*उद्योग आणि मराठी माणूस...*
--------------------------------
_४६. पालकांनी ठराविक काळाने मुलांचा आधार काढून घ्यावा_
--------------------------------
सतत कुणाच्यातरी आधाराने जगत राहण्यामुळेसुद्धा बरीच मराठी मुलं मागे पडत आहेत. मला एक पदवीधर मुलगा भेटायला आला. पदवी घेऊन दोन वर्षं झाली, अजून नोकरी नाही. मी विचारलं, पदवी करत असताना काही तयारी केलीस का? शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्ष काय केलंस? त्याच्याशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की, त्याचे पालक त्याला शिक्षण खर्च, पॉकेटमनी इत्यादीसाठी त्याला नेहमी पैसे पुरवत होते. त्यामुळे जोपर्यंत पालक पैसे पुरवत आहेत, तोपर्यंत काही काळजी नाही व कामाची तसदी घेण्याची किंवा त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही अशी बॉडी लँग्वेज होती.
तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक म्हातारी होती. तिने एक पोपटाचे पिल्लू आणले. थोडे दिवस घरात पाळले. थोडे मोठे झाल्यावर बागेत सोडले, पण ते काय उडेना. ते पिल्लू तिने बागेतील एका झाडाच्या फांदीवर बसवले, झाड गदागदा हलवले, वेगवगळे आवाज काढले पण काही केल्या ते हवेत झेप घेईना. शेवटी म्हातारीने गावात दवंडी पेटवली की, जो कुणी या पिल्लाला हवेत उडवून उडवून दाखवेल त्याला ५ हजार रुपये बक्षीस मिळेल. मग एका शेतकऱ्याने ते आव्हान स्वीकारले व तो बागेत आला. ज्या फांदीवर पोपट बसला होता, त्याने ती फांदी एका झटक्यात तोडून टाकली आणि काय आश्चर्य पोपट हवेत उडू लागला व उंचचउंच गेला.
बहुसंख्य पालकांना सुद्धा हीच गोष्ट कळलेली नाही. मराठी मुलांत पण खूप मोठी सुप्त शक्ती आहे. पण जोपर्यंत पालक आधार देतात, दोन वेळचं खायला मिळतंय ना? कशाला उद्योग, व्यापाराच्या झंझटमध्ये पडा, कशाला शहराकडे जा? बघूया थोडे दिवस, काही महिने, काही वर्षे. देऊ स्पर्धा परीक्षा वगैरे. आणि अशीच अनेक वर्षे जातात व स्वतःमध्ये टॅलेंट असताना सुद्धा करिअर घडत नाही. तेव्हा जसं गोष्टीतल्या शेतकऱ्याने फांदी तोडून काढली, तसेच पालकांनी काही ठराविक काळाने मुलांचा आधार काढून घ्यावा, तरंच मुलं त्यांचं कर्तृत्व दाखवतील.
आमच्या लेखांसंबंधी अधिक माहिती, सूचना, संदर्भ किंवा मते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. महाराष्ट्रात प्रत्येक घरात उद्योग उभा राहावा यासाठी आम्ही काम करतोय, तुम्ही खारीचा वाटा उचला, हा लेख आपल्या मित्र व परिचितांना पाठवा.
- प्रा. प्रकाश भोसले, सीईओ ई-ब्रँडिंग इंडिया, प्रेरणादायी वक्ते
Comments
Post a Comment