नोकरी सांभाळून अवर्षणग्रस्त भागात फुलवली फळबाग
नगर जिल्ह्यातील सतत अवर्षणग्रस्त असलेल्या सैदापूर-हत्राळ (ता. पाथर्डी) येथील सुभाष आणि संजय या केदार बंधूंनी नोकरी संभाळून शेतीत वेगवेगळे प्रयोग करून आपल्यातील प्रयोगशीलतेचा परिचय दिला आहे. केळी, पपई आदी फळांचे प्रयोग करणाऱ्या केदार यांनी आता सहा एकरांतील विविध जातींच्या आंबा बागेवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. केदार बंधूंची वडिलोपार्जित ४२ एकर शेती आहे. अवर्षणग्रस्त या भागात शेतजमीन खडकाळ, सिंचनाचा अभाव असलेली होती. या परिसरात कापसू, बाजरी, ज्वारी, अशीच पारंपरिक पिके घेतली जातात. केदार परिवारही अशीच पिके घेत होते.
प्रयोगशील वृत्ती जपली
•सन २००० मध्ये दोन एकरांवर केळी उत्पादनाचा केदार बंधूंनी प्रयोग केला. तीस टन उत्पादनासह ते यशस्वीही झाले. नगरमधील व्यापाऱ्यांना विक्री केली. तीस टन केळीचे उत्पादन निघाले.
•सन २००५ मध्ये तीन एकरांत तैवान पपईची लागवड केली. पाथर्डी, बीड, शेवगाव भागांतील बाजारात नगावर विक्री केली. मोठ्या नगाला ३५ ते ४० रुपये, तर लहान नगाला १५ ते २० रुपयांपर्यंत दर मिळवला. या भागातील हा पहिलाच प्रयोग होता.
•सन२०१३ मध्ये सहा एकरांवर एरंडी घेण्याचाही या भागातील पहिलाच प्रयोग केला.
तलावातील गाळ टाकून आंबा लागवड
फळपिकांतून यश मिळाले. पण, पाण्याची व मजूरबळाची मोठी समस्या होती. केदार बंधू सन २००६ मध्ये आंबा पिकाकडे वळले. सहा एकर क्षेत्र निवडले. जमीन खडकाळ असल्याने त्यात तलावातील माती आणून वापरली. त्यानंतर लागवड केली.
आंब्याची झाडे
• एकूण क्षेत्र - सहा एकर
• केशर - ३२०
• तोतापुरी -१५
• हापूस - ६०
• सदाबहार (कायम उत्पादन देणारा, लोणच्यासाठीचा)-१५
आश्वासक उत्पादन व आंतर पिकाचा लागला हातभार
आंब्याचे दोन वर्षांनंतर पहिले पीक हाती आले. सुमारे ३० ते ३५ झाडांमधून पहिल्या वर्षी केवळ तीन क्विंटल उत्पादन मिळाले. जागेवर शंभर रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली. दुसऱ्या वर्षी ४० झाडांमधून पाच क्विंटल उत्पादन निघाले. हळूहळू उत्पादनक्षम झाडांची संख्या वाढू लागली. तसे उत्पादन वाढू लागले. यंदा दहा वर्षांनंंतर सुमारे २५० ते ३०० झाडांपासून एकूण सहा टनांपर्यंत उत्पादन मिळाले. आंब्याचा दर्जा, स्वाद दर्जेदार असल्याने मागणीही चांगली मिळाली. केशर व हापूसला आत्तापर्यंत ७०, ८०,९० रुपये प्रतिकिलो असेच दर राहिले. यंदा औरंगाबादच्या व्यापाऱ्याला जागेवरच २९ रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली. आंब्याच्या नव्या बागेत पहिली दोन वर्षे आंतरपिके घेतली. त्यात पहिल्या वर्षी मटकी व त्यानंतर दुधी भोपळ्याची लागवड केली. तिसगाव, पाथर्डी, शेवगाव बाजारात हातविक्री केली. दोन्ही पिकांमुळे आर्थिक हातभार चांगला लागला.
सिंचन व्यवस्था केली बळकट
केदार यांची एक विहीर तलावानजीक आहे. शिवाय अन्य एक विहीर आहे. त्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन करून ते शेतीला देतात. सन २०११ मध्ये पन्नास लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधले आहे. सन २०१३-१४ मध्ये दुष्काळाने पाथर्डी तालुक्यातील बहुतांश डाळिंब, आंबा व अन्य बागा वाया गेल्या. परंतु, शेततळे असल्याने त्याच्या जोरावर दुष्काळात सहा एकर आंब्यांची बाग केदार यांना जगवता आली.
ठिबकमुळे झाला फायदा
सन २००० पासून शेतीत ठिबकचा वापर सुरू केला. केळी, पपईला त्याचा उपयोग झालाच. शिवाय सध्या सहा एकर क्षेत्रालाही तो होतो आहे. ठिबकमुळे अल्प पाण्यावर दुष्काळात झाडे जगवता आली. हळूहळू जास्तीत जास्त क्षेत्र ठिबकखाली आणण्याचा मानस आहे.
सेंद्रिय शेतीवर भर
आंबा बागेत सुरुवातीला रासायनिक खतांचा वापर व्हायचा. मात्र, अलीकडील काही वर्षांत
जैविक खत व सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. प्रतिझाडाला चार किलो जैविक, तर दोन किलो शेणखत वर्षातून एकदा दिले. गरजेनुसार शेणखत विकत आणले जाते. सें.िद्रय पद्धतीच्या वापरामुळे आंब्याची गुणवत्ता, स्वाद, तसेच टिकवणक्षमताही वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांकडूनही मागणी वाढली आहे. काही वर्षांपूर्वी शेणखतावर भर देत केळीचे पीकही यशस्वी केले होते. अन्य पिकांत बाजरी, तूर, कापूस आदींचा समावेश आहे.
Comments
Post a Comment