माझ्या व्यवसाया बाद्दल "उद्योगवेद ".या दिवाळी अंकात सौ साधना हुल्याळकर बारामती यानी शब्दांकन केलेला लेख
.... वडापाव ने आयुष्य तारले....
प्रसंग होता चित्रकला स्पर्धेचा!! चिमुकले हात आपल्या भावना रंगवत होते. विषय होता, 'यल्लमा देवीची यात्रा'. तसा माझा या विषयाशी फारसा संबंध नव्हता. पण विजेत्या चित्रात मी होतो, त्यामुळे ते माझ्याकडे आले. या चिमुकल्या ने जत्रेतील चित्रात 'देशपांडे वडापाव सेंटर' हा माझा गाडा दिमाखात दाखवला होता. हो!!जतच्या यात्रेमधील खाद्यपदार्थांचे विशेष!! या 4/5 दिवसांत लाखांचा व्यवसाय मिळवून देणारा माझा वडापाव गाडा!!
जत सारख्या दुष्काळी भागात असे उत्पन्न मिळविणे सोपे नव्हते. साधारण 2003 साली हा व्यवसाय सुरु केला तेव्हा असं वाटलं नव्हते की, हाच व्यवसाय आपल्याला तारुन नेणार!! तसे व्यवसाय सुरु करणे ही गरजच बनली होती. घरची वडिलोपार्जित भरपूर ८० एकर शेती आहे पण जत आणि दुष्काळ असे समीकरण झाल्यामुळे खर्च आणि उत्पादन यांचा मेळ बसेना! त्यामुळे काहीतरी हलचाल करणे भाग होते. खरे तर नोकरी करायची इच्छा नव्हती पण इलाज नव्हता. जतच्या साखर कारखान्यात वाँचमन म्हणून नोकरी स्विकारली. पण दुर्दैवाने कारखाना बंद पडला. संसारिक जबाबदारी पडल्यामुळे पुन्हा अर्थार्जनाचा बिकट प्रश्न उपस्थित झाला. मग नाष्टा सेंटर काढायचे ठरविले. सकाळी चहा, उपीट,शिरा आणि संध्याकाळी भजी असा बेत ठरवला. 'देशपांडे' या कर्मठ कुटुंबातील मुलगा असा व्यवसाय सुरु करतो हे पाहून देशपांड्यांना हे शोभतं का?? असे टोमणे खूप वेळा सहन करावे लागले. माझे वडील मोठेशेतकरी !त्यांनाही हे ऐकून घ्यावे लागे. ' देशपांडे चहा आण रे' असं लोक ओरडून सांगायचे, अशावेळी रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला चहाचे कप हातात धरून घेवून जाताना काही वेळा वाईट वाटे. पहिल्या दिवशी फक्त 100 रूपयांचा व्यवसाय झाला. दुसऱ्या दिवशी 100 रूपयांपेक्षा कमी.. मग मात्र विचार बदलला. फक्त संध्याकाळी वडापाव करायचे ठरविले. यासाठी मित्रांकडून उसनवारी घेवून गाडा उभा केला. माझी आई खूप काटकसरी!!! तिने पै पै ने साठविलेली पुंजी माझ्या व्यवसायाचे भांडवल झाले. आणि एका संध्याकाळी 'देशपांडे वडापाव सेंटर' उभे राहिले. खरं तर शिवाजी पेठेत, जिथं आधीपासूनच हाँटेल आणि इतर खाद्यपदार्थांचे गाडे खूप दिवसांपासून जोरात चालू होते,तिथं माझा वडापाव गाडा कसा टिकणार असं वाटायचं. कधी गिर्हाईकांना बोलवावे लागायचे पण हळूहळू गर्दी वाढू लागली. सुरुवातीला तिखटमिठ या चा मेळ जमायचा नाही. काही वेळा वडा कच्चाच राहिला, तिखटच झाला, असं म्हणत लोक अर्धवट खाऊन टाकून जायचे, काही वळा उधारी, यामुळे खूप नुकसान व्हायचे, वाईट वाटायचे, अशा वेळी घरची मंडळी विशेषतः माझी आई व पत्नी खूप धीर देत तिखटमिठाचे गणित जमण्यासाठी रोजचे प्रमाण टिपून ठेवीत . आता छान जम बसला आहे. ग्राहकांनी कितीही तक्रार केली तरीही रागाला न येता, ग्राहकाचे समाधान हेच व्यवसायाचे यश,हे तत्व लक्षात घेऊन सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला आजचा व्यवसाय हेच उद्याचे भांडवल असायचे. कधी नफा कधी तोटा असे करत व्यवसाय सुरू ठेवला, पण मालाच्या दर्जाशी कधीच तडजोड केली नाही. उत्तम दर्जा, स्वच्छता आणि तत्पर सेवा, हे ब्रीद आणि ग्राहकांना काय हवे आहे याचा अभ्यास करणे हा नियम केला आहे. सुरुवातीला ४ रूपये दर होता, १०० /१५० वडापाव विकले जायचे. आता १० रुपये दराने ४ ०० ते ५ ०० वडापाव हे फक्त संध्याकाळी ५:३० ते ९:०० पर्यंत विकले जातात. स्वतः चे कष्ट स्वतः साठी वापरले जातात याचे समाधान वाटते. शिवाय माझ्या मुळे इतर २/३ जणांना रोजगार मिळतो याचाही खूप आनंद होतो. आता माझ्या कडून प्रेरणा घेऊन माझ्या लहान भावाने व एका नाते वाईकाने ही हाच व्यवसाय सुरू केला आहे.
.काही जणांनी मानसिक खच्चीकरण केले तसेच काहींनी पाठीवर थाप मारून प्रेरणा ही दिली. माझ्या पत्नी सौ राधा शिवाय हा व्यवसाय पूर्णच होवू शकत नाही. मला माझा व्यवसाय अजून वाढवायचा आहे. माझा वडापाव एक ब्रँड व्हावा आणि त्याच्या इतरत्र शाखा असाव्यात अशी अपेक्षा आहे आणि त्या साठी मी सर्वोतपरी प्रयत्न करत रहाणार आहे.
श्री. अनिल दाजी देशपांडे
*यशस्वी उद्योजक होण्यासाठी काही अत्यंत महत्वाचे गुण....* तुम्हाला जीवनात यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर तुमच्यात काही गुण असावे लागतात. ते कमी-अधिक प्रमाणात असतील तर चालत...
Comments
Post a Comment