दुष्काळात २५ एकरांवर फुलवला शेवगा व झेंडू
भाडेतत्वावर जमीन घेऊन मुंबईत व्यवसाय करणाऱ्या तपन हरचांदे यांनी दुष्काळ परिस्थितीत २५ एकरांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेवगा व त्यात आंतरपीक झेंडू घेऊन शेतीचा विकास केला आहे. एक शेतकरी यशस्वी उदयोजक होऊ शकतो याचे तपन हरचांदे उत्तम उदाहरण आहेत.
उच्चशिक्षित असलेले तपन पांडुरंग हरचांदे हे मूळचे मालवण (जि. सिंधुदुर्ग) तालुक्यातील नांदोस येथील आहेत. नवी मुंबईतील वाशी येथे १९९९ पासून त्यांचे कोचिंग क्लासेस आहेत.
लीज वर शेती घेऊन केली सुरुवात
शेती भाडेतत्त्वावर पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील जिरायती आणि दुष्काळी सोनवडी सुपे गावाच्या लगत श्रीधर बालन यांच्या सहकार्याने बाळासाहेब रेवडे यांची आठ एकर शेती घेतली. हळूहळू परिसरातील सुमारे सात शेतकऱ्यांचीही शेती कसायला सुरुवात केली. शेती घेण्यापूर्वी पीकपद्धती व मार्केटचा पुरेपूर अभ्यास केला.
शेती व पीकपद्धती
सुमारे ७५ एकर शेती भाडेतत्त्वावर - मार्च २०१६ मध्ये.
श्रीजी अॅग्रो नॅचरल फार्म असे नामकरण. मित्र पोपट लोणकर, राजाभाऊ थोपटे यांची मदत
सध्या २५ एकर क्षेत्र विकसित. त्यात ठिबक, गादीवाफा व पॉलिमल्चिंग पद्धत
मुख्य पीक - शेवगा. त्यात आंतरपीक झेंडू (२५ एकरांत)
झिगझॅग पद्धतीने कोईमतूर वाणाची एकरी साडेसहाशे प्रमाणात शेवग्याची लागवड
दुष्काळातही सकारात्मकता
यंदा सोनवडी सुपे भागात पाऊस जवळपास झालाच नाही. सरकारी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अलीकडील काही वर्षे परिसर दुष्काळ सोसतो आहे. अशा स्थितीत माळरानावर झेंडूचे यशस्वी पीक घेतले आहे. त्यांनी सुरवातीला जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष दिले. त्यासाठी तब्बल ३५ एकरांत ताग, धैंचा अशी हिरवळीची पिके घेतली. त्यानंतर हरभरा, ज्वारी यासह चारा पिके घेतली.
पाण्यासाठी काय पण
विहिरींची अवस्था, पाण्याचे स्रोत, शिरसाई उपसा जलसिंचन योजनेच्या कालव्याचे आवर्तन यांचा अभ्यास केला.
सध्या एक कोटी लिटर व २५ लाख लिटर क्षमता अशी दोन शेततळी बाष्पीभवन होऊ नये, तणांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पॉलिमल्चिंग सुमारे २५ एकरांत मल्चिंग अंथरायचे असल्याने गुजरातमधून यंत्र मागवून कमी कालावधीत हे काम साधले.
लागवडीखालील क्षेत्रात ठिबक सिंचनाचा वापर वेगवेगळ्या ठिकाणावरून सोळा देशी गायी आणल्या.
शेणखत वा जीवामृत फिल्टर करून द्रवरूप स्लरी शेताला देणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर.
चोवीस सिमेंट टाक्यांची एकमेकांना जोडणी करून व्यवस्था. नैसर्गिक शेतीवर संपूर्ण भर.
आठवड्याला सुमारे ३५ हजार लिटर जीवामृत तयार करण्यात येते. महिन्यातून तीन वेळा ठिबकद्वारे ते दिले जाते.
सुरवातीला यंत्रांच्या साहाय्याने बांधबंदिस्ती करून शेती लागवडीयोग्य केली.
दोन नवे बोअरवेल्स घेतले.
पूर्वीच्या तीन विहिरी होत्या. पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता झाल्यानंतर माळरानाचा विकास होण्यास मदत झाली.
शेतमालाची वाहतूक करण्यासाठी शेतरस्ते व्यवस्थित करण्यावर भर दिला.
शेताच्या मध्यभागी सुमारे वीस ते पंचवीस फूट लांबीचा रस्ता बनवला. तीन फूट रुंद व एक ते दीड फूट उंचीचे बेड तयार केले.
त्यावर झेंडू, शेवगा पिके चांगली घेऊन उत्पन्न वाढविण्यावर भर गावात वीजटंचाई असल्यामुळे साडेसात एचपीचा सौरऊर्जेचा प्रकल्प उभा केला आहे, त्यामुळे विजेचा प्रश्न सोडविण्यास मदत झाली.
पिकांना दिवसभर पाणी देण्याची सुविधा उपलब्ध झाली.
मल्चिंग पेपरचे अथवा पिकांचे कुत्री व अन्य जनावरांपासून नुकसान होऊ नये यासाठी संपूर्ण फार्मला सौरऊर्जेचे संरक्षक तारेचे कुंपण केले आहे.
उत्पादन-
शेवग्याची रोपे सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. आंतरपीक झेंडूचे (कोलकता वाण)
नऊ एकरांतील उत्पादन हाती आले आहे. एकरी दीड ते दोन टन उत्पादन मिळाले.
अन्य १५ एकरांतील झेंडूचा पहिला तोडा झाला असून, सुमारे सहा टन विक्री झाली आहे.
किलोला ३० रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.
महिलांना मिळवून दिला रोजगार
माळरानावर शेती फुलल्याने सणांच्या काळामध्ये परिसरातील सुमारे ८० ते १०० महिलांना रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे. या सर्व महिला जळगाव सुपे, कप, देऊळगाव रसाळ, कारखेल या भागातील आहेत. या महिलांना दररोज १७० रुपये रोजगार मिळतो. वाहतुकीची स्वतंत्र व्यवस्था केली जाते.
Comments
Post a Comment