एक एकर शेतीच्या जोडीला आधार दिला शेतीपूरक व्यवसायाने
अनसुर्डा (ता. जि. उस्मानाबाद) येथील दळवे दांपत्याने केवळ एक एकर शेतीत जिद्द न हारता वर्षभर विविध भाजीपाला पिके घेत आर्थिक स्थिती सुधारली आहे. सेंद्रिय पद्धतीने अधिकाधिक नियोजन करताना शेतीला जोड धंदा म्हणून शेळीपालन, पोल्ट्री आदींमधून उत्पन्नाचे स्रोत जोडले आहेत.
पाण्याची कमतरता असणाऱ्या उस्मानाबाद तालुक्यातील अनसुर्डा येथील सौ. रुक्मिणीताई व रामेश्वर दळवे या दोघांनी मिळून शेतीत प्रयोग करत काम केले आहे. रामेश्वर यांच्या वाट्याला वडिलोपार्जित एक एकर शेती आली. सर्वांत प्रथम पाण्याची सोय म्हणून बोअर घेतले. शेतीचं क्षेत्र एक एकरच असल्याने जोड व्यवसाय म्हणून शेळी घेऊन पिल्लं वाढवण्यास सुरवात केली. त्याचबरोबरीने गायही घेतली.
परिसरातील स्वयंसहाय्यता प्रयोग परिवार व उमेद परिवाराच्या माध्यमातून रुक्मिणी महिला गटात सहभागी झाल्या. उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाच्या ‘आत्मा’ यंत्रणेकडून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतले. शेळ्या व कडकनाथ कोंबड्या घेण्यासाठी गटामार्फत कर्ज मिळाले. कष्ट करून ते वेळेवर फेडण्याचे सातत्य राखले. पुन्हा मोठे कर्ज घेऊन दोन गायी घेतल्या. दुग्धोत्पादन चालू केले. बॅंकेमार्फतही काही कर्ज मिळाले.
मिश्र भाजीपाला शेती
मिश्र भाजीपाला शेती करण्यास दळवे दाम्पत्याने सुरुवात केली. यात सव्वा ते दोन महिन्यात येणारी कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू अशी पिके निवडली. त्याचबरोबर सुमारे पाच ते सहा महिने कालावधीची वांगी, भेंडी, मिरची, घेवडा, टोमॅटो अशी पिके घेण्यास सुरवात केली. याचबरोबर दीर्घ काळ उत्पादन व उत्पन्न देऊ शकणारे शेवग्याचे पीक घेतले. शिवाय काही जागेत घरच्यापुरता कांदा, भुईमूग, जवस घेणेही सुरू केली. या व्यतिरिक्त कोबी, फ्लाॅवर, लसूण अशीही बाजारपेठेतील मागणीनुसार पिके घेण्यास सुरवात केली.
सेंद्रिय नियोजनवर भर
भाजीपाला घेताना सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर दिला. गायीच्या शेणापासून गांडूळ खत तयार करण्यास सुरवात केली. व्हर्मीवॉश, दशपर्णी, जीवामृत, बीजामृत आदी घटकही तयार करून त्यांचा वापर सुरू केला.
पूरक व्यवसायाला चालना
केवळ शेतीवर अवलंबून चालणार नाही हे उमजल्यावर दळवे दांपत्याने पोल्ट्री, शेळीपालनावर भर दिला आहे. सध्या देशी कोंबड्या असून तीन वर्षांपासून या व्यवसायात स्थिरता येत आहे. चार शेळ्या आहेत. त्यांना पिल्ले होतील तसा व्यवसायाला अधिक आकार येईल.
विक्री व्यवस्था
वर्षभरातील सर्व हंगामात दळवे यांच्या शेतात कोणते ना कोणते पीक असायचेच. त्यामुळे दररोज एका पिकाची काढणी असायची. हा माल मोटरसायकलवरून दररोज वाहून नेण्याचे कष्टदेखील सोबत आले. परिसरातील गावांमध्ये आठवडी बाजारांमधून कधी व्यापाऱ्यांना तर कधी स्वतः बसून हातविक्री सुरू केली.
Comments
Post a Comment