विदर्भातील साडेतीन हजार गावांमध्ये जलसंकट, नागपूर विभागातील एकूण २९ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत घट आढळून आली आहे.
वर्तमानपत्रातील अशा अनेक बातम्या वाचून पाण्याची समस्या किती गंभीर झाली आहे याची जाणीव होते आहे. राज्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. हा दुष्काळ आहे तरी काय ? का आपण याच्या विरोधात लढत नाही . आपण सर्वानी ठरवले तर या दुष्काळावर मात करू शकतो. भूजल पातळीत घट झाल्यामुळे व गावोगावी कूपनलिका , बोअरवेल यातून पाण्याचा अतिउपसा होत असल्यामुळे भूजल पातळी विदर्भातील गावांमध्ये एक मीटरहून अधिक खोल गेली आहे.
ज्या प्रमाणात भूजलाचा उपसा करण्यात येत आहे, त्याप्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही, त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल गेलेली आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी जिरविण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. आता जर भूजल पातळी वाढवण्यासाठी नियोजन केले नाही तर भविष्यात हि परिस्थिती आणखीन गंभीर होण्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. काय होते या दुष्काळाने ? दुष्काळाने बळीराजाला सगळ्यात मोठा फटका बसतो. पाणी नसेल तर शेतात लावलेल्या सोन्यासारख्या पिकाची राख होणार आहे या जाणिवेने तो हतबल होतो. मग कर्जमाफी व्हावी याची प्रतीक्षा केली जाते. सरकार तुटपुंजी कर्जमाफी देणार त्यावर शेतकऱ्याचे काय भागते? कर्जमाफी हा दुष्काळ सोडवण्याचा पर्याय नव्हे हे आधी समजून घेतले पाहिजे. या पाणीसंकटावर आपण मात करू शकतो फक्त काही प्रयत्न केले पाहिजेत इतकेच.
आजच्या इंडियन रुट्झ ऍग्रोच्या दिवाळी विशेष लेखात जाणून घेऊयात भूजल पातळी वाढण्यासाठीची माहिती.
पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम
भूजल पातळी वाढवण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम गतिमानपणे राबविण्यास प्राथमिकता दिल्यास भविष्यात पाणीटंचाईवर मात करणे शक्य आहे. पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत जमिनीचा चढ-उतार, मातीचा प्रकार, पावसाचे प्रमाण, पाणलोटातून वाहणारे नाले या सर्व बाबी विचारात घेऊन कृषी अभियांत्रिकी उपाय राबवावेत. माळरानामध्ये उतारावर खोल, सलग समतल चरांचे काम केल्यामुळे भूजल पातळीत वाढ झाल्याचे करवाडी- नांदापूर पाणलोटामध्ये दिसून आलेले आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील करवाडी- नांदापूर पाणलोटामध्ये 2010 मध्ये एक मीटर रुंद व पाऊण मीटर खोल आकाराचे एकूण २४ हजार मीटर लांबीचे चर काढल्यामुळे पाच मीटरपर्यंत भूजल पातळीत वाढ झाली, त्यामुळे २०१० मध्ये एकूण १०० हेक्टर वाढीव क्षेत्र रब्बी हंगामात सिंचनाखाली आलेले आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये सलग समतल चर, दगडी बंधारे, सिमेंट नाला बांध, मातीनाला बांध, शेततळे, ढाळीचे बांध, शेताची बांधबंदिस्ती हे सर्व उपाय राबवून भूजलपातळीत वाढ निश्चितच होते. सोबतच भूजलाचा शास्त्रीय पद्धतीने सिंचनासाठी वापर करणे गरजेचे आहे. पारंपरिक सिंचन पद्धती, वाफे पद्धत, सरी-वरंबा पद्धत, सारे पद्धत इत्यादींमध्ये पाण्याचा भरपूर अपव्यय होतो. हे टाळण्यासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन या पद्धतींचा पीक घेण्यासाठी वापर करून पाण्याची बचत करता येईल.
भूजल पुनर्भरण
भूजल पुनर्भरण करण्यासाठी विहिरी व कूपनलिकांचा वापर करता येतो. पावसाच्या पाण्याचे विहिरीद्वारे भूजल पुनर्भरण करण्यासाठी अथवा छताच्या पाण्याचे कूपनलिकेमध्ये भूजल पुनर्भरण करण्यासाठी प्रथम शेतातील पाणी अथवा छतावरील पाणी एकत्रित करणे गरजेचे आहे. ज्या पाण्याचे पुनर्भरण आपण करणार आहोत त्या पाण्याची प्रत चांगली असणे आवश्यक आहे. हे पाणी योग्य गाळण यंत्रणेच्या मार्फतच पुनर्भरणाच्या ठिकाणी पोचले पाहिजे. तसेच, यामध्ये सर्वांत महत्त्वाची व आवश्यक गोष्ट म्हणजे याकरिता योग्य ठिकाणी गाळ स्थिरीकरण टाकीची मांडणी करणे गरजेचे आहे.
विहीर व कूपनलिकांद्वारे भूजल पुनर्भरण करताना गाळण यंत्रणा कार्यक्षमपणे काम करणारी असावी. गाळण यंत्रणेतून पाण्यासोबत गाळ जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात घराच्या छतावर पडणारे पाणी पाइपचा उपयोग करून एकत्रितरीत्या जमा करून शोषखड्ड्यात अथवा कूपनलिकेत सोडल्यास भूजल पुनर्भरण करणे शक्य आहे. पहिल्या एक- दोन पावसाच्या पाण्याचा उपयोग पुनर्भरणासाठी करण्यात येऊ नये.
Comments
Post a Comment