शेततळे
दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापन फार महत्वाचे असते. पावसाचे पाणी पडून गेल्यावर त्या पाण्याचा उपयोग आपल्याकडून केला जात नाही. केवळ पुढच्या वर्षीच्या पावसावर शेतकरी अवलंबून राहतात. जमिनीत मुरलेल्या या पाण्यापासून शेताभोवती शेत तळी निर्माण केल्यास शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका बसणार नाही. शेत तळ्याच्या आधारे पीक जगवता येते.
शेततळे
शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळयास शेततळे असे म्हणतात. हे तळे नाला ओघळीचे काठावरील पड क्षेत्रात घेतले जाते.
उद्देश :-
शेतात तळे करुन त्यात भूपृष्ठावरुन वाहून जाणारे पाणी साठविणे व त्याचा उपयोग संरक्षित जलसिंचनास करणे हा होय. या तळयामध्ये पावसाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो अशा वेळी या तळयात साठविलेल्या पाण्यामधून एखादे दुसरे पाणी पिकास देता आल्यास हमखास पीक येते. जेथे सहजासहजी विहीर खोदणे शक्य होत नाही तेथे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाइी शेततळे तयार करुन पाणी साठविण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो.
शेततळयाचे फायदे :-
पाणलोट क्षेत्रातील भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते.
आपत्कालीन स्थितीत पिकास पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.
पूरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
चिबड व पाणथळ जमीन सुधारणेसाठी शेततळयाचा चांगला उपयोग होतो.
मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग होतो.
पिकावर औषधे फवारणीसाइी शेतात मुबलक पाणी उपलब्ध होते.
शेततळयाचे प्रकार :-
नैसर्गिक घळ अथवा ओघळ अडवून
सपाट जमिनीतील शेततळे.
जागेची निवड :-
ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करण्यात येते. अशी काळी जमीन ज्यात चिकणमातीचे प्रमाण जास्त आहे अशी जमिनी शेतळयास योग्य असतात. तसेच पश्चिम घाट विभागामध्ये भात शेतीसाठी गटाच्या वरील भागामध्ये लॅटराईट जमिनीतसुध्दा शेततळे घेणे फायदयाचे ठरणार आहे.सर्व प्रकारच्या पाटबंधारे प्रकल्पांच्या समावेश क्षेत्रात शेततळी घेण्यात येत नाहीत. मुरमाड, वालुकामय, सच्छिंद्र खडक किंवा खारवट अशी जमीन असलेली जागा शेततळयास अयोग्य असते.
पर्जन्यमान :
शेततळे घेण्यासाठी पर्जन्यमानाची अट नाही. मात्र शेततळयात करावयाचा पाणीसाठी अपधातेतून उपलब्ध होण्यासाठी संबंधित तालुक्यातील वार्षिक सरासरी पावसाचा विचार होणे आवश्यक आहे. यासाठी संबधित तालुका कृषि अधिकारी यांनी तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान किती आहे याची खात्री करुन त्याप्रमाणे अंदाजपत्रके तयार करण्यात येतात. अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देण्यापूर्वी संबंधित तालुक्यातील वार्षिक सरासरी पावसाची आकडेवारी योग्य घेतली आहे हे पाहण्याची जबाबदारी शेततळयास तांत्रिक मान्यता देणा-या अधिका-याची असते.
पाणलोट क्षेत्र :
मजगी गटाच्या वरील खाचराच्या ठिकाणी / जवळ शेततळयासाठी जागा निवडण्यात येते.
ज्यामुळे सभोवताली जमीन दलदल व चिवड होईल अशा ठिकाणी शेततळे घेण्यात येत नाही.
ज्या ठिकाणी जमिनीचा उतार सर्वसाधारणपणे 3 टक्के पर्यंत असेल त्या ठिकाणी शेततळी घेण्यात येते.
Comments
Post a Comment