५ सें.मी अंतरावर एसआरटी साच्याने गादीवाफ्यावर छिद्रे पाडली. गादीवाफ्यावरील छिद्रामध्ये बुरशीनाशक आणि जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया केलेले बियाणे टोकले. इंद्रायणी जातीचे एकरी साडेसहा किलो बियाणे टाकले. बी टोकण्यापूर्वी तणनाशकाचा वापर केला. कीडनियंत्रणासाठी पानावर ट्रायको कार्ड टाकला. दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते. जीवामृत दिले जाते.
या पद्धतीने मिळालेले उत्पादन-
पहिल्या वर्षी- भाताचे एकरी १४ क्विंटल
दुसऱ्या वर्षी - ४० क्विंटल
तिसऱ्या वर्षी - ४५ क्विंटल
एसआरटी पद्धतीचा झाला व उत्पादनात झाली वाढ -
एसआरटी पद्धतीमुळे जमीन नांगरत नाही. वाफ्यात गांडुळांची संख्या, सेंद्रिय कर्ब वाढला. पीक उत्पादनात चांगली वाढ मिळते. भात पीक उत्पादनाबाबत शुभांगीताई म्हणाल्या, की पारंपरिक पद्धतीने आम्हाला भाताचे एकरी १२ क्विंटल उत्पादन मिळत होते. परंतु एसआरटीचा अवलंब केल्यामुळे उत्पादनात चांगली वाढ झाली. एकरी सरासरी ३० क्विटंल भात उत्पादन मिळते. दरवर्षी मशागत, चिखलणी, भात रोप लावणीचा किमान पंधरा हजाराचा खर्च वाचला. आम्ही पुण्यातील ग्राहकांना थेट पन्नास रुपये किलो दराने तांदळाची विक्री करतो. ठरलेल्या विक्रेत्यांना भेंडी, पालेभाजी, भुईमुगाच्या ओल्या शेंगांची विक्री करतो. त्यामुळे नफ्यात वाढ झाली. दुसऱ्या बाजूला जमिनीची सुपीकता वाढत आहे.
बाजारपेठेनुसार पीक नियोजन
भात कापणीनंतर शुभांगीताई रब्बी हंगामात पाच गुंठ्यांवर भुईमूग, पाच गुंठ्यांवर हरभरा आणि पाच ते दहा गुंठ्यांवर मेथी, कोथिंबीर लागवड करतात. या बाबत शुभांगीताई म्हणाल्या, की गेले तीन वर्षी आम्ही शेती नांगरलेली नाही. भात कापणी करून मुळे वाफ्यातच ठेवतो. तणनाशक मारून गवताचे अवशेष जागेला कुजवतो. गादीवाफ्यावर भुईमुगाच्या पाच आणि हरभऱ्याच्या सहा ओळी बसतात. भुईमुगाच्या ओल्या शेंगा पुण्यातील ठरलेल्या विक्रेत्याला विकल्या जातात. तसेच गावातील शेतकऱ्यांना ५० रुपये किलो या दराने बियाणे विक्री केली जाते.हरभरा आणि भुईमूग पिकाच्या काढणीनंतर जानेवारीत त्याच गादी वाफ्यावर दहा गुंठे क्षेत्रावर भेंडीची लागवड करतो. साधारणपणे मार्चमध्ये तोडा सुरू होऊन जूनपर्यंत चालतो. अशा पद्धतीने मे महिन्यात जमीन न नांगरता फक्त पाट नीट करून गादीवाफ्यावर बायोडायनॅमिक खत पसरले जाते. तणनाशक फवारून खरिपात भात बियाणे टोकतो, असे शभंगीताई सांगतात.
पिकातून झालेला नफा
१. भुईमुगातून खर्च वजा जाता दहा हजार नफा मिळाला.
२. हरभरा पिकातून आठ हजारांचा नफा मिळाला. मेथी आणि कोथिंबीर विक्रीतून आठ हजारांचा नफा मिळाला.
३. भेंडी पिकातून खर्च वजा जाता वीस हजारांचा नफा मिळाला.
नियोजनातील ठळक मुद्दे
गेली चार वर्षे जमिनीची नांगरट नाही. मशागत खर्च आणि मजुरीत बचत.बायोडायनामिक खत,जिवामृत, दशपर्णी अर्क, प्रकाश सापळ्यांचा वापर.सेंद्रिय शेती योजनेच्या प्रशिक्षणात सहभाग, शेतकऱ्यांना मार्गदर्शन.भाताला युरिया- डीएपी ब्रिकेटचा वापर.
बाजारपेठेच्या मागणीनुसार पीक लागवडीचे नियोजन.
पुण्यातील निवडक व्यापारी, ग्राहकांना भाजीपाला आणि तांदळाची विक्री.
Comments
Post a Comment